कोकणात सर्वदूर मान्सून सक्रिय, ४८ तास मुंबई, ठाण्यात ‘ऑरेंज अलर्ट’ 2 दिवस पुण्यात मेघगर्जनेसह कोसळणार

0

मुंबई: गेल्या काही दिवसांपासून रुसलेल्या मोसमी पावसाने रविवार रात्रीपासून मुंबई आणि महानगर परिसरात झोकात पुनरागमन केले. आकाशातून बरसलेल्या अमृतधारांनी अवघा कोकणपट्टा सुखावला आहे. मुंबई, ठाणे, रायगड आणि रत्नागिरी या जिल्ह्यांना उद्या, बुधवारसाठी ऑरेंज ॲलर्ट देण्यात आला आहे.

रविवार रात्रीपासून पाऊस सक्रिय

मुंबईमध्ये रविवार रात्रीपासून मान्सूनचे वारे पुन्हा सक्रिय झाले. सोमवार सकाळपर्यंत पूर्व आणि पश्चिम उपनगरांमध्ये काही ठिकाणी पावसाने जोरदार हजेरी लावली. सांताक्रूझ येथे रात्रीपासून सक्रिय झालेल्या पावसामुळे सकाळी ८.३० पर्यंत १०३.१ मिलीमीटर पावसाची नोंद झाली. रविवारी रात्रीपासून उपनगरांमध्ये पावसाचा जोर वाढल्याने सोमवारी सकाळी ८.३० पर्यंत सांताक्रूझ केंद्रावर १०३.१ मिलीमीटर तर कुलाबा येथे ३०.४ मिलीमीटर पावसाची नोंद झाली. महापालिकेच्या नोंदीनुसार मुलुंड येथील महापालिका शाळेमध्ये २१० मिलीमीटर पावसाची नोंद झाली. गवाणपाडा अग्निशमन दल केंद्र येथे १६७ मिलीमीटर, वर्सोवा येथे १६७ मिलीमीटर, गोरेगाव येथे १२९ मिलीमीटर पावसाची नोंद झाली.

अधिक वाचा  वारजे माळवाडी ठेकेदाराच्या हैदोसामुळे मुठा नदीचा श्वास गुदमरला; प्रशासनाकडून फक्त विनवणीच

त्यानंतर सोमवारी दुपारी १२ च्या सुमारास प्रादेशिक हवामान विभागाने मंगळवार सकाळपर्यंतच्या कालावधीसाठी अद्ययावत इशारा जारी केला. त्यावेळी मुंबईसाठी ऑरेंज ॲलर्ट देण्यात आला. ठाणे, रायगड, रत्नागिरीसाठीही ऑरेंज ॲलर्ट देण्यात आला तर पालघर जिल्ह्यासाठी रेड देण्यात आला. त्यानंतर दिवसभरात महामुंबईत परिसरात किरकोळ पावसाची नोंद झाली.

१ जुलैपासून मुंबई, ठाणे जिल्ह्यांमध्ये पावसाचा जोर वाढेल तशीच मुसळधार पावसाची व्याप्तीही वाढेल अशी शक्यता आहे. १ जुलै रोजी पालघर आणि सिंधुदुर्ग वगळता इतर जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी मुसळधार ते अति मुसळधार पाऊस पडू शकेल. पालघर आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातही तुरळक ठिकाणी मुसळधार पावसासाठी यलो ॲलर्ट देण्यात आला आहे. २ जुलैला याची व्याप्ती वाढून संपूर्ण कोकण विभागात काही ठिकाणी मुसळधार ते अति मुसळधार पावसाची शक्यता आहे. कोकण विभागातील पावसाचा जोर घाट परिसरातही दिसेल. पुणे, कोल्हापूर आणि सातारा घाट परिसरात तुरळक ठिकाणी मुसळधार तसेच अति मुसळधार पाऊस २ जुलैपर्यंत अपेक्षित आहे.

अधिक वाचा  ‘ऑपरेशन टायगर’ला पडद्यामागून फडणवीसांचेही बळ?केंद्रीय नेतृत्वाकडून वारंवार विचारणा मग मोलाची मदत!

आजचा अंदाज

मुंबई, ठाणे, पालघर जिल्ह्यांना आज, मंगळवारी यलो अॅलर्ट देण्यात आला आहे. तर रायगड, रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्यांमध्ये मात्र ऑरेंज देण्यात आला आहे. मुंबई, ठाणे, पालघर या जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे.

पुण्यात मेघगर्जनेसह पावसाची शक्यता

शहरात सोमवारी दिवसभर आकाश ढगाळ होते आणि दुपारनंतर काही भागात पावसाच्या सरींनी हजेरी लावली. घाट माथ्यावर मध्य स्वरूपाचा पाऊस पडला. ताम्हिणीमध्ये २४ तासांत १२५ मिलिमीटर पावसाची नोंद झाली. दरम्यान, पुढील दोन दिवस आकाश मुख्यतः ढगाळ राहणार असून, संध्याकाळी मेघगर्जनेसह हलक्या सरी पडणार असल्याची शक्यता भारतीय हवामानशास्त्र विभागाने व्यक्त केली आहे.

अधिक वाचा  केतन अग्रवाल हत्याकांड आरोपी ‘सिया’ची वकील पहिल्यांदाच समोर अन् एका वाक्यात विषय संपवला

अनुकूल घडामोडींमुळे गेल्या आठवड्यात शहरात पाऊस पडला. मात्र, दोन दिवसांत पावसाचा जोर ओसरला आहे. सोमवारी सकाळपासून आकाशात ढग दाटून आले होते, उकाडाही वाढला होता. त्यामुळे दुपारीच पावसाला सुरुवात होईल अशी पुणेकरांची अपेक्षा होती; पण संध्याकाळी काही भागात वारा सुटला आणि हलक्या सरी पडल्या. त्यामुळे उकाडाही कमी झाला होता. जिल्ह्यातही हलक्या स्वरूपाचा, तर घाटात मोजक्या ठिकाणी जोराचा पाऊस पडला. पुढील दोन दिवस घाटात मध्यम ते जोरदार स्वरूपाच्या पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.