केंद्रातील भारतीय जनता पक्षाच्या विरोधात संपूर्ण देशात इतिहास घडवत सत्ता काबीज केलेल्या राज्यात सध्या अल्पमतातील सरकार बहुमतात आणण्यासाठी विविध चाली खेळल्या जात असून त्याचाच भाग म्हणून विरोधी पक्षात असलेल्या तीन आमदारांनी थेट मुख्यमंत्री यांच्याकडे राजीनामा देऊन त्यांच्या पक्षात प्रवेश केला आहे. मुख्यमंत्री विजय यांच्या नेतृत्वाखालील टीव्हीके सरकार सत्तेत आल्यानंतर आता विरोधी पक्ष एआयडीएमकेला मोठा धक्का बसला आहे. तामिळनाडूच्या राजकारणात मोठी उलथापालथ पाहायला मिळत आहे.






एआयडीएमकेच्या तीन आमदारांनी अचानक आमदारकीचा राजीनामा देत टीव्हीके पक्षात प्रवेश केला आहे. या घडामोडीमुळे राज्याच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे. मधुरंतकमचे मरगथम कुमारेसन, धारापुरमच्या सत्यभामा आणि पेरुंदुरईचे जयकुमार यांनी विधानसभा अध्यक्षांकडे आपले राजीनामे सादर केले. त्यानंतर त्यांनी मुख्यमंत्री विजय यांच्या उपस्थितीत टीव्हीके पक्षात प्रवेश केला. विशेष म्हणजे या तिघांमध्ये दोन महिला आमदारांचा समावेश आहे.
तामिळनाडू विधानसभा निवडणुकीत टीव्हीके पक्षाने १०७ जागांवर विजय मिळवत सत्ता स्थापन केली होती. तर एडप्पाडी के. पलानीस्वामी यांच्या नेतृत्वाखाली एआयडीएमकेला ४७ जागांवर समाधान मानावे लागले होते. आता तीन आमदारांनी पक्ष सोडल्याने एआयडीएमकेची ताकद आणखी कमी झाली आहे. या राजीनाम्यांमुळे संबंधित मतदारसंघांमध्ये पोटनिवडणुका होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. या जागांवर टीव्हीकेने विजय मिळवला, तर मुख्यमंत्री विजय यांच्या सरकारला स्पष्ट बहुमताचा आकडा गाठणे अधिक सोपे होणार आहे.
दरम्यान, विजय सरकार मंत्रिमंडळ विस्तारात एआयडीएमकेतील काही आमदारांना संधी देणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू होती. यावरून डाव्या पक्षांनी नाराजी व्यक्त करत सरकारचा पाठिंबा काढून घेण्याचा इशाराही दिला होता. दुसरीकडे, एआयडीएमकेने तातडीने कारवाई करत पक्षविरोधी भूमिका घेतल्याचा ठपका ठेवत तिन्ही आमदारांना निलंबित केले आहे.













