बीडमध्ये निवडणुकीला जातीय रंग, मराठा विरुद्ध ओबीसी कार्ड; अशी आहे जातनिहाय आकडेवारी

0

राज्यातील प्रमुख लढतींपैकी एक असलेल्या बीड लोकसभा निवडणुकीची सध्या जोरदार चर्चा सुरू आहे. भाजपा नेत्या पंकजा मुंडेंसाठी प्रतिष्ठेची निवडणूक असेलल्या या मतदारसंघात ओबीसी विरुद्ध मराठा असा संघर्ष पाहायला मिळत आहे. राज्यात महाविकास आघाडी विरुद्ध महायुती, एका पक्षाविरुद्ध दुसरा पक्ष अशी निवडणूक होत आहे. मात्र, बीड लोकसभा मतदारसंघ याला अपवाद आहे. कारण, बीडमध्ये मराठा विरुद्ध ओबीसी अशी पारंपारिक लढत यावेळी असून मराठा आरक्षणाच्या (Maratha Reservation) मुद्द्यामुळे यंदा ही लढाई टोकाला पोहोचल्याचं दिसून येत आहे. पंकजा मुंडेंना बीडमधून बजरंग सोनवणे यांचं म्हणजे मराठा उमेदवाराचं आव्हान आहे. मराठा आरक्षणाच्या मागणीचा बीड हा केंद्रबिंदू असल्याने यंदा येथील निवडणुकीला जातीय रंग लागल्याचे दिसत आहे.

बीड जिल्ह्यामध्ये जशी उन्हाची तीव्रता वाढत आहे, तसा प्रचाराचा जोरदेखील आता वाढू लागला आहे. मात्र, बीड लोकसभा निवडणुकीच्या प्रचारात विकासाच्या मुद्द्यापेक्षा जातीचा मुद्दाच पुढे येताना पाहायला मिळत आहे. येथे पंकजा मुंडे आणि बजरंग सोनवणे यांच्यामध्ये थेट लढत होत असल्याने मराठा विरुद्ध ओबीसी हा वाद आणखी तीव्र होत असल्याचे पाहायला मिळत आहे. बीड जिल्ह्यात यापूर्वी जेवढे खासदार निवडून आले त्यांची जात कधीच काढली गेली नाही, असं सांगत धनंजय मुंडेंनी आजपर्यंतच्या खासदारांची यादीच वाचून दाखवली. तसेच, आता आमची जात का काढली जातेय, असा सवालही त्यांनी उपस्थित केला.

अधिक वाचा  मराठा विद्यार्थ्यांना ‘ओबीसी’प्रमाणे सवलती मिळणार; राज्य सरकारचा निर्णय; जीआरही निघाला

दरम्यान, जाहीर भाषणामध्ये धनंजय मुंडे यांनी निवडणुकीत जात आल्याचे म्हटल्यानंतर बजरंग सोनवणे यांनी देखील त्यांना प्रत्त्युत्तर दिलं आहे. या निवडणुकीमध्ये आमच्यासाठी कोणतीही जात हा मुद्दा नाही, आम्ही सेक्युलर विचाराचे आहोत. याउलट धनंजय मुंडेच निवडणुकीत जात फॅक्टर चालवत असल्याचा आरोप सोनवणे यांनी केला आहे.

बीडमधील जातनिहाय आकडेवारी

बीड जिल्ह्यातील जातनिहाय मतांची आकडेवारी अंदाजे

मराठा – सात ते साडेसात लाख

वंजारी – साडेचार ते पाच लाख

दलित – दोन ते सव्वा दोन लाख

मुस्लिम – सव्वा दोन ते अडीच लाख

ओबीसी – म्हणजेच माळी आणि धनगर दोन ते अडीच लाख

अधिक वाचा  देशात दोन प्रमुख गट सध्या विरोधी आघाडी मजबूत करण्याचे प्रयत्न सुरू या प्रमुखांना बोलावून नक्कीच मार्ग निघेल याची खात्री: शरद पवार

असे बीड जिल्ह्यात 21 लाखांपेक्षा अधिक मतदार आहेत.

जातीय उमेदवाराल जास्त हवा

बीड जिल्ह्याच्या निवडणुकीमध्ये जातीचा मुद्दा पुढे येण्याचं सर्वात महत्त्वाचं कारण म्हणजे बीडमध्ये झालेलं मराठा आरक्षणाचे तीव्र आंदोलन आणि त्यातच लागलेल्या लोकसभेच्या निवडणुका. यंदाच्या निवडणुकात मराठा आणि ओबीसी उमेदवार एकमेकांसमोर उभे असल्याने दोन्ही समाजामध्ये आता जातीय तेढ निर्माण होताना पाहायला मिळत आहे. यापूर्वी देखील लोकसभा निवडणुकीत जातीचा मुद्दा असायचा. मात्र, यावेळेस या मुद्द्याला जास्त हवा मिळत असून याचे परिणाम येणाऱ्या विधानसभा निवडणुकीवरही होतील, असं काही ज्येष्ठ पत्रकारांना वाटत आहे

बीड जिल्ह्याची खंत वाटते

बीडमध्ये सध्या जातीच्या मुद्द्यावरून प्रचार सुरू असताना दुसरीकडे पंकजा मुंडे यांना दोन ठिकाणी मराठा आरक्षणाच्या प्रश्नावरून मराठा बांधवांच्या आक्रोशाचा सामना करावा लागला. त्यामुळे, पंकजा मुंडे यांनी हे मराठा आंदोलन नसून मुद्दाम जातीय तेढ निर्माण करण्यासाठी सुरू असलेला प्रायोजित कार्यक्रम असल्याचे म्हटलं. बीड जिल्ह्यात यापूर्वी असं वातावरण निवडणुकीत कधीच पाहायला मिळालं नाही. बीड जिल्ह्यात सध्या जे चित्र निर्माण झालंय, त्यामुळे बीड जिल्ह्याच्या भवितव्याची चिंता वाटत असल्याची खंत पंकजा मुंडेंनी बोलून दाखवली.

अधिक वाचा  हवेली तालुक्यात अहिल्यादेवी जयंती उत्सवात दोन गटात हाणामारी, ५ जखमी परस्परविरोधी गुन्हे दाखल

जातीयवाद फोफावणे धोक्याची घंटा

दरम्यान, बीड जिल्ह्यातील लोकसभा निवडणुकीला जातीय रंग हा काही पहिल्यांदा लावला जातोय असं अजिबात नाही भाजपचे दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांच्यापासून बीडची लढत कायम मराठा विरुद्ध वंजारी अशीच राहिलेली आहे. मात्र. या निवडणुकीमध्ये जाती जातीतील तेढ रस्त्यावर पाहायला मिळत आहे. पण, हा जातीयवाद असाच फोफावत राहिला तर भविष्यातील राजकारणा विषयी ही धोक्याची घंटा आहे, असं म्हटल तर चुकीचे ठरणार नाही.