बौद्धजन पंचायत समितीच्या वतीने सुभेदार रामजी बाबा आंबेडकर यांचा स्मृतिदिन संपन्न

0

मुंबई दि. ३ (रामदास धो. गमरे) विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे वडील सुभेदार रामजी मालोजी सकपाळ तथा आंबेडकर यांचा ११३ वा स्मृतिदिन बौध्दजन पंचायत समितीचे उपभापती विनोद मोरे यांच्या अध्यक्षतेखाली बौद्धजन पंचायत समिती केंद्रीय कार्यालय, डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक सभागृह, भोईवाडा, परेल, मुंबई – १२ येथे संपन्न झाला.

सदर प्रसंगी विनोद मोरे यांनी रामजी बाबांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले तर कार्याध्यक्ष लक्ष्मण भगत यांनी ज्योत प्रज्वलित करून पुष्पसुमन अर्पण केली व उपकार्याध्यक्ष मनोहर सखाराम मोरे यांनी उदबत्ती प्रज्वलित केली तद्नंतर सरचिटणीस राजेश घाडगे यांनी आपल्या भारदस्त व पहाडी आवाजात लाघवी भाषाशैलीत कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व प्रास्ताविक केले, प्रास्ताविक सादर करीत असताना रामजी बाबांच्या जीवनपटाचा आढावा घेत असताना त्यांनी “रामजी बाबा आंबेडकर यांनी त्याकाळी मोठे कष्ट करून बाबासाहेबाना घडविले त्यामुळे विश्वरत्न बाबासाहेब आंबेडकरांनी तुम्हा आम्हा सर्वांना घडविले, रामजी बाबांच्या महान कार्याचा विचार करीत असता आपण त्यातील काही अंश जरी आत्मसात करून त्यानुसार वागलो व नवीन पिढीला घडविण्याच्या प्रयत्न केला तर त्यांना खऱ्या अर्थाने श्रद्धांजली अर्पण केली अस होईल असे मला वाटते” असे नमूद केले. तद्नंतर समितीचे कार्यसम्राट कार्याध्यक्ष लक्ष्मण भगत यांनी आपल्या भाषणात “रामजी बाबा मिलिटरी मधून रिटायर झाल्यावर १९०४ साली मुंबई शहरात डबक चाळीत आले परंतु आपला भिवा इकडच्या एकंदर परिस्थिती मध्ये शिक्षणावर लक्ष केंद्रित करू शकणार नाही व त्याच शिक्षण अपूर्ण राहील हे लक्षात आल्यावर त्यांनी परळ दामोदर हॉल येथील बीआयटी (BIT) चाळीत क्र. १ मध्ये रूम क्र. ५० व ५१ मध्ये आपला परिवार स्थलांतरित केला. त्याठिकाणी ही बाबासाहेबाना रामजी बाबांचा सहवास जास्त काळ लाभला नाही १९१३ सालीच रामजी बाबा बाबासाहेबाना सोडुन परलोकी गेले, बाबासाहेबांनी १९१२ ते १९३४ असे तब्बल २२ वर्षे त्याठिकाणी वास्तव केलं आणि तिथूनच बाबासाहेबांनी आपल्या समाजासाठी देशासाठी अनेक कामे केली त्यातूनच अनेक घटना-घडामोडी घडल्या परंतु यासर्वा मागे रामजी बाबांची दूरदृष्टी होती” असे विचार व्यक्त करून त्यांनी रामजी बाबांना अभिवादन केलं. त्यानंतर उपकार्याध्यक्ष मनोहर सखाराम मोरे यांनी ही आपले विचार व्यक्त करून रामजी बाबांना अभिवादन केले.

अधिक वाचा  अर्थसंकल्पीय अधिवेशनात हा मोठा कायदा होणार?गुजरातनंतर आता महाराष्ट्रातही सरकारकडून हालचालीही सुरू

अध्यक्षीय भाषणात उपसभापती विनोद मोरे यांनी “बाबासाहेबांचे वडील रामजी बाबा आंबेडकर हे कबीर पंथीय होते कबीरांच्या विचारांवर त्यांची श्रद्धा होती, ते स्वतः ही विचारवंत होते म्हणून बाबासाहेबांना त्यांनी अनेक ग्रंथ देऊन त्यांच्यात वाचनाची गोडी निर्माण करून दिली, ते सर्व मुलांना लवकर झोपण्याची सूचना करीत व पहाटे चार वाजता उठवून त्यांना अभ्यासाला बसवत, स्वतः जातीने लक्ष घालून त्यांचा अभ्यास करून घेत त्यामुळेच बाबासाहेबांनी तो आदर्श घेऊन स्वतः च्या कर्तुत्वावर समाजाला व देशाला दिशा देण्याच काम केले आहे म्हणून रामजी बाबांच्या महान कार्याचा विचार करून त्यानुसार आपण योग्य ती वाटचाल केली तर नवीन पिढीला घडविण्याच्या कार्यात थोडाफार हातभार लावता येईल.” असे मौलिक विचार व्यक्त करून रामजी बाबांना अभिवादन केले.

अधिक वाचा  उपमुख्यमंत्री अजित पवार विमान अपघात टीकेत वाढ; तांत्रिक तपासणी अंतिम टप्प्यात प्राथमिक अहवाल या दिवशी?

सदर कार्यक्रमास अतिरिक्त चिटणीस यशवंत कदम, विवाह मंडळाचे अध्यक्ष राजाभाऊ तथा रामदास धो. गमरे, निवडणूक अधिकारी मिलिंद जाधव, मंगेश पवार, हिशेब तपासनीस संतोष तांबे उर्फ सावरकर, राहुल कदम, पांडुरंग साळवी, गजानन तांबे, संजय मोहिते, प्रदीप तांबे विविध शाखांचे कार्यकर्ते, बौद्ध बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते या सर्व उपस्थितांनी बौद्धजन पंचायत समितीच्या वतीने रामजी बाबा आंबेडकर यांच्या पवित्र स्मृतिस अभिवादन करुन त्यांना मानवंदना दिली सरतेशेवटी सरचिटणीस राजेश घाडगे यांनी सर्वांचे आभार मानून कार्यक्रमाची सांगता केली.