राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या महिला प्रदेशाध्यक्ष रूपाली चाकणकर यांच्या महिला आयोगपदावरून गच्छंती झाल्यानंतर ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांच्याकडून कोणती भूमिका घेतली जाणार याकडे लक्ष असतानाच छगन भुजबळ यांच्याकडून व्यक्त केलेल्या भूमिकेमुळे सध्या नवी चर्चा सुरू झाली आहे. “अंधश्रद्धेपासून दूर राहिलं पाहिजे असं माझ मत आहे. मंदिरं आहेत, ध्यानधारणा करा, योगा करा, दर्शन घ्या. काही चांगलं काम करणारे गुरुजी आहेत. जे समाजाची सेवा करतात. पण अशा काही लोकांमुळे सगळेच एकजात बदनाम होतात” असं छगन भुजबळ भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणावर म्हणाले.






“नाशिक परिसरातील भोंदूबाबा अशोक खरात यांच्याकडे बरीच मोठमोठी मंडळी येत होती. पुणे परिसरात कार्यरत असलेल्या रुपाली चाकणकर यांना याबाबत काय माहित? त्यांना सुद्धा अशोक खरात यांच्याकडे कोणीतरी नेलं असेल. पण राजकारणामध्ये, समाज कारणामध्ये असलेल्या लोकांनी या सगळ्याच्या बाबतीत मला असं वाटतं की, काही सीमा आखून ठेवल्या पाहिजेत. कारण आपण जे करतो त्याचा परिणाम जनतेवर होतो. कारण आम्ही पुढारी आहोत. मंत्री जातात मग आपण जायला काय हरकत आहे?” अशी सर्वसामान्य माणसाची धारणा होत असल्याने अशा लोकांना पाठबळ मिळत असल्याचे छगन भुजबळ बोलले.
समाज माध्यमांमध्ये यावर सध्या तीव्र प्रतिक्रिया सुरू असल्या तरीसुद्धा “पोलीस आता चौकशी करत आहेत. त्यातून सत्य बाहेर येईलच. त्यांनी आणखी काही चुकीच्या गोष्टी केल्या असतील तर पोलीस 100% कारवाई करतील” असं छगन भुजबळ म्हणाले. अशोक खरात यांच्या संस्थांवर रुपाली चाकणकर सदस्यपदी होत्या. या प्रश्नावर भुजबळ यांनी “आता सतत आपण जायला लागलो, एखाद्याला मदत करायला लागलो तर कोणीतरी संस्थेवर घेतात. मोठा माणूस आहे, आपल्याला पदाचा फायदा होईल, मदत होईल म्हणून संस्थेवर घेतात” अशी भूमिका घेऊन एक प्रकारे सर्वच राजकीय पक्षांच्या पदाधिकाऱ्यांची पाठराखण करण्याचा प्रयत्न केला आहे.
महिला प्रदेशाध्यक्ष पदावरुन हटवणार का?
रुपाली चाकणकर या राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला प्रदेशाध्यक्ष आहेत. त्यांना त्या पदावरुन सुद्धा हटवणार का? या प्रश्नावर सुद्धा छगन भुजबळ यांनी उत्तर दिलं. “महिला आयोग अध्यक्ष हे शासकीय पद आहे. आयोगाचा संबंध सरकारशी येतो. यात मुख्यमंत्री आहेत. त्यांच्या बरोबर चर्चा करुन उपमुख्यमंत्र्यांनी निर्णय घेतला असेल. आता महिला प्रदेशाध्यक्षपद या बाबत निर्णय घेण्याचा अधिकार पक्षाला आहे. त्यात शासन येत नाही. आता त्या बाबतीत काय करायचं? हे पक्षश्रेष्ठी आणि सुनेत्राताई सर्व मंडळी बसून ठरवतील”
लगेच राजीनामा का घेतला नाही?
रुपाली चाकणकर यांचा लगेच राजीनामा घेतला नाही, यावरही छगन भुजबळ बोलले. “एखादा आरोप झाल्यानंतर त्यात किती तथ्य आहे हे समजून घेतलं पाहिजे. सुनेत्राताईंना आम्हाला अनेक काम असतात. त्यातून हे सर्व पहायचं असतं. सत्यता तपासल्याशिवाय राजीनामा घेणं योग्य ठरत नाही. माहिती घेतली असेल. चर्चा झाली असेल. हे महत्वाचं पद आहे” असं छगन भुजबळ म्हणाले.











