रामनवमीनिमित्त आज संपूर्ण देशभरात उत्साह आहे. अयोध्येतील भव्य राम मंदिराच्या उद्घाटनानंतरची ही पहिलीच रामनवमी आहे. यानिमित्ताने याठिकाणी सूर्य-तिलक सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं आहे. आज दुपारी १२ वाजता सूर्याच्या किरणांनी रामलल्लांना तिलक लावला. सुमारे 4 मिनिटे सूर्याची किरणं मूर्तीच्या डोक्यावर पडत होती. अशा प्रकारे रामलल्लांचा सूर्याभिषेक सोहळा पार पडला.






पौराणिक कथांंनुसार, जेव्हा प्रभू श्रीरामांचा जन्म झाला होता; तेव्हा सूर्यदेवाने येऊन त्यांना आशीर्वाद दिला होता. याच प्रसंगाची पुनरावृत्ती करण्यासाठी अयोध्येतील राम मंदिरात विशेष तयारी करण्यात आली होती. आज दुपारी 12 वाजता, एका खास तंत्राच्या मदतीने सूर्याची किरणे रामलल्लांच्या मूर्तीवर प्रक्षेपित करण्यात आली. रामलल्लांच्या कपाळावर या मदतीने सूर्यकिरणांचा तिलक लावण्यात आला.
अध्यात्माला विज्ञानाची जोड
अयोध्येतील राम मंदिर हे तीन मजली उंच आहे. यातील तळमजल्यावर असणाऱ्या गर्भगृहात रामलल्ला विराजमान आहेत. त्यामुळे याठिकाणी सूर्य किरणे पोहोचवणं हे एक चॅलेंज होतं. यासाठी CSIR-CBRI रुडकी आणि बंगळुरूतील इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ अॅस्ट्रोफिजिक्सच्या मदतीने नवीन तंत्रज्ञान विकसित केलं गेलं.
यामध्ये तीन आरसे आणि एका लेन्सच्या मदतीने एक सेटअप तयार करण्यात आला. आरशांच्या मदतीने मंदिरावर पडणारी सूर्याची किरणं ही आतल्या बाजूला वळवण्यात आली. गर्भगृहापर्यंत नेलेल्या सूर्यकिरणांना लेन्सच्या मदतीने रामलल्लांच्या कपाळावर फोकस करण्यात आले. यामुळे रामलल्लांना ‘सूर्य-तिलक’ लावणं शक्य झालं, आणि हा सूर्याभिषेक संपन्न झाला. यासाठी तयार करण्यात आलेल्या सेटअपमध्ये अत्यंत उच्च प्रतीचे आरसे आणि लेन्स वापरल्या आहेत. त्यामुळे पुढील कित्येक वर्षे हा सोहळा पार पाडता येणार आहे.











