‘एनडीए’ ची २/३ बहुमताकडे वाटचाल आत्ता महाराष्ट्रात २ पक्षात भूकंप होणार? राज्यसभेत संख्याबळ वाढणार

0

तृणमूल काँग्रेसमधील फूट भाजपप्रणित राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या(एनडीए) पथ्यावर पडणार असून लोकसभा आणि राज्यसभा अशा उभय सदनातले ‘एनडीए’चे संख्याबळ यामुळे वाढणार आहे. लोकसभेत दोन तृतीयांश बहुमतापर्यंत पोहोचण्यासाठी ‘एनडीए’ला खूप मोठी मजल मारावी लागणार असली तरी राज्यसभेत मात्र ही आघाडी हळूहळू दोन तृतीयांश बहुमताकडे वाटचाल करू लागली असल्याचे चित्र आहे. लोकसभेचे एकूण संख्याबळ ५४३ इतके असून ‘एनडीए’ची या सदनातील खासदारांची संख्या २९४ इतकी आहे. ‘तृणमूल’च्या २० बंडखोर खासदारांचा पाठिंबा गृहित धरला तर हे संख्याबळ ३१४ वर जाते. ‘तृणमूल’च्या बंडखोर खासदारांच्या पाठिंब्यानंतर देखील ‘एनडीए’ला दोन तृतीयांश बहुमतासाठी ४९ जागा कमी पडतात. सध्या सुरू असलेल्या घडामोडीमुळे ‘इंडिया’ आघाडीचे कनिष्ठ सदनातले संख्याबळ २३७ वरून १९१ पर्यंत कमी झाले आहे.मागील काही काळात द्रमुक आणि आम आदमी पक्षाने (आप) ‘इंडिया’ आघाडीपासून फारकत घेण्याचा निर्णय घेतला होता. विरोधी पक्षांमध्ये काँग्रेसकडे सर्वाधिक ९८ तर ‘सप’कडे ३७ खासदार आहेत. याशिवाय शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडे नऊ तर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडे आठ खासदार आहेत.

अधिक वाचा  बिल न भरल्यास मृतदेह अडवण्यावरचा चाप उठणार? रुग्णांच्या हक्कांवर गदा आणणाऱ्या नव्या विधेयकावर टीका

राज्यसभेच्या संख्याबळात वाढ राज्यसभेचा विचार केला तर १८ जून रोजी होणाऱ्या निवडणुकीनंतर ‘एनडीए’चे वरिष्ठ सदनातले संख्याबळ १४८ वरून १५२ पर्यंत वाढू शकते. पश्‍चिम बंगालमधील तीन सदस्यांनी अलीकडेच राजीनामा दिला होता. याठिकाणी भविष्यात भाजपच्या उमेदवारांनी निवडणूक जिंकली तर ही संख्या १५५ पर्यंत जाते.अशावेळी वरिष्ठ सदनात ‘एनडीए’ला दोन तृतीयांश बहुमतासाठी केवळ आठ सदस्यांची गरज उरते. ‘इंडिया’ आघाडीचे वरिष्ठ सदनातले संख्याबळ ६३ पर्यंत कमी झाले आहे. विशेष म्हणजे महाराष्ट्रातील दोन प्रादेशिक पक्षांचे काही खासदार फुटणार असल्याच्या चर्चा आहेत. तसे झाले तर ‘इंडिया’ आघाडीला आणखी घरघर लागू शकते.

अधिक वाचा  छत्रपती संभाजी महाराजांची ‘मॉडर्न आर्ट’च्या नावे अवहेलना; नव्याने बसविलेल्या पुतळ्याचा वाद; शिवप्रेमी संघटना आक्रमक