पहलगाममध्ये हल्ला झाला त्यावेळी आम्ही अर्ध्या तासाच्या अंतराव होतो, दरड कोसळल्यामुळे पुन्हा पहलगामला पोचलो, तेथेही हॉटेल व्यावसायिकांनी मनमानी करून हॉटेलचे, जेवणाचे दर वाढवले. जीव मुठीत घेऊन रात्र काढली, दुसऱ्या दिवशी सकाळी निघालो, तेव्हा स्थानिक लहान मुले आमच्या वाहनांवर दगड मारत होते. जम्मूला पोचण्यापूर्वी ड्रायव्हरने रात्रीच्या सुमारास घाटातील अंधारात वाहने थांबवून जादा पैशांची मागणी केली. अशा अनेक संकटांना सामोरे जात, भितीच्या छायेमध्ये आम्ही ४८ पैकी ४० तास सलग प्रवास करून मुंबईमध्ये पोचलो आणि जीव भांड्यात पडला ! पर्यटनासाठी जम्मू व काश्मीरला गेलेल्या पुणेकरांना आलेला हा अनुभव अक्षरशः अंतर्बाह्य हादरवून टाकणारा ठरला.






पुणे वृत्तपत्र विक्रेता संघाचे अध्यक्ष विजय पारगे यांच्यासह पाच जणांचे कुटुंब जम्मू व काश्मीरच्या सौंदर्याचा अनुभव लुटण्यासाठी १६ एप्रिलला तिकडे गेले होते. 3 दिवस तेथील पर्यटनाचा आनंद घेतल्यानंतर परतीच्या प्रवासावेळी नेमके दरड कोसळल्याने लष्कराने महामार्ग वाहतूकीसाठी बंद करण्यात आला. तेथील हॉटेल व्यावसायिकांनी तत्काळ हॉटेलमधील निवास व खाण्यापिण्याचे दर प्रचंड वाढविले. त्यावेळी कोणाचीही मदत पारगे व त्यांच्यासमवेतच्या लोकांना मिळाली नाही. त्यामुळे रस्त्यावर राहण्यापेक्षा पुन्हा एकदा पहलगाममधील हॉटेलमध्ये मुक्काम करण्यासाठी ते पोचले. तिथेही पुन्हा तोच असहकार्याचा अनुभव त्यांना आला. शिवाय पर्याय नव्हता. त्यामुळे सर्वजण सोफोने माघारी फिरण्याशिवय पर्याय नव्हता. तब्बल ८० किलोमीटरचा प्रवास करून २१ एप्रिल रोजी सर्वजण पहलगाममध्ये पोचले.
तिथे कशीबशी रात्र काढून, पहाटे पाच वाजता सर्वजण दोन वाहनांमधून पुन्हा परतीच्या प्रवासाला निघाले. ५० किलोमीटर अंतर कापल्यानंतर पुन्हा वाहतूक कोंडीमध्ये त्यांची वाहने अडकली. पहलगाम सोडून फक्त अर्धा तासच झाला, त्याचवेळी पारगे यांना पुण्याहून आप्तेष्टांचे फोन आले. पहलगामध्ये दहशतवादी हल्ला झाल्याचे व त्यांची काळजीपोटी विचारपूस करण्यात आली. पारगे यांच्या शेजारीच राहणाऱ्या संतोष जगदाळे यांना दहशतवाद्यांनी गोळ्या घातल्याचे त्यांना कळले. त्यानंतर दोन्ही वाहनांमधील सर्वजण अक्षरशः हादरून गेले. जम्मू विमानतळाकडे त्यांचा प्रवास सुरू झाला. त्यावेळी स्थानिक लहान मुले पर्यटकांच्या वाहनांवर दगड मारत होते. आता मात्र सगळेच घाबरले.
पारगे सांगत होते, “कधी काय होईल सांगता येत नव्हते. आम्ही सर्वजण घाबरलो होतो. अनेकांशी संपर्क साधला, सरकारी यंत्रणा तर दूरच स्थानिक नागरिकही मदत करत नव्हते. इतकेच नव्हे, तर आम्हाला घेऊन जाणाऱ्या वाहनांच्या ड्रायव्हरने रात्रीच्या अंधारात घाटामध्ये वाहने थांबवून 15 हजार रुपयांची मागणी केली. त्यांना पैसे देण्याशिवाय पर्याय नव्हता. 22 एप्रिल रोजी कसेबसे जम्मूला पोचलो, त्यावेळी आमचे हॉटेलमधील बुकींगही रद्द करण्यात आले होते. विमानाचे तिकीटही अव्वाच्या सव्वा वाढले होते. त्यामुळे तर मनात आणखीनच भिती दाटली. आमच्या परिवारातील महिला, मुले हवालदिल झाले होते.बऱ्याच प्रयत्नांतर विमानाचे तिकीट मिळाले. २१ एप्रिल रोजी सकाळी ८ वाजता सुरू झालेला आमचा प्रवास २३ एप्रिल रोजी रात्रीच्या सुमारास मुंबईत संपला. तेथून पुढे आम्ही मुंबईला पोचलो. जम्मू व काश्मीरला आम्हाला आलेला हा जीवघेणा अनुभव कधीच विसरता येणार नाही.













