विश्वजीत कदमांचा लेटरबॉम्ब; थेट नाना पटोलेंनाच इशारा नाराजीची जाणीवही केली पण लढण्याचा ‘एल्गार’ कायम

0

महाशक्ती अर्थात मोदी-शाहांना धूळ चारण्याच्या इराद्याने, पवारांच्या मदतीने जोर-बैठका मारणाऱ्या काँग्रेसला स्वपक्षातील आमदारांनीच कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला आहे. ऐन लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर इशाऱ्याची भाषा वापरून थेट काँग्रेसच्या वरीष्ठ नेत्यांना धारेवर धरण्याचा प्रयत्न केला जात आहे. महाविकास आघाडीतील जागावाटपाचा तिढा पुढे करून, सांगलीच्या जागेचा मुद्दा मांडून काँग्रेसचे भरोवशाचे आमदार डॉ. विश्वजीत कदमांना थेट प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंना मोजक्या पण इशारेवजा भाषा करीत पत्र धाडले आहे.

काँग्रेसची प्रचार समिती निवडीची बैठक बुधवारी होणार आहे. त्या बैठकीला उपस्थित राहण्यासाठी विश्वजीत कदमांना पक्षश्रेष्ठींचे पत्र मिळाले आहे. मात्र महाविकास आघाडीत सांगलीचा उमेदवार ठरवताना जिल्हा काँग्रेसचा कार्यकर्ता म्हणून विश्वासात घेतले नाही. तसेच सांगलीच्या जागेचा तिढ्यावर आघाडीकडून स्पष्ट माहिती मिळत नाही. त्यामुळे प्रचार समिती निवडीच्या बैठकीला उपस्थित राहणार नाही, अशा शब्दांत कदमांनी नानाभाऊंना आपला पवित्रा दाखवून दिला आहे.

अधिक वाचा  समाविष्ट २३ गावांतील ६२६ कर्मचाऱ्यांचे भवितव्य अधांतरी! नगरविकास विभागाकडून महापालिकेला पत्र प्राप्त प्रकरण काय?

लोकसभा निवडणुकीसाठी प्रचार समिती निवड समितीला उपस्थित राहणार नसल्याचा कदमांनी पवित्रा घेतल्याने चर्चांना उधाण आले आहे. कदमांनी पत्रात म्हटले, राज्यात आगामी लोकसभा निवडणूक ही काँग्रेस पक्ष व महाविकास आघाडी म्हणून आपण सर्वजण ताकदीने लढवणारच आहोत. माझी व सांगली जिल्ह्यातील काँग्रेस पक्षातील कार्यकर्त्यांची सांगली लोकसभेच्या जागेबाबतीत असणारी भावना आपणाला माहिती आहे. काही दिवसांपासून सांगली व राज्यातील इतर काही जागांचा तिढा सुटलेला नाही, याकडेही कदमांनी लक्ष वेधले.

काँग्रेस सांगलीची जागा लढवण्यास सक्षम आहे. या भूमिकेवर आम्ही जिल्ह्यातील कार्यकर्ते ठाम आहोत. सांगली लोकसभेच्या जागेचा तिढा सुटत नाही, तोपर्यंत जिल्ह्यातील काँग्रेस पक्षाचा कार्यकर्ता व आमदार म्हणून बैठकीस अनुपस्थित राहण्याचा निर्णय घेतला आहे, असे कदमांनी ठामपणे सांगितले आहे.

अधिक वाचा  महाराष्ट्रात खळबळ माजी महामंत्र्यांची भाजपमधून हकालपट्टी, आगामी निवडणुकांवर परिणाम होणार मुंबईत डॅमेज कंट्रोल सुरू

दरम्यान, कदमांनी सांगलीची जागा काँग्रेसकडे राखण्यासाठी दिल्ली वाऱ्या केल्या आहेत. ही जागा काँग्रेसकडेच राहण्यासाठी त्यांनी आक्रमक पवित्रा घेतल्याचे दिसून येत आहे. निवडणुकीच्या धामधुमीत कदमांकानी आक्रमक बाणा दाखवल्याचने आघाडीत गोंधळ उडला आहे. कदमांच्या या पत्रामुळे, काँग्रेस, महाविकास आघडीत राजकीय नाराजी नाट्याचा नवा प्रयोग लोकांपुढे आला आहे.