जालना : शिवसेना ही एकनाथ शिंदे यांची, तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा अजित पवार यांचा असल्याचा कौल २०२४ च्या निवडणुकीमध्ये लोकन्यायालयाने दिला आहे. त्यानुसार सर्वोच्च न्यायालयाचाही हाच निकाल लागेल, अशी अपेक्षा आहे, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शुक्रवारी (ता.१४) जालना येथे पत्रकारांशी बोलताना म्हटले आहे.खासदार सुप्रिया सुळे यांनी शिवसेना उद्धव ठाकरे यांची आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार यांचा आहे, असे विधान केले होते. यावर बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, सुप्रिया सुळे काहीही म्हणू शकतात. परंतु, हा प्रश्न सर्वोच्च न्यायालयाच्या विचाराधीन आहे. यावर सर्वोच्च न्यायालय काय निर्णय घेते, याकडे सर्वांचे लक्ष आहे. परंतु, २०२४ च्या निवडणुकीत जनतेने दिलेला कौल पाहता सर्वोच्च न्यायालयदेखील असाच निर्णय देईल, अशी अपेक्षा आहे.







दरम्यान, केंद्र शासनाने जातनिहाय जनगणना घोषित केलेली आहे. त्यानुसार तिचे टप्पे असतात. त्यानुसार ती होईल. आता त्याची कार्यवाही सुरू होईल. मागील अनेक वर्षांपासून असलेली मागणी आज मोदी सरकारने पूर्ण केली आहे, असेही मुख्यमंत्री फडणवीस यांनी म्हटले.शरद पवारसाहेब ज्येष्ठ नेते आहेत. नेहमी महाराष्ट्राच्या हिताचा विचार करतात. त्यांच्यापर्यंत चुकीची माहिती जाऊ नये, त्यामुळे मी त्यांच्या ट्विटला उत्तरही दिले आहे. माहिती दिली. महाराष्ट्रात सर्वाधिक कंपन्या आहेत. परंतु, ज्या कंपन्या कधीच सुरू झाल्या नाहीत, अशा कंपन्यांची आकडेवारी देऊन काही लोक फसवेगिरी करतात. परंतु, माझ्या ट्विटनंतर हे समोर आले. चाकणचा जो विषय आहे, तो गंभीर असून आम्ही त्याची दखल घेतली आहे, असेही मुख्यमंत्री फडणवीस यांनी म्हटले.
राहुल गांधी यांनी छिछोरेपणा केला
लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी जो छिछोरेपणा करून देशाच्या पंतप्रधानांचा अपमान केला. याच वेळी इटलीच्या महिला राष्ट्रप्रमुखाचा खालच्या दर्जाला जाऊन त्यांनी अपमान केला. या देशांमध्ये असा छिछोरेपणा केला जात नव्हता. गल्लीतील नेतेदेखील असे वागत नाहीत. राहुल गांधी आणि संदीप दीक्षित यांनी राष्ट्राची माफी मागितली पाहिजे, असेही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले.












