डॉ. बाबासाहेबांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या कोलमांडले येथे स्मारक उभारण्याचा निर्णय

0

श्रीवर्धन दि. ५ (रामदास धो. गमरे) समाजातील विषमता नष्ट करून समानतेचा मार्ग दाखवणारे पुजनीय बोधीसत्व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी २५ डिसेंबर १९२७ रोजी महाड येथे मनुस्मृती ग्रंथाचे जाहीर दहन करून सामाजिक क्रांतीची ठिणगी पेटवली. महिलांना स्वातंत्र्यापासून दूर ठेवणाऱ्या आणि त्यांच्या अधिकारांवर गदा आणणाऱ्या व्यवस्थेविरोधात उभे राहत त्यांनी या ऐतिहासिक कृतीतून स्त्री-पुरुष समानतेचा नवा अध्याय सुरू केला. देशाला राजकीय स्वातंत्र्य मिळण्यापूर्वीच महिलांना सामाजिक हक्क आणि स्वाभिमानाचा अधिकार मिळवून देणारी ही घटना इतिहासात “महिला मुक्ती दिन” म्हणून ओळखली जाते. या ऐतिहासिक घटनेच्या पूर्वसंध्येला, म्हणजेच २४ डिसेंबर १९२७ रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर महाडकडे प्रयाण करत असताना श्रीवर्धन तालुक्यातील कोलमांडले गावात काही काळ वास्तव्यास आले होते. त्या काळात महाडच्या चवदार तळे सत्याग्रहाच्या पार्श्वभूमीवर बाबासाहेबांच्या दौऱ्याला मोठे ऐतिहासिक महत्त्व प्राप्त झाले होते. त्यांच्या आगमनाची माहिती मिळताच कोलमांडले परिसरातील नागरिकांनी उत्स्फूर्तपणे स्वागताची तयारी केली होती. स्थानिक कार्यकर्त्यांनी आणि गावकऱ्यांनी बाबासाहेबांचे मोठ्या आदराने स्वागत केले आणि त्यांच्या विचारांना पाठिंबा व्यक्त केला. त्या ऐतिहासिक भेटीमुळे कोलमांडले ही भूमी बाबासाहेबांच्या पदस्पर्शाने पावन झाल्याचे मानले जाते.

अधिक वाचा  मुळशीकरांचा एकजुटीचा निर्धार : मुळशीची बदनामी थांबवण्यासाठी लोकचळवळ उभारण्याचे आवाहन

या ऐतिहासिक घटनेची नोंद कायम स्मरणात राहावी आणि पुढील पिढ्यांना प्रेरणा मिळावी, या उद्देशाने श्रीवर्धन तालुक्यातील तब्बल ४८ गावांतील विविध संघटना एकत्र येऊन कोलमांडले येथे स्मारक उभारण्याचा निर्णय घेतला आहे. या स्मारकाच्या माध्यमातून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या समता, स्वाभिमान आणि मानवमुक्तीच्या विचारांचे स्मरण कायम राहील, अशी भावना या वेळी व्यक्त करण्यात आली.

दरम्यान, दि. १ एप्रिल २०२६ रोजी दादर येथील वनमाळी सभागृहात झालेल्या जाहीर सभेत या स्मारक उभारणीसाठी कार्यकारी मंडळाची एकमताने निवड करण्यात आली. या बैठकीत अध्यक्षपदी किशोर मोरे यांची निवड झाली असून उपाध्यक्ष म्हणून एस. के. खैरे, प्रदीप मोहिते, विद्यानंद पवार आणि संजय मोरे यांची निवड करण्यात आली. सरचिटणीस म्हणून संजयकुमार खैरे, तर चिटणीस म्हणून संतोष तांबे, किरण जाधव आणि किशोर पवार यांची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. कोषाध्यक्षपदी सुरेंद्र यादव यांची निवड झाली असून उपकोषाध्यक्ष म्हणून मनोहर जाधव यांची निवड करण्यात आली आहे. अंतर्गत हिशोब तपासणीसाठी अरुण जाधव आणि मिलिंद तांबे यांची निवड करण्यात आली आहे. कार्यकारिणी सभासद म्हणून प्रा. संजय खैरे, संदीप जाधव, मिलिंद शिर्के, कुशानंद हळदे, संजय कुडवळकर, राजीव येलवे, शेखर कासारे आणि राहुल मोरे यांचा समावेश आहे.

अधिक वाचा  दोन अनाथ विद्यार्थिनींना कोंडलं, Whatsapp Status अन्… रात्रभर पुण्यात राडा; काँग्रेस-भाजपामध्ये नेमकं घडलं काय? A To Z माहिती

नवनिर्वाचित कार्यकारिणीच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी या ऐतिहासिक स्मारक प्रकल्पाला पूर्णत्वास नेण्याची सामूहिक शपथ घेतली. सामाजिक आणि धार्मिक क्षेत्रात कार्य करणाऱ्या व्यक्तींचा कार्यकारिणीत समावेश झाल्यामुळे या उपक्रमाचे सर्व स्तरातून स्वागत होत आहे. बाबासाहेबांच्या विचारांची आठवण जपणारे हे स्मारक उभारण्याचा संकल्प तालुक्यातील विविध संघटनांनी एकत्र येऊन केला असल्याने हा उपक्रम सामाजिक ऐक्याचे प्रतीक ठरणार असल्याची भावना व्यक्त होत आहे.