काँग्रेसचा सलग ३ विजयांनी आत्मविश्वास वाढला; कार्यकर्त्यांमध्ये नवचैतन्य पालवी येणार का?

0

विधान परिषदेच्या नागपूर शिक्षक आणि अमरावती पदवीधरपाठोपाठ पुण्यातील कसबा पेठ विधानसभा मतदारसंघ पोटनिवडणुकीत विजयामुळे काँग्रेसचा आत्मविश्वास दुणावला आहे. नेतेमंडळींमधील गटबाजी, पक्षांतर्गत हेवेदावे यामुळे पक्षाची संघटना कमकुवत झाली असली तरी मतदार काँग्रेस बरोबर आहेत हे निकालांवरून सष्ष्ट झाले आहे.

गेल्याच महिन्यात झालेल्या विधान परिषदेच्या नागपूर शिक्षक या भाजपच्या बालेकिल्ल्यात काँग्रेसचा उमेदवार निवडून आला होता. विशेष म्हणजे काँग्रेसमध्ये उमेदवारीवरून शेवटपर्यंत गोंधळ झाला होता. तरीही शिक्षक मतदारांनी काँग्रेसला कौल दिला होता. नितीन गडकरी, देवेंद्र फडणवीस आणि चंद्रशेखर बावनकुळे या दिग्गज नेत्यांच्या बालेकिल्ल्यात भाजपला पारंपारिक शिक्षक मतदारसंघात पराभव स्वीकारावा लागला होता. अमरावती पदवीधर मतदारसंघात गेल्या १२ वर्षांत भाजपने चांगली पकड निर्माण केली होती. अमरावतीमध्येही मतदारांनी भाजपला पराभवाची धूळ चारली. काँग्रेसने अनपेक्षितपणे विजय प्राप्त केला होता. नाशिक पदवीधरमध्ये काँग्रेसमध्ये उमेदवारीवरून गोंंधळ झाला. सत्यजित तांबे यांना उमेदवारी हवी असताना त्यांचे वडिल डॉ. सुधीर तांबे यांनाच पुन्हा उमेदवारी देण्यात आली. या गोंधळात सत्यजित तांबे अपक्ष लढले आणि काँग्रेसने त्यांना पाठिंबा देण्याचे टाळले होते. सत्यजित तांबे अपक्ष म्हणूुन निवडून आले. काँग्रेसने आधीच गोंधळ निस्तरला असता व सत्यजित तांबे यांना उमेदवारी दिली असती तर काँग्रेसचे तीन आमदार निवडून आले असते.

अधिक वाचा  भाजपच्या ‘पॅनल प्रमुख’च गळाला धोरणाने पालकमंत्री नाराज; थेट ‘तिरकी’चाल अन् बेरजेतून 2007चा पॅटर्न?

पदवीधर आणि शिक्षकमध्ये काही हजार मतदारांमधून काँग्रेसचे दोन उमेदवार निवडून आले. हा जनतेचा कौल नाही, असा सूर भाजपने लावला होता. परंतु पुण्यातील कसबा पेठ मतदारसंघातील पोटनिवडणूक जिंकून काँग्रेसने भाजपला चोख प्रत्युत्तर दिले आहे. शिक्षक किंवा पदवीधरप्रमाणेच विधानसभा पोटनिवडणुकीत काँग्रेसने चुणूक दाखवून दिली.

आगामी महानगरपालिका, नगरपालिका किंवा जिल्हा परिषद निवडणुकांपाठोपाठ लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांकरिता कसबा पेठ आणि शिक्षक तसेच पदवीधर मतदारसंघांतील विजयांमुळे काँग्रेसचे बळ वाढले आहे. राज्य काँग्रेसमध्ये प्रदेशाध्यक्ष नाना पटोले आणि विधिमंडळ पक्षनेते बाळासाहेब थोरात यांच्यातून विस्तव जात नाही. अन्य नेत्यांची तोंडे वेगवेगळ्या दिशेला आहेत. पक्षांतर्गत हेवेदावे असले तरी भाजपच्या विरोधात सामान्य जनता काँग्रेसच्या पाठीशी आहे हे अलीकडील निकालांवरून निष्पन्न झाले. राहुल गांधी यांच्या ‘भारत जोडो’ यात्रेनंतर राज्यातील वातावरण काँग्रेसला अनुकूल झाल्याचा दावा पक्षाचे नेते करीत आहेत. आपापसातील वाद मिटवित पक्ष एकसंघ राहिल्यास राज्यात पक्षाला चांगले यश मिळू शकते. अर्थात, जुन्या चुका दुरूस्त केल्या तरच हे शक्य आहे.

अधिक वाचा  माजी कृषीमंत्र्याच्या ‘पुत्रा’ची ‘वारसहक्क’ टिकवण्यासाठी भाजपमध्ये कोलांटउडी भाजपाचही टेन्शन गेलं; शहरभर निष्ठावंतांची नाराजी अन् बंड नवे संकट

महाराष्ट्र आणि काँग्रेस पक्ष हे एकेकाळी समीकरण होते. राज्य विधानसभेत काँग्रेसचे २०० पेक्षा अधिक आमदार निवडून येत असत. पण २०१४ पासून देशाप्रमाणेच काँग्रेसची राज्यात पिछेहाट सुरू झाली. २०१९ मध्ये तर राष्ट्रवादीने मागे टाकल्याने काँग्रेसच्या जखमेवर मिठ चोळले गेले होते. कसबा पेठ, नागपूर शिक्षक आणि अमरावती पदवीधरमधील विजयाने काँग्रेसला आगामी निवडणुकांना सामोरे जाताना बळ मिळाले आहे