मुंबई दि. २० (रामदास धो. गमरे) बौद्धजन पंचायत समिती संलग्न संस्कार समिती यांच्या संयुक्त विद्यमाने महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांचा ३९६ वा जयंती महोत्सव उपसभापती विनोद मोरे यांच्या अध्यक्षतेखाली डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक सभागृह, परेल, मुंबई – १२ येथे मोठ्या उत्साहात संपन्न झाला, सदर प्रसंगी विनोद मोरे यांनी महापुरुषांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण केले तर कार्याध्यक्ष लक्ष्मण भगत यांनी शिवाजी महाराजांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण केले तर सरचिटणीस राजेश घाडगे यांनी ज्योत प्रज्वलित करून कार्यक्रमास प्रारंभ झाला, संस्कार समितीचे चिटणीस मनोहर बा. मोरे गुरुजी यांनी आपल्या गोड वाणीने पूजाविधी संपन्न केला, तद्नंतर राजेश घाडगे यांनी शिवरायांच्या जीवन चरित्रावर प्रकाश टाकत असताना “शिवाजी महाराजांनी अंधश्रद्धा कधीच मानली नाही अमावस्येच्या रात्री स्वाऱ्या करून त्यांनी अनेक किल्ले जिंकले, त्यांनी सर्व जाती धर्माच्या लोकांना आपल्या सैन्यात सामावून घेऊन त्यांच्यावर विश्वास ठेवून त्याच विश्वासावर शिवाजी महाराजांनी स्वराज्याची स्थापना केली. गौतम बुद्धांनी अहिंसा, करुणा, समता, न्याय, प्रज्ञा, शील याचा संदेश दिला या मूलभूत तत्वांचा शिवाजी महाराजांनी आपल्या राजकीय कारकिर्दीत अंगीकार केला. महाराजांनी सर्व धर्मांना समान आदर व सन्मान दिला, त्यांनी मंदिरा सोबतच मशिदी, दर्गा यांना ही संरक्षण दिले, जबरी धर्मांतराला विरोध केला, स्त्रियांचा सन्मान केला, युद्धात पराभूत झालेल्या शत्रूंच्या महिलांना ही त्यांनी सन्मान व संरक्षण दिले ही करुणा, नैतिकता बुद्धांच्या शिकवणीशी सुसंगत आहे, शिवाजी महाराजांनी प्रजेवर अन्याय होऊ नये म्हणून कडक कायदे केले, स्वराज्य हे लोकांचे राज्य असून लोककल्याण, सुरक्षितता, सुव्यवस्था व बुद्ध विचारावर आधारित राज्यसंहिता बनवून राज्य चालवले” असे नमूद करीत १६३० ते १६८० या कालखंडातील शिवरायांच्या जीवन चरित्राचा आढावा घेत सर्वांना मार्गदर्शन करून शिवाजी महाराजांचा आदर्श डोळ्यांसमोर ठेवून नवीन पिढीने वाटचाल करावी असे मत मांडले. त्याचबरोबर कार्याध्यक्ष लक्ष्मण भगत, शिक्षण समितीचे माजी चिटणीस तुळशीराम शिर्के, विवाह मंडळाचे अध्यक्ष राजाभाऊ तथा रामदास धो. गमरे यांनी देखील आपले विचार व्यक्त करून उपस्थितांना मार्गदर्शन केले.






अध्यक्षीय भाषणात विनोद मोरे यांनी “छत्रपती शिवाजी महाराजांनी धैर्य, शौर्य, सुज्ञ प्रशासन आणि लोकहिताची तत्वे यावर आधारित स्वराज्याची स्थापना केली, त्यांचा मुख्य उद्देश स्वाभिमानी, सुरक्षित, न्याय राज्य निर्माण करणे हा होता राज्य कारभार सुरक्षित चालावा म्हणून अष्टप्रधानमंडळ स्थापले, स्वराज्याच्या रक्षणासाठी त्यांनी अनेक किल्ले बांधले व अनेक किल्ले जिंकले त्यात रायगड, प्रतापगड हे स्वराज्याचे आधारस्तंभ होते, शत्रूवर तो गाफील असताना अचानक हल्ला करणे त्याला गोंधळात टाकने ही त्यांची खास रणनीती होती, गनिमी कावा करून ते शत्रूवर विजय प्राप्त करीत असत परंतु काही प्रसंगी त्यांना दगा फटका ही केला त्याच्या वेदना ही त्यांनी सहन केल्या. त्यांचा मुलगा छत्रपती संभाजी महाराज यांना ही दगा फटका देऊन शत्रूच्या स्वाधीन करण्यात आल व मनुस्मृती नुसार त्यांचे हालहाल करून त्यांना मारण्यात आले परंतु आपल्या राजाची माहिती मिळताच त्यावेळच्या महार बांधवांनी आपल्या राजाचे तुकडे गोळा करून ते शिवून त्यांना अग्निसंस्कार करून त्यांना मानवंदना दिली. स्वराज्याची जडणघडण करीत असताना प्रजेची काळजी घेणे, महिलांची सुरक्षितता राखणे हे त्यांचे वैशिष्टे होती, त्यांनी अंधश्रध्देला कधीच थारा दिला नाही, अश्या या महान रयतेच्या राजाचा आदर्श डोळ्यांसमोर ठेवून आपण चालले पाहिजे, बाबासाहेबांनी ही शिवाजी महाराजांना आदर्श मानले होते रायगडावर शिवाजी महाराजांना मानवंदना करण्यासाठी जात असताना काही सनातनी समाकंटक हल्ला करण्यासाठी रायगडाच्या खिंडीत लपले होते परंतु बाबासाहेबांच्या अनुयायींनी ही बातमी कळताच त्यांनी त्या ठिकाणी धाव घेऊन सनातन्यांच्या डाव उध्वस्त केला त्यानंतर बाबासाहेबांनी शिवाजी महाराजांच्या समाधीचं दर्शन घेतल व रायगडाच्या पायथ्याशी उतरून पाण्याला आग लावीत मानवतेचा लढा यशस्वी केला बाबासाहेबां प्रमाणेच शिवाजी महाराजांची ही जयंती आपण मोठ्या उत्साहात साजरी करावी” असे त्यांनी आपल्या भाषणात स्पष्ट केले. सरतेशेवटी मनोहर बा. मोरे यांनी सदर कार्यक्रम यशस्वीपणे पार पाडण्यासाठी अथक परिश्रम घेणाऱ्या सर्वांचे, उपस्थित मान्यवरांचे, उपासक, उपसिकांचे आभार मानून कार्यक्रमाची सांगता केली.











