छत्रपती शिवाजी महाराजांच्या १२ किल्ल्यांना युनेस्कोचा जागतिक वारसा दर्जा मिळवून देण्यासाठी राज्य सरकारकडून हालचाली केल्या जात आहेत. यासाठी राज्याचं शिष्टमंडळ आज पॅरिसला रवाना झालंय. राज्याचे सांस्कृतिक कार्यमंत्री अॅड. आशिष शेलार यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळ रवाना झालं असून त्यांना मराठा लष्करी भूप्रदेश या संकल्पनेत किल्ल्यांचा युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळांमध्ये समावेश व्हावा यासाठी प्रस्ताव सादर केला आहे.






राज्य सरकारकडून छत्रपती शिवाजी महाराजांच्या १२ किल्ल्यांचा जागतिक वारसा स्थलात समावेश करण्यासाठी प्रस्ताव दिलाय. या किल्ल्यांमध्ये रायगड, राजगड, प्रतापगड, पन्हाळा, शिवनेरी, लोहगड, साल्हेर, सिंधुदुर्ग, सुवर्णदुर्ग, विजयदुर्ग, खांदेरी किल्ला आणि तामिळनाडुतल्या जिंजी किल्ल्याचा समावेश आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या गड किल्ल्यांचा जागतिक पातळीवर सन्मान व्हावा यासाठी राज्य सरकारने हा निर्णय घेतलाय.
किल्ल्यांचा समावेश युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळांमध्ये व्हावा यासाठी प्रभावी आणि पूर्ण क्षमतेनं सादरीकरण राज्य सरकारकडून केलं जाणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सूचनेनुसार राज्याचं शिष्टमंडळ पॅरिसला गेलं आहे. राज्य शासनाचा हा प्रस्ताव पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी युनेस्कोकडे पाठवला. त्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे मंत्री आशिष शेलार यांनी आभार मानले आहेत.
राज्याचं शिष्टमंडळ २२ ते २६ फेब्रुवारी असे चार दिवसांच्या पॅरिस दौऱ्यावर गेले आहे. मंत्री आशिष शेलार यांच्यासह अपर मुख्य सचिव विकास खारगे, पुरातत्व व वस्तुसंग्रहालय संचालनालयाचे उपसंचालक हेमंत दळवी, वास्तुविशारद श्रीमती शिखा जैन यांचाही शिष्टमंडळात समावेश आहे.
छत्रपती शिवाजी महाराजांच्या किल्ल्यांना जागतिक वारसा दर्जा मिळवण्यासाठी सादरीकरण केलं जाईल. यामुळे किल्ल्यांना जागतिक स्तरावर ओळख मिळण्यास मदत होईळ. तसंच राज्यातील सांस्कृतिक वारशाचं महत्त्वही अधोरेखित होईल. युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळांच्या यादीत गडकिल्ल्यांचा समावेश झाल्यास किल्ल्यांचे जतन, संवर्धन आणि पर्यटन विकासासाठी संधी निर्माण होतील. स्थानिक अर्थव्यवस्थेला चालना मिळेल असं आशिष शेलार म्हणाले.











