राज्यातील विधान परिषदेच्या उपसभापतीपदी ठाकरे यांच्या शिवसेनेतून अचानक एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत गेलेल्या सचिन अहिर यांची बिनविरोध निवड करण्यात आली. त्यामुळे गेल्या दोन दिवसापासून सुरु असेलल्या चर्चेना पूर्णविराम मिळाला.उपसभापती पदावर सचिन आहेर यांची वर्णी लागताच त्यांनी सभागृहात रिक्त असलेल्या विधान परिषदेच्या उपसभापती पदावरून मोठे विधान केले आहे. विधान परिषदेत विरोधी पक्षनेतेपद द्यायला हवे, अशी भूमिका सचिन अहिर यांनी मांडली. ‘विरोधी पक्षनेतेपद दिले असते तर इतके रामायण घडले नसते. तो लोकशाहीचा कणा आहे,’ असेही यावेळी स्पष्ट केले.






विधान परिषदेच्या उपसभापतिपदाची निवडणूक प्रक्रिया बुधवारी पार पडली. या पदासाठी महायुतीकडून सचिन अहिर यांची वर्णी लागली. त्यांच्या विरोधातील महाविकास आघाडीकडून ज. मो. अभ्यंकर यांचा अर्ज मागे घेण्यात आला. त्यामुळे त्यांची बिनविरोध निवड झाली. या निवडींनंतर बोलताना सचिन अहिर यांनी विरोधी पक्षनेते पदाबाबत मोठे वक्तव्य केले.
यावेळी सचिन अहिर संसदीय कार्यमंत्री चंद्रकांत पाटील यांना उद्देशून म्हणाले. ‘तुम्ही एकदा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेयांच्याशी बोलून त्यावर निर्णय घ्या, मीदेखील शब्द टाकतो आणि हा विषय तडीस लावा, असे ते पाटील यांना म्हणाले. विधान परिषदेत विरोधी पक्षनेतेपद द्यायला हवे, अशी भूमिका सचिन अहिर यांनी मांडली.
‘राजकारणात काही अपरिहार्य निर्णय घ्यावे लागतात. तो घेतला नसता तर माझ्यासारखा सामान्य कार्यकर्ता उपसभापतिपदी पोहोचला नसता. अगदी कालपर्यंत मी विरोधी पक्षात होतो आणि आता त्यांची साथ सोडल्याने काहीशी नाराजी असणे स्वाभाविक आहे; परंतु, माझ्या उपसभापतिपदाच्या कारकीर्दीच्या माध्यमातून मी त्यांना न्याय देण्याचा प्रयत्न करीन,’ अशी ग्वाही सचिन अहिर यांनी दिली.
विरोधी पक्षनेते पदाबाबत उत्सुकता
दरम्यान, विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते पद गेल्या वर्षभरापासून रिक्त आहे. उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचे नेते अंबादास दानवे यांची विधानपरिषदेच्या आमदारीकची मुदत गेल्यावर्षी ऑगस्ट महिन्यात संपली होती. त्यावेळेसपासून हे विरोधी पक्षनेते पद रिक्त आहे. त्यामुळे आता वर्षभरानंतर तरी या पदावर नेत्याची निवड करणार का? याबाबत उत्सुकता लागली आहे.












