आगामी लोकसभा व विधानसभेच्या निवडणुका एकत्रित होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. केंद्र सरकारकडून तशा हालचाली सुरू असल्याचेलोप देखील बोलले जाते. परंतु लोकसभा-विधानसभेच्या निवडणुका एकत्र शक्य नसल्याचे राष्ट्रवादीचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांनी स्पष्टच सांगितले. छत्रपती संभाजीनगरात पत्रकारांशी बोलतांना त्यांनी विविध विषयांवर आपली भूमिका मांडली.






पवार म्हणाले, दोन्ही निवडणुका एकत्र होतील, असे नाही. विधानसभा आणि लोकसभा निवडणुका वेगवेगळ्या होतील. कर्नाटक विधानसभा निवडणुकीचे निकाल पाहता, ते शक्यच नाही. आपण आपले पाहू, राज्यांच्या निवडणुकांचे काय व्हायचे ते होऊ दे, असे त्यांना वाटत असावे. दिल्लीची मान्यता असल्याशिवाय राज्यातील मंत्रिमंडळ विस्तारही होत नाही. देशाचे राजकारण दोन लोक चालवत असल्याची टीकाही पवार यांनी केली.
तेलंगणचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव (केसीआर) यांच्या भारत राष्ट्र समिती पक्षात (बीआरएस) कोण जाते, याचा आढावा घेतला. काहींच्या जाण्यावरून फारशी चिंता करण्याची गरज नाही. केसीआर महाराष्ट्रात येणार असतील तर, येऊ देत. सबंध देश त्यांना मोकळा आहे, असा टोला देखील पवारांनी लगावला.
सध्या कांदा, कापूस, सोयाबीन शेतकऱ्यांकडे पडून आहे. अशावेळी शेतकऱ्यांनी रस्त्यावर उतरण्याचा निर्णय घेतला तर राष्ट्रवादी काँग्रेस त्यांच्यामागे राहील. राज्यपाल रमेश बैस यांनी बाजीराव पेशवे यांच्यावर केलेल्या वक्तव्यावर पवार यांनी त्यांना चिमटा काढला. पेशव्यांच्या संबंधी आस्था असलेला वर्ग आजही आहे. मागचे राज्यपाल फारच बोलके होते, हे आताचे कसे आहेत, ते अजून स्पष्ट झालेले नाही.
पंतप्रधान नरेंद्र मोदी विरोधी आघाडीचा रिमोट कंट्रोल कुणाच्या हातात येऊ दे, फक्त विरोधकांनी एकत्र येण्याची गरज आहे, असे सांगत पवार यांनी राहुल गांधी, नितीशकुमार की शरद पवार यापैकी रिमोट कंट्रोल कोण असतील, या प्रश्नाला बगल दिली. राहुल गांधी बाहेर जाऊन पंतप्रधानांवर टीका करत असले तरी, पंतप्रधानही बाहेर जाऊन इथल्या विरोधी पक्षांवर टीका करत असतात. हे दोघेही तिथल्या भारतीयांसमोर किंवा विचारलेल्या प्रश्नांना उत्तरे देत असतात, असे म्हणत पवार यांनी राहुल गांधी यांची पाठराखण केली.













