‘सुपर एल निनो’मुळे पाऊस लांबणार; उजनीतील पाणी पिण्यासाठी राखीव;  धरण उणे २१ टक्के, पाण्याचा निर्णय राज्य शासनाच्या हाती

0

राज्यात यावर्षी ‘सुपर एल निनो’च्या प्रभावामुळे सरासरीपेक्षा कमी पाऊस पडेल, असाही भारतीय हवामान विभागाचा अंदाज आहे मॉन्सूनचे महाराष्ट्रात आगमन साधारणपणे १० जून ते १५ जूनदरम्यान होण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तविली आहे. या पार्श्वभूमीवर उणे २१ टक्क्यांपर्यंत आलेल्या उजनी धरणातील पाणी आता पिण्यासाठीच राखीव ठेवण्याचा निर्णय झाला आहे.

गतवर्षीच्या पावसाने उजनी धरण १०० टक्के भरले होते. डिसेंबरअखेर धरणात ११३ टीएमसीपर्यंत पाणीसाठा होता. त्यावेळी सरासरीपेक्षा जास्त पाऊस झाल्याने आणखी एक उजनी भरेल इतके पाणी नदीद्वारे सोडून द्यावे लागले. यंदाच्या कडक उन्हाळ्यात उजनीतून शेतीसाठी सलग दोन महिने पाणी सोडले गेले. २३ एप्रिल रोजी भीमा नदीतही पाणी सोडण्यात आले. आता कालव्यांतून व नदीतून पाणी सोडणे बंद झाले आहे. करकंब परिसरातील कालव्यात उजनीचे पाणी सुरू आहे, पण १० जूननंतर धरणातील पाणी पिण्यासाठीच राखीव ठेवले जाणार आहे.

अधिक वाचा  पुणे शहरात 42 टक्के मतदारांची नावे वगळली जाणार आठ मतदारसंघ प्रारूप मतदार यादीनुसार वगळलेली मतदारांची संख्या

१ मे रोजी धरणात ५५.५७ टीएमसी मृत पाणीसाठा (उणे १५.११ टक्के) होता. ३१ मे रोजी धरणातील मृत पाणीसाठा ५२.४१ टीएमसीपर्यंत (उणे २१ टक्के) खाली आला आहे. कडक उन्हामुळे पाण्याचे बाष्पीभवनदेखील मोठ्या प्रमाणावर झाले आहे. सुपर एल निनोच्या प्रभावामुळे यंदाचा मॉन्सून लांबणीवर पडण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तविल्याने धरणातील पाणीसाठा पिण्यासाठी राखून ठेवला जाणार आहे. भविष्यात पाऊस लांबल्यास भीमा नदीत पाणी सोडण्याची वेळ आल्यास त्याचा निर्णय राज्य शासन घेईल, असेही अधिकाऱ्यांनी सांगितले.

आता पाण्याचा निर्णय राज्य शासनाच्या हाती

उजनी धरणातून २३ एप्रिलपासून भीमा नदीत पाणी सोडले. त्यापूर्वी कालव्यांद्वारे शेतीसाठी पाणी सोडले आहे. आता धरणातील पाणी पिण्यासाठीच राखीव राहील. धरण उणे २१ टक्क्यांवर गेल्याने कालव्यातून पाणी सोडता येणार नाही. पुढे नदीतून पाणी सोडण्याचा निर्णय राज्य शासनामार्फतच होईल.

अधिक वाचा  पीएमआरडीएसमोर ७३५ हेक्टर भूसंपादनाचा मोठा पेच! ४४ कोटींचा निधी वर्ग संमती न देणाऱ्यांचे सक्तीने भूसंपादन

– एस. एस. खांडेकर, अधीक्षक अभियंता, लाभक्षेत्र विकास प्राधिकरण, सोलापूर

उजनी धरणातील सद्यस्थिती

सध्याचा पाणीसाठा : ५२.४० टीएमसी

पाण्याची टक्केवारी : उणे २१ टक्के

गतवर्षी पाणीसाठा : उणे २३ टक्के