अयोध्येतील महान पुजाऱ्याचं निर्वाण, सत्येंद्र दास यांनी घेतला जगाचा निरोप

0
1

राम मंदिराचे मुख्य पुजारी सत्येंद्र दास यांचे निधन झाल्याचे वृत्त ‘एएनआय’ या वृत्तसंस्थेनं दिले आहे. वयाच्या 85 व्या वर्षी लखनौ पीजीआयमध्ये त्यांनी अखेरचा श्वास घेतला. आचार्य सत्येंद्र दास यांना 3 फेब्रुवारी रोजी स्ट्रोकनंतर गंभीर अवस्थेत लखनौ पीजीआयच्या न्यूरोलॉजी वॉर्डच्या एचडीयूमध्ये दाखल करण्यात आले होते.

आचार्य सत्येंद्र दास यांचे शिष्य प्रदीप दास यांनी सांगितले की, दीर्घ आजारानंतर सकाळी आठ च्या सुमारास लखनऊच्या पीजीआयमध्ये त्यांचे निधन झाले. त्यांचे पार्थिव पीजीआयमधून अयोध्येत आणले जात आहे. शिष्यांनी त्यांचे पार्थिव अयोध्येत नेले आहे. उद्या, 13 फेब्रुवारीला अयोध्येतील सरयू नदीच्या तीरावर त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.

अधिक वाचा  भाजपकडून राजकीय सोयीसाठी प्रभागरचनेत नियमांचे उल्लंघन; काँग्रेस-राष्ट्रवादीचा संयुक्त पत्रकार परिषदेत आरोप

नुकतेच पीजीआयने एक हेल्थ बुलेटिन जारी केले होते ज्यात सत्येंद्र दास यांना मधुमेह आणि उच्च रक्तदाब यासारखे गंभीर आजार असल्याचे म्हटले होते.

उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांची ‘एक्स’ पोस्ट

सत्येंद्र दास यांनी सुमारे 33 वर्ष राम मंदिराची सेवा केली. फेब्रुवारी 1992 मध्ये ‘वादग्रस्त जमिनी’मुळे रामजन्मभूमीची जबाबदारी जिल्हा प्रशासनावर गेली तेव्हा जुने पुजारी महंत लालदास यांना हटवण्याची चर्चा होती. दरम्यान, 1 मार्च 1992 रोजी भाजपचे खासदार विनय कटियार, विश्व हिंदू परिषदेचे नेते आणि तत्कालीन विहिंप प्रमुख अशोक सिंघल यांच्या संमतीने सत्येंद्र दास यांची नियुक्ती करण्यात आली. सत्येंद्र दास यांनी एका मुलाखतीत सांगितले होते की, त्यांनी 1975 मध्ये संस्कृत विद्यालयातून आचार्य पदवी प्राप्त केली होती.

अधिक वाचा  पुणे मानाचे गणपती विसर्जन मिरवणुक वेळापत्रक समोर, असा असेल मार्ग? पोलिस आयुक्त अमितेश कुमारांची माहिती