राष्ट्रवादीचे राजेंद्र जैन यांची राज्यसभेवर बिनविरोध निवड? हे मोठं कारण समोर

0

राज्यसभेच्या रिक्त जागेसाठी होणाऱ्या पोटनिवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते राजेंद्र जैन यांची बिनविरोध निवड होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या अखेरच्या दिवसापर्यंत महायुतीकडून केवळ राजेंद्र जैन यांचाच अधिकृत अर्ज दाखल करण्यात आला, तर महाविकास आघाडीकडून कोणताही उमेदवार मैदानात उतरवण्यात आला नाही.

या निवडणुकीसाठी एका अपक्ष उमेदवारानेही अर्ज दाखल केला असला, तरी छाननीदरम्यान तो तांत्रिक कारणांमुळे बाद होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. त्यामुळे राजेंद्र जैन यांच्या बिनविरोध निवडीवर जवळपास शिक्कामोर्तब झाल्याचे मानले जात आहे. महाविकास आघाडीने निवडणुकीपासून दूर राहण्याचा निर्णय घेतल्याने ही निवडणूक आता केवळ औपचारिकता राहिली आहे. 

अधिक वाचा  विधान परिषद निवडणुक मतपत्रिकेवर होणार, हा आकडा न लिहिल्यास मत अवैध ठरणार

कोण आहेत राजेंद्र जैन? 

राजेंद्र जैन हे विदर्भातील भंडारा-गोंदिया भागातील राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रभावी नेते म्हणून ओळखले जातात. पक्षाचे वरिष्ठ नेते प्रफुल्ल पटेल यांचे निकटवर्तीय म्हणून त्यांची राजकीय कारकीर्द घडली. एकेकाळी पटेल यांचे स्वीय सहाय्यक म्हणून काम करताना त्यांनी पक्षात स्वतःचे वेगळे स्थान निर्माण केले. राष्ट्रवादीने यापूर्वी त्यांना भंडारा-गोंदिया स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातून विधान परिषदेवर संधी दिली होती. मात्र २०१६ च्या निवडणुकीत त्यांचा भाजपचे परिणय फुके यांच्याकडून पराभव झाला होता. आता राज्यसभेवर निवड होऊन ते राष्ट्रीय राजकारणात सक्रिय भूमिका बजावण्याची शक्यता आहे.

अधिक वाचा  राज्यात केवळ 17 लाख शेतकऱ्यांनाच संपूर्ण कर्जमाफी? एवढ्या अटी शर्ती लादल्याने कर्ज घेतलेल्या शेतकऱ्यांमध्ये नाराजीचं वातावरण

भुजबळांच्या नाराजीची चर्चा

राज्यसभेच्या या जागेसाठी राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते आणि मंत्री छगन भुजबळ यांच्या नावाची जोरदार चर्चा होती. मात्र पक्षाच्या कोअर कमिटीने अखेरीस राजेंद्र जैन यांच्या नावावर शिक्कामोर्तब केल्याने राजकीय वर्तुळात विविध चर्चांना उधाण आले. उमेदवारी जाहीर झाल्यानंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना भुजबळ यांनी आपल्या भावना सूचक शब्दांत व्यक्त केल्या. “अन्याय काय, हे चालायचंच आता. आज नाही तर उद्या, उद्या नाही तर परवा,” असे म्हणत त्यांनी नाराजीचा सूर व्यक्त केला. तसेच, “मी कबड्डीचा खेळाडू आहे, बुद्धीबळाचा नाही,” असे वक्तव्य करत त्यांनी पक्षांतर्गत राजकारणावर अप्रत्यक्षपणे निशाणा साधला. पुतणे समीर भुजबळ यांना मंत्रिमंडळात स्थान न मिळाल्यामुळेही ते नाराज असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे.

अधिक वाचा  अन्नपदार्थ आणि औषधातील भेसळ? तक्रारासाठी टोल फ्री नंबर- एका कॉलवर तक्रार करा मुंढे करतील कारवाई