LPG गॅस सिलिंडर बुकिंगचे नियम पुन्हा बदलले, ग्रामीण अन् शहरी भागासाठी ही नवी अट लागू

0

इराण-इस्रायल युद्धाच्या झळा आता महाराष्ट्रातील प्रत्येक घराघरात पोहोचल्याचे दिसत आहे. घरगुती गॅस सिलेंडरचा तुटवडा असल्याचे समजताच बुकिंगसाठी लोकांनी रांगा लावल्या आहेत. त्यातच घरगुती LPG गॅस सिलेंडर वितरण प्रणालीत सरकारकडून पुन्हा एकदा महत्त्वपूर्ण बदल करण्यात आला आहे. बुकिंगच्या या नव्या नियमानुसार दोन सिलेंडर घेण्यामधील कालावधीत मोठी वाढ करण्यात आली आहे. आता ग्रामीण भागात ४५, तर शहरात ४० दिवसांनंतरच नवीन सिलेंडरचे बुकिंग करता येणार आहे. याआधी हे अंतर २५ दिवसांचे होते, ज्यात आता वाढ करण्यात आली आहे. नव्या नियमामुळे सर्वसामान्यांचे हाल होत असून, रत्नागिरीमध्ये गॅस बुकिंगसाठी नागरिकांच्या रांगा लागलेल्या पाहायला मिळत आहेत.

अधिक वाचा  पुणेकरांच्या वाहनांना नवी ओळख! आता ‘एमएच ६१’; ‘एमएच १२ वन ए’च्या पर्यायावर विचार करु सध्या काही तांत्रिक अडचणी काय?

सध्या सुरू असलेल्या युद्धजन्य परिस्थितीमुळे इंधन समस्या निर्माण होणार असल्याची चर्चा जोरात सुरू आहे. त्यामुळेच आता सामान्य माणूस गॅस एजन्सीबाहेर रांगा लावताना पाहायला मिळत आहे. मोबाईलवरून गॅस बुकिंग होत नसल्यामुळे आता थेट गॅस एजन्सीवर नागरिक मोठ्या प्रमाणात गर्दी करत आहेत. एकूणच सामान्य माणूस या सर्व परिस्थितीमुळे त्रस्त झाल्याचे चित्र दिसतेय. कराड येथील ‘भारत गॅस एजन्सी’ येथील परिस्थितीचा आढावा घेऊन सामान्य नागरिकांशी बातचीत केली आहे.

पोलीस बंदोबस्तात सिलेंडरचे वितरण

गेल्या काही दिवसांपासून आखाती देशांत होत असलेल्या युद्धामुळे मोठ्या प्रमाणात गॅस सिलेंडरचा तुटवडा भासत आहे. सिलेंडर घेण्यासाठी ग्राहकांच्या गॅस एजन्सीवर मोठ्या रांगा लागल्या आहेत. त्यामुळे अमरावती आणि कोल्हापूरमध्ये पोलिसांच्या बंदोबस्तात सिलेंडरचे वाटप करण्यात येत आहे. गॅस वितरण करताना कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी केंद्राबाहेर पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. उन्हाचे चटके सोसत अनेक नागरिक रिकाम्या गॅस टाक्या घेऊन रांगेत उभे आहेत.

अधिक वाचा  महाराष्ट्रात खळबळ माजी महामंत्र्यांची भाजपमधून हकालपट्टी, आगामी निवडणुकांवर परिणाम होणार मुंबईत डॅमेज कंट्रोल सुरू

ग्राहकांच्या सकाळपासून रांगा

युद्धजन्य परिस्थितीनंतर अनेक गॅस एजन्सीवर ग्राहकांच्या रांगा लागल्या आहेत. मुंबई, पुणे, नाशिकसह महाराष्ट्रातील मोठ्या शहरांत आणि ग्रामीण भागात मोठी गर्दी बघायला मिळत आहे. वाशिममध्ये सर्व्हर डाऊन असल्यामुळे गॅस नोंदणी होत नाहीये, त्यामुळे सकाळपासून गॅस एजन्सीबाहेर नागरिक रांगेत उभे आहेत.

८० वाहने जप्त; आरटीओची मोठी कारवाई

नंदुरबार जिल्ह्यात घरगुती एलपीजी गॅसचा वाहनांमध्ये बेकायदेशीर वापर करणाऱ्या वाहनांवर आरटीओ विभागाने मोठी कारवाई केली आहे. विशेष तपासणी मोहिमेदरम्यान तब्बल ८० वाहने जप्त करण्यात आली आहेत. या कारवाईमुळे गॅसच्या काळाबाजाराचा मुद्दा पुन्हा चर्चेत आला आहे. तपासणीदरम्यान अनेक वाहनांमध्ये घरगुती एलपीजी सिलेंडरचा वापर होत असल्याचे आढळून आले. संबंधित वाहनधारकांकडून तात्काळ सिलेंडर काढून घेण्याचे आदेश देण्यात आले आहेत. भविष्यात अशा प्रकारे घरगुती गॅसचा वापर करताना आढळल्यास कठोर कारवाई करण्यात येईल, असा इशाराही देण्यात आला आहे.

अधिक वाचा  राहूल गांधींच्या कार्यक्रमापूर्वी काँग्रेस अडचणीत, ५० ते ६० कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल… ABVP तक्रारीची गंभीर दखल