राहुरी पोटनिवडणुक ७ उमेदवार तिरंगी लढत; भाजपाच्या ‘प्राजक्त’खेळीने ‘अक्षय’ सुरक्षित? वंचित मुख्य भूमिकेत?

0

महाराष्ट्रात काल दिवसभर चर्चेत राहिलेल्या बारामती विधानसभा मतदारसंघात बिनविरोधची आशा मावळली असताना राहुरी विधानसभा निवडणूक बिनविरोध होणार का, याची उत्सुकता होती परंतु मुख्य पक्षाच्या वतीने उमेदवारी देण्यात आल्याने आता निवडणुकीच्या रिंगणात ७ उमेदवार राहिले आहेत. भाजपचे अक्षय कर्डिले, राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरद पवार गट) गोविंद मोकाटे व वंचित बहुजन आघाडीचे संतोष चोळके या तिघांसह चार अपक्ष असे ७ उमेदवार आहेत. स्वर्गीय शिवाजीराव कर्डिले यांच्या मुलासाठी तीन तालुक्यांमध्ये विभागलेली ही पोटनिवडणूक कसोटीची असल्याची जाणीव भारतीय जनता पक्षाच्या लक्षात आल्याने ऐनवेळी सर्वाधिक तयारी असलेल्या प्राजक्त तनपुरे यांना शांत करून भारतीय जनता पक्षाच्या वतीने विजय सुकर करण्याचे काम केले असले तरीसुद्धा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार यांच्या वतीने धोबीपछाड टाकत शिवसैनिक गोविंद मोकाटे यांना उमेदवार घोषित केल्याने रंगत वाढली आहे. या सर्व गणितांचा विचार करता भारतीय जनता पक्षाच्या वतीने सुद्धा महाराष्ट्रातील दोन्ही जागा महायुतीच्या ताब्यात राहण्यासाठी जोरदार तयारी केल्यामुळेच राहुरी निवडणुक तिरंगी लढतीत गेली आहे. ऐनकेन प्रकारे विजय महायुतीचाच त्यामुळे महाविकास आघाडीमध्ये बिघाडी झाली आहे. ठाकरे गटाचे जिल्हा संघटक रावसाहेब खेवरे यांची बंडाची अपक्ष उमेदवारी अन् वंचितच्या वतीनेही निवडणुकीत रंग भरण्यात आल्याने महाविकास आघाडीच्या अडचणी वाढल्या आहेत.

अधिक वाचा  अमेरिकेचा इराण पाठोपाठ चीनलाही घेरण्याचा डाव?; मलाक्का सामुद्रधुनीत टाकलं महत्त्वाचं पाऊल

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राहुरीसह बारामती विधानसभा पोटनिवडणूक बिनविरोध करण्याचे प्रयत्न करू असे जाहीर केले होते. तसेच त्यांच्या प्रयत्नातून शरद पवार गटाचे संभाव्य उमेदवार माजी आमदार प्राजक्त तनपुरे यांनी उमेदवारी अर्ज दाखल न करण्याचा निर्णय घेतल्याने निवडणूक बिनविरोध होते काय, अशी चर्चा झाली होती. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार यांच्या वतीने राखीव उमेदवार थेट मैदानात उतरवण्यात आल्याने या निवडणुकीची रंगत वाढली होती. बदलत्या गणिताचा विचार करून वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवारासाठी पक्षाचे नेते प्रकाश आंबेडकर यांनीही थेट राहुरीमध्ये गुरुवारी धाव घेतल्याचे मानले जाते.

आज राहुरीमध्ये उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या दिवशी १६ जणांनी आपले उमेदवारी अर्ज मागे घेतले. आता प्रत्यक्ष निवडणुकीच्या रिंगणात अक्षय कर्डिले (भाजप), गोविंद मोकाटे (शरद पवार गट), संतोष चोळके (वंचित बहुजन आघाडी) या प्रमूख राजकीय पक्षांसह अपक्ष म्हणून रावसाहेब खेवरे (ठाकरे गटाचे बंडखोर), सुरेश लांबे, महेश हापसे, अथर्व म्हसे असे एकूण ७ उमेदवार राहिले आहेत. वंचित बहुजन आघाडीचे अनिल जाधव यांनीही उमेदवारी अर्ज दाखल केला होता, परंतु त्यांच्याऐवजी प्रकाश आंबेडकर यांनी संतोष चोळके यांच्यावर भिस्त सोपवली. अनिल जाधव यांनी अर्ज मागे घेतला.

अधिक वाचा  राज्यात जनगणनेचा बिगुल वाजला! ‘ॲप’द्वारेही नोंदणी प्रगणक प्रशिक्षण वेळापत्रक जाहीर; सेवाभाव प्रतिज्ञा अनिवार्य

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलेला दूरध्वनी, भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण आणि पालकमंत्री राधाकृष्ण विखे यांनी प्राजक्त तनपुरे यांच्याशी बंद खोलीत चर्चा करून त्यांना उमेदवारी करू नये अशी घातलेली गळ, यामुळे तनपुरेंनी अखेर उमेदवारी न करण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे शरद पवार गटाने ऐनवेळी अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज दाखल केलेले गोविंद मोकाटे यांना पक्षाचिन्हासाठी ‘एबी फॉर्म’ दिला. त्यामुळे मोकाटे हे आता राष्ट्रवादीचे अधिकृत उमेदवार ठरले आहेत.

प्राजक्त तनपुरे यांनी विनंती मान्य केल्याचा आनंद- मुख्यमंत्री

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज सकाळी शिर्डीमध्ये येऊन नंतर आष्टी (बीड) येथील संत वामनभाऊ महाराज यांच्या नारळी सप्ताहास उपस्थित राहाण्यासाठी रवाना झाले. या सप्ताहाच्या ठिकाणी बोलताना फडणवीस यांनी प्राजक्त तनपुरे यांनी आपली, उमेदवारी अर्ज दाखल न करण्याची विनंती मान्य केली, याचा आनंद झाल्याची सांगितले.

अधिक वाचा  सरकारचा मास्टरस्ट्रोक! रातोरात ‘नारी शक्ति वंदन अधिनियम’ निघाला अध्यादेश, देशभरात महिला आरक्षण लागू, पण अजून ट्विस्ट बाकी

मीच राष्ट्रवादीची उमेदवारी नाकारली- रावसाहेब खेवरे

ठाकरे गटाचे बंडखोर रावसाहेब खेवरे यांनी आपली उमेदवारी मागील भूमिका स्पष्ट करताना सांगितले की, महाविकास आघाडीमध्ये शरद पवार गटाचे माजी आमदार तनपुरे उमेदवारीसाठी प्रबळ दावेदार होते. मात्र पक्षाने त्यांना उमेदवारी न देता ज्यांचा पक्षाशी संबंध नाही, ज्याचा तालुक्याशी संबंध नाही, अशाला उमेदवारी दिली. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी ज्यावेळी शरद पवार यांच्याशी संपर्क साधला त्यावेळी तनपुरे उमेदवार असतील असे सांगितले होते. त्यानंतर राष्ट्रवादीने आपल्याला उमेदवारी देऊ केली होती, मात्र मी शिवसेनेशी प्रामाणिक असल्याने पक्ष सोडण्याचे कारण नव्हते त्यामुळेच मी राष्ट्रवादीची उमेदवारी नाकारली. माझी उमेदवारी ही तालुक्याच्या अस्मितेचा प्रश्न आहे, त्यामुळे माझी उमेदवारी बंडखोरी ठरत नाही.