महापालिकेच्या नियोजनशून्य कारभाराचा फटका शुक्रवारी सकाळी पुणेकरांना बसला. पाणीपुरवठा गुरुवारी बंद ठेवूनही शुक्रवारी सकाळी तो सुरळीत करण्यात महापालिका अपयशी ठरल्याने नागरिकांचा संताप उफाळून आला. घरात थेंबभर पाणी शिल्लक नसल्याने अनेकांना सकाळचे दैनंदिन विधीही करता आले नाहीत.






शहरात सुमारे ३० ठिकाणी दुरुस्तीची कामे करण्यात आली. धरण स्रोत व ट्रान्समिशन लाईनवरील मोठ्या कामांमुळे जलवाहिन्या पूर्णपणे रिकाम्या झाल्या. मात्र याचे अचूक नियोजन न केल्याने त्याचा फटका थेट नागरिकांना बसला.
सकाळी ७-८ वाजेपर्यंत पाणी येण्याची सवय असलेल्या पुणेकरांना आज मात्र नळ कोरडेच पाहायला मिळाले. परिणामी अनेकांनी सकाळीच टॅंकर मागविण्याचा प्रयत्न केला; पण अचानक वाढलेल्या मागणीमुळे टॅंकरही उशिरा मिळाले. काही ठिकाणी टॅंकरसाठी नागरिकांची धावपळ उडाली.
घरात पाणी नसल्याने लहान मुलांपासून वृद्धांपर्यंत सर्वांचीच गैरसोय झाली. विशेषतः नोकरदार वर्ग आणि विद्यार्थ्यांची मोठी अडचण झाली. ऑफिस आणि काॅलेजला जाण्याची वेळ जवळ आली तरी पाणी उपलब्ध नसल्याने अनेकांचे वेळापत्रक कोलमडले.
दरम्यान, पाणीपुरवठा विभागाच्या अधिकाऱ्यांना सकाळपासून नागरिकांच्या फोनचा अक्षरशः भडिमार सहन करावा लागला. तरीही ठोस उत्तर मिळत नसल्याने नागरिकांमध्ये नाराजी वाढली.
महापालिकेच्या म्हणण्यानुसार, धरणावरील व्हॉल्व्ह बदलणे आणि मोठ्या व्यासाचे वॉटर मीटर बसविणे अशी कामे करण्यात आली. मात्र अनपेक्षित अडचणींमुळे विलंब झाल्याचे सांगण्यात आले. सर्व जलवाहिन्या आणि पाण्याच्या टाक्या रिकाम्या असल्याने प्रणाली पूर्ववत करण्यास वेळ लागणार आहे.
प्रशासनाच्या माहितीनुसार, दुपारी १२ नंतर टप्प्याटप्प्याने पाणीपुरवठा सुरू होणार असला तरी पूर्णपणे सुरळीत होण्यासाठी आणखी विलंब होण्याची शक्यता आहे. दरम्यान, “नियोजनाचा बोजवारा उडाल्याने आम्हाला त्रास सहन करावा लागत आहे,” अशी संतप्त प्रतिक्रिया नागरिकांकडून व्यक्त होत आहे.













