साठेनगर येथे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचा १०६ वा जयंती महोत्सव मोठ्या उत्साहात संपन्न

0

मुंबई दि. १ (रामदास धो. गमरे) अण्णाभाऊ साठे गृहनिर्माण हौसिंग सोसायटी, नायगाव डिव्हिजन, मुंबई – १४, या कमिटीच्या वतीने लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या १०६ व्या जयंती प्रीत्यर्थ त्यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून मानवंदना देण्यात आली.

सदर कार्यक्रमाचे प्रास्ताविक सादर करीत असताना सोसायटीचे कोषाध्यक्ष राजाभाऊ तथा रामदास धो. गमरे यांनी अण्णाभाऊंच्या वैचारिक व साहित्यिक पार्श्वभूमीवर प्रकाशझोत टाकत त्यांच्या बंडखोर आणि अन्यायविरुद्ध वाचा फोडणाऱ्या लेखणीचे गुणगौरव करीत, बाबासाहेबांच्या चळवळीचा व समता, स्वतंत्र, बंधुता या विचारधारेचा अण्णाभाऊंवर प्रभाव होता. कामगार, शोषित-पीडित वर्गाची दुःख आणि विवंचना त्यांनी प्रकर्षाने मांडली, ‘पृथ्वी शेषनागाच्या फण्यावर नसून ती कष्टकरी आणि श्रमिकांच्या तळहातावर तरलेली आहे’ अशी परखड आणि स्पष्ट भूमिका त्यांनी मांडली. बाबासाहेब कायदे मंत्री असताना त्यांचे मित्र कॉम्रेड भगवानराव मोरे व त्यांचे शिष्टमंडळ मजूर, कामगारांचे प्रश्न घेऊन बाबासाहेबांकडे राजगृहावर गेले त्यात अण्णाभाऊ ही होते, बाबासाहेबांनी तत्काळ दखल घेत त्यांचे प्रश्न मार्गी लावले तेव्हा सोबत आलेल्या शिष्टमंडळाची ओळख करून देत असताना कॉम्रेड मोरे यांनी अण्णाभाऊं बद्दल सांगितलं की बाबासाहेब हे अण्णाभाऊ साठे आहेत हे समाज परिवर्तनाची शाहिरी पद व कवन लिहितात व अण्णाभाऊंना कॉम्रेड मोरे अण्णाभाऊंना म्हणाले की अण्णाभाऊ बाबासाहेबांना काही तरी ऐकवा तेव्हा ‘गुलामगिरीच्या बेड्या तोड राजा गुलामगिरीच्या बेड्या तोड, बिनीवरती घाव घ्यायची आहे त्याच्यासाठी संकल्प सोड’ हे गीत सादर केले त्यावेळी खुश होऊन बाबासाहेबांनी शाबासकी देत म्हटल की ‘अण्णाभाऊ मी आजवर अनेक शाहीर ऐकले पण गुलामगिरीच्या बेड्या तोडण्याचा संकल्प घे सांगणारा शाहीर पहिल्यांदाच ऐकला’ व कॉम्रेड मोरेंना बाबासाहेब म्हणाले की ‘कॉम्रेड यापुढे अण्णाभाऊंची इतरांना ओळख करून देताना शाहीर नाही तर लोकशाहीर अशी ओळख करून देत जा’ अशा प्रकारे बाबासाहेबांनी अण्णाभाऊंना लोकशाहीर पदवी बहाल केली. अण्णाभाऊ लाल बावटा या कम्युनिस्ट विचारधारेत जरी असले त्यांनी बाबासाहेबांना नेहमीच आपले मार्गदर्शक मानले होते व बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारधारेवर ही त्यांनी मार्गक्रमना केली. बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाणानंतर देशभरात श्रद्धांजली सभा आयोजित करण्यात आल्या होत्या त्यावेळी वामनदादा कर्डक, भिकू भंडारे, प्रल्हाद शिंदे, गोविंद म्हशीलकर, विठ्ठल उमप, विठ्ठल शिंदे, अण्णाभाऊ साठे आदींनी ही अंधेरीमध्ये सभेचे आयोजन केले त्यावेळी प्रत्येकाने आपापली गीत सादर केली सर्वात शेवटी अण्णाभाऊ राहिले तेव्हा वामनदादा म्हणाले की अण्णा तुला गीत सादर नाही करायचे का ? आणि तू तर कोणतही गीत तयार करून नाही आलास मग तू शब्दरुपी श्रद्धांजली कशी देणार त्यावेळी स्टेजवर बसूनच अण्णाभाऊंनी कागद पेन घेऊन एकहाती गाण लिहून काढलं जे होत ‘जग बदल घालून घाव सांगून गेलेत मला रे भीमराव’ यातूनच आणाभाऊंचे बाबासाहेबांप्रती प्रेम व आदर स्पष्ट होतो. आपल्या शेवटच्या काळात त्यांनी आपले लहान भाऊ शंकरराव साठे यांना सांगितले की ‘आपल्याला माणूस म्हणून जगायचे असेल तर आंबेडकरी चळवळीशिवाय पर्याय नाही’ अशा अनेक गोष्टींना, घटनांना उजाळा देत, अण्णाभाऊ साठेंच्या जीवनाचा आढावा घेतला व अण्णाभाऊंच्या पवित्र स्मृतीस मानवंदना दिली सोबतच उपस्थित इतर मान्यवरांनी ही आपले विचार मांडून अण्णाभाऊंना मानवंदना दिली.

अधिक वाचा  भाजपच्या ज्येष्ठ नेत्यांवरची टीका जिव्हारी स यादी निधी रोखल्याचा विषय मुख्यमंत्र्यांच्या दरबारी बिडकर यांचेही खुले पत्र

सदर प्रसंगी कमिटीचे चेअरमन दीपक बनसोडे, आंबेडकर चळवळीतील कार्यकर्ते उकरंडे, सरचिटणीस दीपक गायकर, कोषाध्यक्ष राजाभाऊ तथा रामदास धो. गमरे, सदस्य म.सा. खंडारे, राजू गायकवाड, अनंत मोहिते, नितीन कांबळे, श्रीधर मोरे, भारती कारंडे, योगिता मोरे, संगीता साळवी, काशिनाथ पवार, मारुती जोगळेकर, बौद्धजन पंचायत समिती शाखा क्र. ५७८ चे कार्यकर्ते, मनसेचे शाखाप्रमुख, सरचिटणीस, कार्यकर्ते, सदस्य या सर्वांनी अण्णाभाऊंना पुष्पसुमन अर्पण करून मानवंदना दिली. सरतेशेवटी कमिटीचे चिटणीस दीपक गायकर यांनी सर्वांचे आभार व्यक्त करून कार्यक्रमाची सांगता केली.