बारामती ‘पोटनिवडणूक’ भाजपच्या हातात? प्रदेशाध्यक्ष चव्हाणांची वेगळीच चाल; या मेळाव्यात मनसुभे उघड?

0

बारामती पोटनिवडणुकीच्या निमित्ताने कधीही सर न झालेला मतदारसंघ ताब्यात घेण्याचा छुपा झेंडा भारतीय जनता पक्षाच्या वतीने राबवला जात आहे की काय अशी शंका निर्माण झाली आहे. मुळात एकतर्फी झालेल्या या पोटनिवडणुकीमध्ये भारतीय जनता पक्षाने संपूर्ण यंत्रणा सक्रिय करून आपले ‘मनसुभे’ पूर्ण करण्यासाठी सराव सामना म्हणून तयारी सुरू केली असल्याची चर्चा स्थानिक पातळीवर सुरू झाली आहे. मित्र पक्षाच्या विजयासाठी अहोरात्र भारतीय जनता पक्षाची धावपळ लक्षात घेता पक्षाच्या मनात काहीतरी वेगळं सुरू असल्याची जाणीव सध्या प्रचार यंत्रणांमध्ये जाणवत असल्याने बारामतीत प्रचाराला वेगळाच रंग चढला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात आणि महाराष्ट्रात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे नेतृत्वात या होणाऱ्या निवडणुकांमध्ये महायुतीच्या सर्व कार्यकर्त्यांनी एकत्र घेऊन काम करायला हवे. घरोघरी केंद्रातील आणि राज्यातील सरकारचे निर्णय नागरिकांपर्यंत पोहोचवले पाहिजेत. भाजपने ही निवडणूक हातात घेतली आहे. गाफील राहू नका, अशा सूचना भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी कार्यकर्त्यांना दिल्या.

अधिक वाचा  राहूल गांधींच्या कार्यक्रमापूर्वी काँग्रेस अडचणीत, ५० ते ६० कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल… ABVP तक्रारीची गंभीर दखल

बारामती विधानसभा पोट निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजप कार्यकर्ता मेळाव्याचे आयोजन केले होते. त्यावेळी ते बोलत होते. ते म्हणाले, पोटनिवडणूक असल्याने काही अंशी उदासीनता असू शकते त्यामुळे उत्साहपूर्वक वातावरण निर्माण करून मतदानाचा टक्का वाढवणे एक महत्त्वाचे आहे. महायुतीचे नेते अजितदादा यांच्या निधनाने आणि शिवाजीराव कर्डिले यांच्या राहुरीतील निधनाने या दोन ठिकाणी पोटनिवडणूक आहेत. दोन्ही ठिकाणच्या या निवडणुका महायुतीमध्ये लढण्याच्या संदर्भात निर्णय महायुतीने घेतलेला असल्याने बारामती किंवा राहुरी या दोन्ही निवडणुका मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वामध्ये महायुतीमध्ये होत आहेत.महायुतीच्या सर्व कार्यकर्त्यांनी ताकतीने एकत्रपणे प्रचार करणे गरजेचे आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ज्या सूचना केलेल्या आहेत त्याचे पालक कार्यकर्त्यांनी करावे. बऱ्याच वेळा ग्रामीण भागात छोट्या निवडणुका असतील किंवा संस्थांच्या काही निवडणुका असतील या निवडणुकांमध्ये सर्व पक्षाचे कार्यकर्ते एकमेकांच्या विरोधात निवडणुका लढत असतात त्यामुळे काही अंशी का होईना छोट्या निवडणुकीत कटूता असते त्या कटुता या निवडणुकीत विसरल्या पाहिजेत.

अधिक वाचा  पुणे शहरात 42 टक्के मतदारांची नावे वगळली जाणार आठ मतदारसंघ प्रारूप मतदार यादीनुसार वगळलेली मतदारांची संख्या

कदाचित पोटनिवडणूक असल्याने काही अंशी उदासीनता असू शकते. त्यामुळे मतदानाचा टक्का वाढवणे एक महत्त्वाचे असल्याची त्यांनी सांगितले. आमदार राहूल कुल, प्रदेश सरचिटणीस राजेश पांडे, बाळासाहेब गावडे, वासुदेव काळे, रंजन तावरे, अन्य पदाधिकारी उपस्थित होते. दरम्यान बारामती विधानसभा पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुतीच्या उमेदवार तथा उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांच्या प्रचारासाठी भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण हे बारामतीत दाखल झाले. यावेळी विमानतळावर युवा नेते जय पवार यांनी त्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले.

गाफील राहू नका

चव्हाण म्हणाले, समोरचे उमेदवार ताकदीचे नसल्याने मतदारांमध्ये उदासिनता असू शकते, पण गाफिल राहू नका, मतदारांना मतदान केंद्रापर्यंत आणण्याची जबाबदारी पार पाडा. मतदानाचा टक्का वाढविण्यासाठी प्रयत्न करा. बारामतीत दुदैवी प्रसंगानंतर ही पोटनिवडणूक होत आहे. या निवडणुकीत घवघवीत यश मिळवून देणे ही आपली जबाबदारी आहे. भाजपने ही निवडणूक हातात घेतली आहे.

अधिक वाचा  CJPच्या मोहिमेनंतर मोठा निर्णय सरकारी शाळेत प्रवेशावर निर्बंध; फोटो व्हिडिओ काढण्यासही बंदी, माध्यमिक शिक्षण संचालकांचे पत्रक

गटबाजी चव्हाट्यावर

बारामतीत कार्यकर्ता मेळावा प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत पार पडला. यावेळी मेळाव्याच्या गेटवर लावलेल्या बॅनर बाजीमुळे चार मंडळातील भाजप पदाधिकाऱ्यांमध्ये धुसपूस दिसून आली. भिगवण रोड येथील भाजप कार्यकर्त्यांचा मेळाव्यात शहर पदाधिकारी यांनी गेटच्या समोर मोठी बॅनरबाजी केली आहे. या बॅनरबाजीमुळे चार मंडळातील पदाधिकाऱ्यांमध्ये धुसपूस पहायला मिळाली आहे. आमच्या फोटोचे बॅनर गेटवर का लावले नाहीत, असा सवाल ग्रामीण भागातील पदाधिकाऱ्याने केला आहे. त्यामुळे तालुक्यामध्ये पदाधिकाऱ्यांमध्ये मोठ्या प्रमाणात गटबाजी दिसून आली.