मान्सून अंदमान निकोबार बेटावर आज दाखल होण्याची शक्यता आहे. अंदमान-निकोबारमध्ये मुसळधार पाऊस झाला असून येत्या २४ तासात अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे. अंदमान-निकोबारनंतर पुढच्या पाच दिवसात बंगालचा उपसागर आणि अरबी समुद्रातही मान्सून पोहोचेल असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. गेल्या २४ तासात निकोबार बेटावर काही भागात मुसळधार पाऊस झाला. हवामान विभागाने म्हटलं की, मंगळवारी १३ मे रोजी मान्सून अंदमान समुद्र, दक्षिण बंगालचा उपसागरात दाखल होण्यासाठी अनुकूल परिस्थिती निर्माण झालीय. यानंतर मान्सून मालदीव, कोमोरिन आणि दक्षिण बंगालच्या उपसागरात दाखल होण्याची शक्यता आहे.






दरम्यान, मान्सूनच्या दाखल होण्याआधी महाराष्ट्रात पावसाने हजेरी लावलीय. सोमवारी राज्यातील बहुतांश भागात मुसळधार पाऊस झाला. वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसाने काही ठिकाणी फळबागांचे प्रचंड नुकसान झालंय. येत्या ४८ तासातही राज्यात वीजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवलीय.
राज्यात पावसामुळे तापमानाचा पारा खाली आला आहे. उन्हाच्या कडाक्याने हैराण झालेल्या नागरिकांना यामुळे दिलासा मिळाला आहे. येत्या दोन दिवसात विदर्भासह कोकण आणि गोव्यात तुरळक पावसाची शक्यता आहे. तर मंगळवारी पश्चिम महाराष्ट्रासह मराठवाड्यातील काही भागात जोरदार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आलाय. पुणे, कोल्हापूर, सातारा, सांगली, बीड, धाराशिव या जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट देण्यात आलाय. या जिल्ह्यांमध्ये वीजांच्या कडकडाटासह हलक्या आणि मध्यम स्वरुपाच्या पावसाची शक्यता आहे.













