कोथरूड विधानसभा मतदारसंघात चंद्रकांत दादा पाटील मिसिंग लिंक कनेक्ट करण्यासाठी रात्रंदिवस प्रयत्न करत आणि मासिक पाठपुरावा करत असतानाही भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणामार्फत सुतारवाडी-पाषाण राष्ट्रीय महामार्गालगत पुणे महापालिकेच्या सेवा रस्त्यावर(सर्विस रोड) आरएमसी प्लांट उभा करण्यात येत आहे. विशेष बाब म्हणजे या अतिक्रमानाच्या हाकेच्या अंतरावर मागील आठवड्यामध्ये महाराष्ट्र राज्याचे उच्च तंत्रज्ञान शिक्षण मंत्री चंद्रकांत दादा पाटील यांच्या वतीने मिसिंग लिंकचे थाटामाटात उद्घाटन करण्यात आले. पुणे महापालिका सध्या देहू रोड ते कात्रज बोगदा असा सेवा रस्ता सलग करण्याचा अट्टाहास करत असताना एनएचआयच्या वतीने बेकायदेशीरपणे सेवा रस्त्यावर रेडी मिक्स प्लांट सुरू करण्याचा घाट घालण्यात आला आहे. पाषाण तलावालगत असलेल्या पक्षी अभयारण्य तसेच या भागातील रहिवाशांना या काँक्रीट रेडीमिक्स प्लांटमुळे त्रास होणार असून, या प्लांट उभारणीला पर्यावरणप्रेमी नागरिकांनी विरोध दर्शवला आहे.






पुणे शहराच्या पश्चिम भागात विशेषता बालेवाडी चांदणी चौक वारजे कात्रज वाहतूक कोंडी दिवसेंदिवस वाढत असल्यामुळे कात्रज बोगद्यापासून देहूरोड पर्यंत दोन्ही महापालिकेच्या हद्दीमध्ये सेवा रस्ते पूर्ण करण्याचा संकल्प वारंवार राजकीय नेते करत असतानाच या सेवा रस्त्यावरच बरोबर मध्ये सदरील प्रकल्प सुरू होत असल्याने पुणे महापालिका अधिकारी कोणतीही भूमिका घेत नाहीत हे आश्चर्याचे आहे.
आरएमसी प्लांटची कार्यपद्धती पाहता या ठिकाणी आजूबाजूला असलेल्या नागरी वस्तीला लेक व्यूह सोसायटी, सिद्धटेक सोसायटी, शिवनगर, मुक्ता रेसिडेन्सी आदींना धुलीकण, सिमेंट कण याचा मोठ्या प्रमाणात त्रास होणार आहे. या परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात पक्षी व वन्यप्राणी आहेत, तसेच या प्लांटमुळे जैवविविधतेला देखील हानी पोहोचणार आहे. हजारो नागरिक पाषाण तलाव परिसरामध्ये सकाळ संध्याकाळी फिरण्यासाठी व पक्षी निरीक्षणासाठी येत असतात. पाषाण तलावालगतच काँक्रीट प्लांट उभारण्यात येत असल्याने याचा त्रास येथे येणाऱ्या नागरिकांना देखील सहन करावा लागणार आहे. त्यामुळे नागरी वस्तीमध्ये व अभयारण्यालगत पुणे महापालिका पर्यावरण विभागाने व महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने प्लांट उभारण्यास परवानगी देऊ नये, अशी मागणी करण्यात येत आहे.

प्लांट नागरिकांवर लादू नये
पुणे शहरात व वस्त्यांलगत असलेले अनेक आरएमसी प्लांट आरोग्याला अपायकारक असल्याने बंद करण्यात आले आहेत. त्यातच या ठिकाणी हा प्लांट उभारण्याचा घाट का घातला जात आहे. यामध्ये दिल्ली व वरिष्ठ पातळीवरील नावे घेतली जात असल्याने नेमका हा प्लांट सुरू करण्याचा प्रयत्न कोण करत आहे, हे लक्षात येत नाही. पर्यावरणाची हानी करणारा व आरोग्याला हानिकारक असलेला हा प्लांट नागरिकांवर लादण्यात येऊ नये.
आरएमसी प्लांट हा नागरी वस्तीपासून दूर असावा.
तसेच, या ठिकाणी शेजारीच पक्ष्यांसाठी आरक्षित असे अभयारण्य आहे. या ठिकाणी दूर-दूरवरून वेगवेगळे पक्षी येतात, त्यांच्यासुद्धा जीवनमानावर याचा परिणाम होऊ शकतो. या परिसरातील जैवविविधता धोक्यात येणार असून पाषाण तलावातील प्रदूषणदेखील वाढणार आहे. त्यामुळे येथे उभारण्यात येणारे प्लांटचे काम बंद करावे, अन्यथा महाराष्ट्र नवनिर्माण सेना सुतारवाडी ग्रामस्थ यांच्यावतीने तीव्र आंदोलन करण्यात येईल.













