वैभव सूर्यवंशीच्या ९७ धावा आणि जोफ्रा आर्चरच्या कमालीच्या गोलंदाजीच्या बळावर राजस्थान रॉयल्सने सनरायझर्स हैदराबाद संघावर ४७ धावांनी विजय मिळवला. या विजयासह हैदराबादचा संघ दुसऱ्या क्वालिफायरमध्ये गुजरात टायटन्सविरूद्ध भिडणार आहे. राजस्थानच्या विजयाचा सामनावीर ठरला विक्रमी खेळी केलेली वैभव सूर्यवंशी. वैभव त्याच्या खेळीबद्दल नेमकं काय म्हणाला, जाणून घेऊया….






आयपीएल २०२६ च्या एलिमिनेटर सामन्यात, राजस्थान रॉयल्सचा सलामीवीर वैभव सूर्यवंशीने क्रिकेट जगताला चकित करत एक धमाकेदार खेळी केली. त्याने सनरायझर्स हैदराबादच्या गोलंदाजांची अक्षरशः धुलाई करत अवघ्या २९ चेंडूंमध्ये ९७ धावा केल्या. मात्र, आयपीएलच्या इतिहासातील सर्वात जलद शतक पूर्ण करण्यापासून तो केवळ तीन धावा दूर राहिला.
राजस्थान रॉयल्सच्या विजयानंतर वैभव सूर्यवंशी काय म्हणाला?
सामन्याच्या विजयाचा आनंद साजरा करतोस की जे घडलं ते जाऊ देतोस, यावर वैभव म्हणाला, आम्ही विजय साजरा करतो, पण त्याचवेळी पुढच्या सामन्यावरही लक्ष केंद्रित करतो. जिंकताना जो सकारात्मक दृष्टिकोन असतो, तोच पुढच्या सामन्यातही कायम ठेवण्याचा प्रयत्न करतो. आमचं लक्ष्य आता फायनल गाठण्याचं आहे.
पुढील सामन्याबद्दलच्या मानसिकतेविषयी बोलताना तो म्हणाला, मी थोडा विचार करतो, पण जास्त नाही. मी फक्त सध्याचा सामना आणि माझा खेळ यावर लक्ष केंद्रित करतो. कुठे सुधारणा करण्याची गरज वाटली, तर त्यावर काम करतो.
सामन्यापूर्वी वैभव सूर्यवंशी खेळपट्टीच्या मागे उभा राहून सराव करत स्वत:शी बोलत असतो, याबद्दल बोलताना वैभवने सांगितलं, समोरच्या संघात कोणते गोलंदाज आहेत, या खेळपट्टीवर त्यांच्याविरूद्ध कसं खेळायचं, मैदानाच्या सीमारेषा किती मोठ्या आहेत, अशा गोष्टींचा विचार करतो. माझा हेतू नेहमी सकारात्मक ठेवण्याचा प्रयत्न असतो. मी आक्रमक खेळलो की गोलंदाजांवर दबाव येतो. त्यामुळे मी सामना नियंत्रित करण्याचा प्रयत्न करतो.
तू ज्या चेंडूवर बाद झाला, त्यावर तू विक्रम करणार होतास याची जाणीव होती का, असा प्रश्न विचारल्यावर वैभव म्हणाला, मी बाद झाल्यानंतरच मला त्याबद्दल समजलं. त्या क्षणी माझं पूर्ण लक्ष संघासाठी जास्तीत जास्त योगदान देण्यावर होतं. शतकं पुढेही होतील, पण सध्या आमचं मुख्य लक्ष्य ट्रॉफी जिंकणं आहे.
वैभव त्याच्या खेळीबद्दल पुढे म्हणाला, मला कुठे अडचण जाणवली, तर त्यावर मी काम करतो. विरोधी संघ काय योजना आखतोय, याचा मी फार विचार करत नाही. ती त्यांची रणनिती असते. माझं लक्ष माझ्या कामगिरीवर रणनितीवर असतं आणि मी फक्त साधं, नैसर्गिक क्रिकेट खेळण्याचा प्रयत्न करतो. वैभव सूर्यवंशी व राजस्थान रॉयल्सचा संघ आता २९ मे रोजी गुजरात टायटन्सविरूद्ध दुसरा क्वालिफायर सामना खेळताना दिसणार आहे.













