गुहागर : दि. ११ (रामदास धो. गमरे) इंग्लंडचा लॉर्ड कर्णिक भारतभ्रमंतीवर असताना त्याने जेव्हा बुद्ध तत्वज्ञानाचा शोध लावला तेव्हा त्याला अडीच हजार वर्षांपूर्वी असलेल्या देवानप्रिय सम्राट अशोक यांची माहिती मिळाली, अशोकाने बुद्धाच्या नंतर ८४ हजारा पेक्षा जास्त बुद्धलेणी भारतभर कोरल्या ज्याची यशोगाथा त्या लेण्यांतील कोरीव कामात प्रतिबिंबित होते. भारतात कुठे ही उत्खनन जर केलं तर त्याठिकाणी बुद्धच सापडेल, सागरी किनारा लाभलेल्या कोकणात दर २५ किलोमीटर अंतरावर बुद्धविहार होती, या बुद्धविहारात स्त्री-पुरुषांना समानता होती ही विहार भारताला जगाशी जोडणारी व्यापार केंद्र होती आणि तिथूनच दळणवळण केलं जातं असे याच्यावर खऱ्या अर्थाने कोणी काम केलं असेल तर ते छत्रपती शिवाजी महाराजांनी, दूरदृष्टी लाभलेल्या शिवाजी महाराजांनी; सागर किनारी जी बुद्धविहार होती त्यांची तटबंदी जोडून त्यांना किल्ल्यात रूपांतर करून त्यांच आरमारात रूपांतर केलं व बुद्धकाळापासून सुरू असलेली समानता, मातृसत्ताक प्रणाली जोपासण्याच काम केलं त्यामुळेच शिवाजी महाराजांचे वडील शहाजी राजांच्या निधनानंतर जिजाऊ तत्कालीन प्रथेनुसार सती जाणार होत्या परंतु शिवाजी महाराजांनी त्यांना अडवत त्यांना म्हटलं की “हे स्वराज्य मी आपल्या इच्छेनुसार व मार्गदर्शनाखाली मी निर्माण केलं आहे जर आपणच सती गेलात तर या स्वराज्याला काय अर्थ” शिवाजी महाराजांच्या सांगण्यावरून जिजाऊनी सती न जाता स्वराज्याच संरक्षण करीत त्याला नवी दिशा मिळवून दिली आणि शिवाजी महाराजांसारखा आदर्श राजा त्यांनी घडवला. त्या काळात असलेल्या मनुस्मृतीस शिवाजी महाराजांनी कधीच मान्यता दिली नाही, मनुस्मृती समर्थक त्याकाळी समुद्र ओलांडू नका सांगत कारण समुद्राच्या पार असलेल्या ठिकाणी भारतातील माणूस गेला तर शिकून सवरून ज्ञानप्राप्ती करून स्वतःची प्रगती करेल व आपल्याला वरचढ होईल म्हणून समुद्र उल्लंघन करू नये अस थोतांड सांगून त्याचा प्रचार व प्रसार जनमानसात केला मात्र शिवाजी महाराजांनी मनुस्मृती झुगारून सागरी किल्ले बांधले, सागरी किनारी असणाऱ्या बुद्धविहारांची तटबंदी जोडून त्यांचे किल्ल्यात रूपांतर केले व भारतात पहिल्यांदाच सागरी आरमार निर्माण करून भारताचा बाहेरील जगाशी संपर्काचा दुवा जोडला व बुद्धांनी दिलेली समता, स्वतंत्र, विश्वबंधुता ही बुद्धांची तत्व त्यांनी जोपासली अस महान कार्य शिवाजी महाराजांनी केलं. त्यामुळे बुद्धमय असलेल्या कोकणात आईची हत्या करणारा क्रोधी परशुराम कसा का कोकणची भूमी निर्माण करू शकतो ? कोकणात व भारतात कुठे ही जिथे उत्खनन कराल तिथे बुद्ध सापडतील म्हणून ही परशुरामाची भूमी नसून बुद्धभूमी आहे” असे प्रतिपादन राजाराम पाटील यांनी ६ डिसेंबर रोजी महापरिनिर्वाण दिनानिमित्त वरवेली येथे आयोजित डॉ. बाबासाहेब आंबेडकर अभिवादन सभेत प्रमुख वक्ता या नात्याने बोलत असता केले.






