महाराष्ट्र ऑलिम्पिक संघटनेच्या (MOA) अध्यक्षपदासाठी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार आणि केंद्रीय नागरी विमान वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. महायुतीतील दोन बडे नेते यानिमित्ताने एकमेकांसमोर उभे ठाकले आहेत. अजित पवार विरुद्ध मुरलीधर मोहोळ अशी होणारी ही निवडणूक आता मोहोळ यांच्याकडून प्रतिष्ठेची राजकीय लढाई बनवली आहे. परंतु राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या वतीने या विषयावरती पडदा टाकताना केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांचे कान टोचण्यात आले.






अजितदादांच्या विरुद्ध का दंड थोपटले याबाबतचे स्पष्टीकरण मुरलीअण्णांनी गुरुवारी पत्रकार परिषदेत दिले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा मी जेवढा आदर करतो तेवढाच आदर मी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा देखील करतो. त्यामुळे अजितदादांच्या विरोधात आम्ही मैदानात आहोत, असं स्वरूप देणं चुकीचं असल्याचे मोहोळ यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.
ऑलम्पिक असोसिएशनच्या कामावर मोहोळ यांनी काही आक्षेप घेतले आहेत. “ऑलम्पिक असोसिएशनमध्ये काही चुकीच्या गोष्टी घडल्या. त्या गोष्टी सचिव आणि इतर लोकांनी केल्या. त्यामध्ये अजितदादांनी लक्ष घालून जर त्या गोष्टी योग्य केल्या तर आम्हाला कोणतीही निवडणूक लढण्याची इच्छा नाही,” असे मोहोळ यांनी स्पष्ट केले आहे.
मुरलीधर मोहोळ यांनी पत्रकार परिषदेत केलेले आरोप अजित पवार यांनी फेटाळले असून त्यासंदर्भात स्पष्टीकरण दिले आहे. क्रीडा संघटनाच्या निवडणुकांमध्ये राजकारण नको म्हणून आपण हे सर्व सहन केलं. कुठलेही राजकीय भाष्य अद्याप पर्यंत केले नाही. पण आता तेच जर पत्रकार परिषद घेऊन आरोप करत असतील,तर त्याला उत्तर देणे आवश्यक आहे, म्हणून आपण हे स्पष्टीकरण देत असल्याचे पवार यांनी म्हटले आहे.
2013 पासून महाराष्ट्र ऑलिंपिक असोसिएशनचा अध्यक्ष म्हणून मी जबाबदारी सांभाळली आहे. या कालावधीत खेळाचा दर्जा सुधारावा, खेळाडूंना उच्च दर्जाच्या सुविधा मिळाव्यात,म्हणून सर्वांना सोबत घेऊन काम केले. आम्ही कार्यभार घेण्याआधी राष्ट्रीय क्रीडा स्पर्धांमध्ये महाराष्ट्र राज्य सातव्या/ आठव्या स्थानावर होते. पण सलग मागील तीन राष्ट्रीय क्रीडा स्पर्धांमध्ये महाराष्ट्र आता प्रथम क्रमांकावर आहे.
या यशाबद्दल महाराष्ट्राच्या खेळाडूंच्या पथकाचे आणि पदाधिकाऱ्यांचे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या उपस्थितीमध्ये सत्कारही झाले आहेत. असे असताना केवळ निवडणुकांवर डोळा ठेऊन काही राजकीय व्यक्ती,संघटनेच्या एका विशिष्ट व्यक्तीला टार्गेट करण्यासाठी विविध आरोप राजकीय हेतूने करत आहेत, हे वागणे महाराष्ट्राच्या क्रीडा संस्कृतीला शोभणारे नाही. खेळाडूंची अशी कोणतीही तक्रार नसून,असे आरोप कोणत्याही खेळाडूने अद्याप केलेले नाहीत, असे अजितदादांनी स्पष्ट केले आहे.
३६ व्या आणि ३७ व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धांचा हिशेब क्रीडा विभागाला असोसिएशनकडून याआधीच सादर झालेला आहे. ३८ व्या स्पर्धेचा हिशेब मात्र वेगवेगळ्या टप्प्यावर प्रक्रियेमध्ये असून सदस्य संघटनांकडून तो अद्याप प्राप्त झालेला नाही. मोहळांच्या संघटनेकडून आणि त्यांच्यासोबत असलेल्या अन्य पाच सहा संघटनांकडून देखील अद्याप हिशेब सादर करण्यात आलेले नाही. त्याचबरोबर अन्य दहा-बारा संघटनांचा देखील हिशोब आलेला नाही. तो एकत्रित करून उपलब्ध करून देण्यात येत आहे. ही प्रक्रिया सुरू असताना केवळ हिशोब सादर झाला नाही म्हणून त्यांनी भ्रष्टाचार केला, असे म्हणणे योग्य नाही, असे पवार यांनी सांगितले.
मोहोळांनी हिशेब द्यावा!
खेळात खिलाडूपणा हवा….. सुडाची भावना नको, या मताचे आम्ही आहोत. मोहोळांच्या संघटनेसह प्रत्येक संघटनेने आपापले हिशेब वेळेत द्यावेत, म्हणजे आमच्या असोसिएशनला वेळेत हिशेब सादर करता येतील,अशी विनंती अजित पवार यांनी केली आहे.











