‘सत्य सर्वांचे आदी घर सर्व धर्मांचे माहेर, जगामाजी सुख सारे खास सत्याची ती पोरे, सत्य सुखाला आधार, बाकी सर्व अंधकार हे अखंड काव्य थोर समाजसुधारक महात्मा फुले यांनी रचले असून त्याद्वारे जातीभेद, धर्म आणि वर्ग यावर आधारित भेदभावांना आव्हान देऊन त्यांनी एकतेचा संदेश दिला. हाच अखंड पुढे डॉ. बाबा आढाव यांनी केवळ अंगीकारला नव्हे तर त्यांच्या अंगी भिनला. सभेची सुरुवात ते या ‘अखंडा’ने करत असत हे सर्वश्रुत आहे. परंतु, ज्यावेळी बाबा रुग्णालयात शेवटची घटका मोजत होते, त्यावेळी देखील त्यांनी अखंड म्हटला. यावरून बाबांचा शेवटच्या श्वासापर्यंत त्यांचे ‘अखंडा’ वर किती निष्ठा, प्रेम होते हे दिसून येते.






शोषित, कष्टकऱ्यांचे नेते बाबा यांना ताप, फुफ्फुसाच्या संसर्ग झाल्याने त्यांना २४ नोव्हेंबरला पूना हॉस्पिटलमध्ये उपचारांसाठी डॉ. अभिजित वैद्य यांच्या नेतृत्वाखाली दाखल केले होते. त्यांच्या प्रकृतीमध्ये चढ-उतार सुरू होते परंतु, त्यावेळी ते बोलतही होते. दुसऱ्या दिवशी (ता. २५) बाबांना डॉ. वैद्य तपासायला गेले असता बाबांनी त्यांना ‘झिंदाबाद’ असे संबोधन करून स्वागत केले. तसेच बाबांनी ५२ वर्षांपूर्वी सुरू केलेल्या फुले व्याख्यानमालेतील वैद्य यांनी नुकतेच केलेले भाषण चांगले झाले, अशी दादही त्यांनी डॉ. वैद्य यांना दिली. अन् दिवसाची सुरुवात महात्मा फुलेंचा अखंड म्हणत केली, अशी माहिती डॉ. वैद्य यांनी दिली. यातून त्यांचे ‘अखंड’ वर किती प्रेम होते हे दिसून येते.
महात्मा फुले यांनी ‘अखंड’ या काव्यप्रकारातून आपले विचार मांडले आहेत. सामाजिक सुधारणा, अंधश्रद्धा निर्मूलन आणि शिक्षणाचे महत्त्व यावर त्यांनी जोर दिला. तसेच कर्मकांड, जाती विषमता, सनातनीपणा, लुबाडणूक, विद्येचे महत्त्व, धर्म, दीनदुबळ्यांची सेवा इत्यादी विविध विषयांवर फुले यांनी अखंडची रचना केली आहे. तो अखंड बाबांना प्राणप्रिय होता. ते जाहीर सभेच्या आधी अखंड म्हणत असत. अगदी शेवटच्या घटका मोजत असतानाही त्यांनी म्हटल्याने बाबांची त्यावरील निष्ठा किती प्रखर होती हे दिसून आले.













