भाजपचा करिष्मा फक्त नरेंद्र मोदींमुळेच, त्यांनी देशभर भाजप वाढवला; अजित पवारांकडून मोदींचं कौतुक

0

अजित पवारांनी पंतप्रधान नरेंद्र मोंदींचं कौतुक केलं आहे. ‘भाजपचा करिष्मा फक्त आणि फक्त नरेंद्र मोदींमुळेच आहे. त्यांनी देशभर भाजप पसरवला, अशा शब्दांत त्यांनी मोदींचं कौतुक केलं आहे. पिंपरी-चिंचवडमध्ये सकाळ माध्यम समूहाच्यावतीने अजित पवार यांची ‘दिलखुलास दादा’ ही प्रकट मुलाखत घेण्यात आली. त्यावेळी त्यांनी राज्यातील आघाडी आणि भाजपच्या कार्यशैलीसंदर्भात भाष्य केलं आहे.

अजित पवार म्हणाले की, 2014 मध्ये पहिल्यांदाच बहुमताने भाजप निवडून आला. 2014 आणि 2019 मध्ये एकहाती सत्ता घेणारा पक्ष हा भाजपच होता. या काळात नरेंद्र मोदी यांच्यामुळे भाजप सर्वदूर पोहचला. नरेंद्र मोदींचा करिष्मा हा देशात चालला आणि त्यांनी देशातील करोडो जनतेचा विश्वास संपादन केला. त्यांची भाषणंदेखील गाजले. भाषणं करत असताना त्यांनी जनतेला आपलंसं केलं होतं. त्यानंतर जनतेला वाटलं की आपण नरेंद्र मोदी यांच्या हाती देशाचे सूत्रं द्यावीत आणि जनतेनेही मतांच्या माध्यमातून नरेंद्र मोदींकडे देशाचे सूत्रं दिली, असं म्हणत त्यांनी नरेंद्र मोदींचं कौतुक केलं आहे.

अधिक वाचा  देशात साखर उद्योग अस्वस्थ इथेनॉल निर्मितीवर ‘संक्रांत’ इथेनॉलची अमेरिकेतून आयात? भविष्याची चिंता

यापूर्वी ‘हे’ कोणालाही जमलं नाही…

अटल बिहारी वाजपेयी यांच्यासारखं सर्वसमावेशक नेतृत्व भाजपमध्ये होतं. त्यासोबतच लालकृष्ण अडवाणी, मुरली मनोहर जोशी हे सगळे एकेकाळी भाजपच वाढवण्याचं कार्य करत होते. त्यावेळी या सगळ्यांना जे जमलं नाही ते नरेंद्र मोदी यांनी करुन दाखवलं. 1984 नंतर पहिल्यांदा 2014 मध्ये पूर्ण बहूमत असणारं सरकार अस्तित्वात आलं. 1984 नंतर कधीही भारतात पूर्ण बहूमत कोणत्याही पक्षाला मिळालं नव्हतं. मात्र हे एकहाती सत्ता नरेंद्र मोदी यांनी निर्माण केली. त्यांनी केलेला हा करिष्मा आपल्याला नाकारता येऊ शकत नसल्याचं ते म्हणाले.

अधिक वाचा  स्थानिक निवडणुका निवडणूक आयोग सजग; आवश्यक मनुष्यबळ उपलब्ध सुनिश्चित करा, पुरेसा बंदोबस्त ठेवावा

मोदीनंतर कोण?

मोदींचा करिष्मा आपण पाहिला आहे. आता त्याच्यानंतर कोण? असं विचारल्यास एकही नाव पुढे येत नाही. मोदींनंतर कोण?, असं अजित पवारांना विचारल्यास वेळ येईल तेव्हा नक्की उत्तर देईल, अशी मिश्किल टिप्पणी अजित पवार यांनी केली आहे. अजित पवारांचं हे उत्तर ऐकताच सभागृहात हशा पिकला.

…आता आघाडी सरकारच चालणार!

नरेंद्र मोदी यांनी एकहाती सत्ता मिळवली. सगळ्यांनी देशाचं हित कशात आहे हे बघायला हवं. देशाचं भलं कशात आहे हे पाहिलं पाहिजे आणि भारताला पुढे नेलं पाहिजे, असंही ते म्हणाले.