महापालिकेकडून कनिष्ठ अभियंत्यांची १६९ जागांची भरती नवीन परीक्षा केंद्राच्या तारखा मिळविण्यासाठी तूर्त स्थगित केली आहे. याचा गैरफायदा घेत काहीजण महापालिकेत येऊन परीक्षेसंदर्भातील गोपनीय माहिती काढत आहेत. या लुडबुडीमुळे गोपनीयतेचा प्रश्न निर्माण होत आहे.






महापालिकेत कनिष्ठ अभियंत्यांची कमतरता असल्याने विविध विभागांची कामे करताना ताण निर्माण होत आहे. त्यामुळे महापालिका प्रशासनाने कनिष्ठ अभियंता भरतीवर जोर दिला आहे. यापूर्वी २०२२ मध्ये १३५ कनिष्ठ अभियंत्यांची भरती झाली. त्यानंतर आता १६९ जागांसाठी भरती प्रक्रिया सुरू करून दोन वर्षांपेक्षा जास्त कालावधी उलटून गेला आहे.
या परीक्षेसाठी ४२ हजारांपेक्षा जास्त उमेदवारांचे अर्ज प्राप्त झाले आहेत. ही प्रक्रिया लवकर न झाल्याने लोकसभेनंतर विधानसभा निवडणुकीच्या आचारसंहितेत परीक्षा अडकली. त्यानंतर ‘आयबीपीएस’ संस्थेबरोबरचा करार नूतनीकरण करणे व अन्य कारणाने परीक्षा महापालिका निवडणुकीच्या पूर्वी होऊ शकली नाही.
‘टीसीएस’चे केंद्र सलग तीन दिवस उपलब्ध व्हावे, अशी मागणी महापालिकेने केली आहे. मात्र, जूनपर्यंत सलग तीन दिवस केंद्र उपलब्ध होणार नाही. सर्व तारखा बुक झाल्या आहेत, असे कळविल्याने परीक्षा किमान साडेतीन महिने होणार नाही, हे स्पष्ट झाले आहे. एकीकडे परीक्षा लांबणीवर पडलेली असताना, दुसरीकडे सेवक वर्ग विभागात काही जणांकडून परीक्षा कधी होणार, कशी होणार, कोण घेणार, यासंदर्भात वारंवार माहिती विचारली जात आहे. त्यामुळे परीक्षेची गोपनीय माहिती फुटण्याची शक्यता झाली आहे. महापालिकेची सर्व यंत्रणा ऑनलाइन असल्याने उमेदवारांना ई-मेल, एसएमएसद्वारे वेळोवेळी माहिती दिली जाते. असे असताना काही जणांकडून माहिती विचारून प्रक्रियेवर प्रभाव टाकण्याचा प्रयत्न केला जात आहे.
‘कनिष्ठ अभियंता पदाची परीक्षा पुढे ढकलण्यात आली आहे. ही परीक्षा ‘टीसीएस’च्या केंद्रांवर घ्यावी, अशी उमेदवारांची मागणी आहे. मात्र, जूनपर्यंत केंद्राच्या तारखा उपलब्ध नाहीत. त्यामुळे त्यानंतरच परीक्षा होईल. सेवक वर्ग विभागात जे लोक वारंवार चौकशीसाठी येतात, त्यांचा हस्तक्षेप होऊ दिला जाणार नाही. परीक्षा पारदर्शकपणे पार पडेल.
– विजयकुमार थोरात, उपायुक्त, सेवक वर्ग विभाग










