पुणेकरांचा १५ दिवसांत पाणीपुरवठा पूर्ण बंद होणार? ९५२ कोटी ६२ लाख रुपयांची थकबाकी जलसंपदा विभागाचा गंभीर इशारा

0

पुणे शहरावर पाणी कपातीचे किंवा पाणीपुरवठा खंडित होण्याचे मोठे संकट ओढावण्याची शक्यता निर्माण झाली आहे. पुणे महापालिकेने जलसंपदा विभागाची तब्बल ९३२ कोटी ८८ लाख रुपयांची पाणीपट्टी थकवली असून, ही रक्कम येत्या 15 दिवसांत न भरल्यास पाणीपुरवठा तात्काळ खंडित करण्यात येईल, असा गंभीर इशारा जलसंपदा विभाग दिला आहे. पुणे शहरासाठी वर्षाला ११.६० टीएमसी पाणी मंजूर आहे. जलसंपदा विभागाच्या आकडेवारीनुसार, ३१ जानेवारीअखेर महापालिकेने ११.२३ टीएमसी पाण्याचा वापर पूर्ण केला आहे. आता केवळ ०.३६ टीएमसी पाणी शिल्लक असून, ते येत्या १२ ते १५ दिवसांत संपण्याची शक्यता आहे.

अधिक वाचा  देशात UGC ची कारवाई! ३२ बनावट विद्यापीठे जाहीर; १२ विद्यापीठे या राज्यात महाराष्ट्राच्या २ संस्था समाविष्ट

मंजूर कोटा संपल्यानंतर खडकवासला धरणातून पाणी उचलता येणार नाही, असे विभागाने महापालिकेला स्पष्ट शब्दांत कळवले आहे. महापालिकेकडे आतापर्यंत ९५२ कोटी ६२ लाख रुपयांची थकबाकी आहे. महापालिकेने नोव्हेंबर व डिसेंबर या दोन महिन्यांच्या पाणीपट्टीपोटी १९ कोटी ७५ लाख रुपयांची रक्कम जलसंपदा विभागाकडे जमा केली आहे,

तरीदेखील फेब्रुवारीअखेर महापालिकेकडे ९३२ कोटी ८८ लाख रुपयांची थकबाकी असल्याचे जलसंपदा विभागाचे म्हणणे आहे. ही थकबाकी लवकर भरावी; अन्यथा मंजूर पाणी कोटा संपल्यानंतर तो तत्काळ खंडित करण्याचा इशारा जलसंपदा विभागाने दिला आहे.

दंडाची आकारणी

जलसंपदा विभागाच्या म्हणण्यानुसार महापालिकेने गेल्या वर्षी २०२४-२५ या आर्थिक वर्षात एकूण वापराच्या ८.८४ टीएमसी अतिरिक्त पाणी वापर केला आहे. महाराष्ट्र जलसंपत्ती नियमन प्राधिकरणाच्या तरतुदीनुसार अतिरिक्त २५ टक्के पाणीवापर केल्यास दीडपट, तर त्यापेक्षा जास्त वापर केल्यास पाणी वापर दराच्या तीनपट दंड आकारला जातो. महापालिकेकडून २०१६ पासून अतिरिक्त पाणी वापर होत असल्याचे दिसून आले आहे. त्यामुळे जलसंपदा विभागाने महापालिकेला तरतुदीनुसार दंड आकारणी केली आहे.

अधिक वाचा  महाराष्ट्रातील राज्यसभेच्या ७ जागांची निवडणूक जाहीर; २६ फेब्रुवारीला अधिसूचना १६ मार्चला मतदान मतमोजणी

पुणेकरांचे लक्ष महापालिकेकडे

ऐन उन्हाळ्याच्या तोंडावर एवढी मोठी थकबाकी भरणे किंवा पाण्याचे नियोजन करणे पालिकेसाठी मोठे आव्हान ठरणार आहे. आता महापालिका प्रशासन यावर काय तोडगा काढते, याकडे सर्व पुणेकरांचे लक्ष लागले आहे.

महत्त्वाचे मुद्दे

– २०१६ पासूनची पाणीपट्टी आणि दंड मिळून एकूण ९३२.८८ कोटी रुपयांची थकबाकी

– महापालिकेने मंजूर कोट्यापेक्षा ८.८४ टीएमसी जास्त पाण्याचा वापर

– नियमानुसार, मर्यादेपेक्षा जास्त पाणी वापरल्यास दराच्या तीनपट दंड

– दंडामुळेच थकबाकीचा आकडा ९०० कोटींच्या पार