गेल्या अनेक दिवसांपासून सर्वांचे लक्ष लागून असलेल्या नगरपालिका आणि नगरपंचायतींच्या निवडणुकीची आज घोषणा करण्यात आली असून यामुळे राज्याच्या नागरी भागातील राजकीय वातावरण ढवळून निघणार आहे.राज्यातील नगरपालिका आणि नगरपंचायतींची मुदत 2021 च्या डिसेंबर महिन्यात संपली असतांना देखील कोरोना असल्याने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लांबणीवर पडल्या. तर, यानंतर ओबीसी आरक्षणाच्या मुद्यामुळे निवडणुका वारंवार पुढे ढकलण्यात आल्या. यानंतर सर्वोच्च न्यायालयाने जानेवारी 2026 च्या अखेरपर्यंत सर्व स्थानिक स्वराज्य संस्था म्हणजेच नगरपालिका/नगरपंचायती; जिल्हा परिषद व पंचायत समित्या तसेच महापालिकांच्या निवडणुका घेण्याचे निर्देश दिले. यानुसार आज यातील पहिल्या टप्प्याची घोषणा करण्यात आली आहे.






राज्याचे मुख्य निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे यांनी आज सायंकाळी चार वाजता मुंबईत पत्रकार परिषद घेतली. यात त्यांनी राज्यातील एकूण 246 नगरपालिका आणि 42 नगरपंचायतींच्या निवडणुकांची घोषणा केली.
राज्यात निवडणुकीसाठी पात्र असलेल्या 246 नगर परिषदा आणि 42 नगर पंचायतींच्या निवडणुका होणार आहेत. यामध्ये 246 नगर परिषदेमध्ये दहा नव्या नगर परिषदांचा समावेश आहे तर 42 नगर पंचायतींमध्ये 15 नव्या नगर पंचायतींचा समावेश आहे. एकूण 6 हजार 859 सदस्य आणि 288 अध्यक्षांची निवड होणार आहे.
महत्वाच्या तारखा
नामनिर्देशन पत्र दाखल करण्यास सुरुवात- 10 नोव्हेंबर 2025
नामनिर्देशन पत्र दाखल करण्याची अंतिम मुदत– 17 नोव्हेंबर 2025
नामनिर्देशन पत्राची छाननी- 18 नोव्हेंबर 2025
अपील नसलेल्या ठिकाणी नामनिर्देशन पत्रावर माघारीची अंतिम मुदत- 21 नोव्हेंबर 2025
अपील असलेल्या ठिकाणी नामनिर्देशन पत्र अंतिम मुदत- 25 नोव्हेंबर 2025
मतदानाचा दिवस- 02 डिसेंबर 2025
मतमोजणीचा दिवस- 03 डिसेंबर 2025
एकूण मतदार व मतदान केंद्र
पुरुष मतदार- 53,79,931
महिला मतदार- 53,22,870
इतर मतदार- 775
एकूण मतदार- 1,07,03,576
एकूण मतदान केंद्र- सुमारे 13,355
एकूण जागा आणि आरक्षित जागा
निवडणूक होत असलेल्या नगर परिषदा- 246
निवडणूक होत असलेल्या नगरपंचायती- 42
एकूण प्रभाग- 3,820
एकूण जागा- 6,859
महिलांसाठी जागा- 3,492
अनुसूचित जातींसाठी जागा- 895
अनुसूचित जमातींसाठी जागा- 338
नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्गासाठी जागा- 1,821
नगरपररषद/ नगरपंचायतींची जिल्हा व विभागनिहाय संख्या
कोकण विभाग एकूण- 27: पालघर- 4 रायगड- 10 रत्नागिरी- 7 सिंधुदुर्ग- 4 ठाणे- 2
नाशिक विभाग एकूण- 49: अहिल्यानगर- 12 धुळे- 4 जळगाव- 18 नंदूरबार- 4 नाशिक- 11
पुणे विभाग एकूण- 60: कोल्हापूर- 13 पुणे- 17 सांगली- 8 सातारा- 10 सोलापूर- 12
छत्रपती संभाजीनगर विभाग एकूण- 52: छत्रपती संभाजीनगर- 7 बीड- 6 धाराशिव- 8 हिंगोली- 3 जालना- 3 लातूर- 5 नांदेड- 13 परभणी- 7
अमरावती विभाग एकूण- 45: अमरावती- 12अकोला- 6बुलढाणा- 11वाशीम- 5यवतमाळ- 11
नागपूर विभाग एकूण- 55 : भुंडारा- 4चंद्रपूर- 11गडचिरोली- 3गोंदिया- 4नागपूर- 27वर्धा- 6
दरम्यान आचार संहितेची ऑर्डर काढली आहे. मद्य आणि पैशाबाबत प्रतिबंधक उपाययोजना केल्या आहेत. पोलिसांना मार्गदर्शन केलं आहे. बँका आणि पतपेढ्याेच्या व्यवहारावर लक्ष आहे. व्हेकल आणि ट्रान्सपोर्टवरही आम्ही लक्ष ठेवून आहोत, असंही यावेळी निवडणूक आयोगानं म्हटलं आहे. मुख्य निवडणूक आयुक्तांनी केलेल्या घोषणेनुसार, आजपासून राज्यात आचारसंहिता लागू करण्यात आली आहे. निवडणुकीची अधिसूचना दिनांक 04 नोव्हेंबर रोजी जारी करण्यात येणार आहे. निवडणुकीच्या अर्ज भरण्याची मुदत ही 17 नोव्हेंबर पर्यंत राहणार असून अर्ज मागे घेण्याची मुदत 21 रोजीपर्यंत राहणार आहे. नगरपालिका आणि नगरपंचायतींसाठी दिनांक 02 डिसेंबर रोजी मतदान होणार असून निकाल 03 डिसेंबर या तारखेला लागणार आहे.
यंदा देखील लोकनियुक्त नगराध्यक्ष असल्याने या निवडणुकीत मोठी चुरस निर्माण होणार असल्याचे दिसून येत आहे. आज मुख्य निवडणूक आयुक्तांनी निवडणुकीची घोषणा केल्यामुळे राज्यातील नागरी भागात रणधुमाळी सुरू होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.