बौद्धजन सहकारी संघ शाखा क्र. ९ मौजे वरवेली संलग्न बौद्ध विकास मंडळ, वरवेली (रजि.) ता. गुहागर, जिल्हा रत्नागिरी यांच्या संयुक्त विद्यमाने सालाबादप्रमाणे याही वर्षी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या ६९ व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त अभिवादन सभा राजेश पवार यांच्या अध्यक्षतेखाली वरवेली येथे आयोजित करण्यात आली होती. सदर प्रसंगी प्रमुख वक्ते राजाराम पाटील आपल्या भाषणात पुढे “या वरवेली गावात असलेल्या बुद्धविहारात डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या अस्थि असून याच गावात छत्रपती शिवाजी महाराजांच मंदिर ही आहे म्हणून या दोन महापुरुषांची या भूमीत नाळ जोडली गेली आहे” असे नमूद केलं.
सदर प्रसंगी प्रमुख पाहुणे राजाराम पाटील यांनी बुद्धांच्या व बाबासाहेबांच्या अस्थिकलशास पुष्पसुमन अर्पण करून ज्योत प्रज्वलित केली व शशिकांत जाधव, श्रामणेर मयूर पवार यांनी सुमधुर वाणीने पूजपठण करून कार्यक्रमाला सुरवात केली तसेच राहुल पवार व अमोल पवार यांनी आपल्या पहाडी प्रभावी आवाजात, लाघवी भाषाशैलीत सूत्रसंचालन केले. सदर अभिवादन सभेस सरपंच नारायणराव आंग्रे, उपसरपंच सौ. मृणाल विचारे, कार्याध्यक्ष वैभव पवार, तंटामुक्ती समितीचे अध्यक्ष जगन्नाथ शिंदे, राजाने वाडीतील अनिल राजाने, बौद्धजन सहकारी संघाचे उपाध्यक्ष विजू आप्पा कदम आदी मान्यवर उपस्थित होते त्यानी ही डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन करीत आपले विचार व्यक्त केले.
प्रमुख वक्ते राजाराम पाटील यांनी आपल्या भाषणात “वरवेली गावात बाबासाहेबांचा अस्थिकलश आहे हे कळण्याने मी येथे आलो व आल्यावर सरपंच नारायणराव आंग्रे यांच्या कडून कळाले की छत्रपती शिवाजी महाराजांचे ही मंदिर ही याच वरवेली गावात आहे म्हणून या दोन महापुरुषांच्या विचारांचा पाईक म्हणून मी या गावच देणं लागतो अस माझं मत आहे आपणही या दोन महापुरुषांच्या विचारांना अंगीकरून पुढील वाटचाल केली पाहिजे, मी स्वतः अलिबाग येथील आगरी कोळी समाजाचा असून तथागत गौतम बुद्धांच्या माता महामाया देखील कोळी समाजाच्या होत्या आमच्या साठी तेहतीस कोटी देवांनी जे केलं नाही ते या महापुरुषांनी करून दाखवलं व आम्हाला माणसात आणलं म्हणून यांना मी वंदन करतो” असे नमूद केले.
अध्यक्षीय भाषणात राजेश पवार यांनी तालुक्यातील गावागावातून आलेल्या सर्वांचे, प्रमुख वक्ते राजाराम पाटील व उपस्थितांचे तसेच सदर कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी अथक परिश्रम घेणाऱ्या सर्वांचे आभार मानून कार्यक्रमाची सांगता केली.












