एकनाथ शिंदेंची मनधरणी सुरुच सहमतीनंतरच मंत्रिमंडळ विस्ताराचा शपथविधी होणार; फडणवीस-शहा चर्चेनंतर वेग

0

मुंबई : गृह, नगरविकासह महत्त्वाची खाती देण्यास भाजप तयार नसल्याने नाराज असलेल्या उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची मनधरणी करण्यासाठी भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी गुरुवारी सायंकाळी ‘वर्षा’ बंगल्यावर भेट घेऊन चर्चा केली. पहिल्या टप्प्यात २५-२८ मंत्र्यांचा समावेश मंत्रिमंडळात करण्याचा प्रस्ताव आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची नवी दिल्लीत बुधवारी रात्री भेट घेऊन चर्चा केली आणि त्यानंतर मंत्रिमंडळ विस्ताराच्या हालचालींना वेग आला.

महायुतीमध्ये खातेवाटप आणि मंत्रीपदांच्या वाटपावरून पेच असून भाजपला २०, शिवसेना १२ आणि राष्ट्रवादी काँग्रेसला १० असे मंत्रीपदांचे सूत्र भाजपने ठरविले आहे. मात्र सध्या प्रत्येकी आठ-नऊ मंत्र्यांचा शपथविधी करून उर्वरित खाती काही काळ रिक्त ठेवावीत, असा महायुतीच्या नेत्यांचा विचार आहे. शपथविधीसाठी शनिवारी दुपारी बाराच्या सुमारास तयारी ठेवावी, अशा सूचना प्रशासन यंत्रणेला व राजभवनावर देण्यात आल्या असल्याचे समजते. मात्र शपथविधी कार्यक्रम आणि किती मंत्र्यांचा समावेश करण्यात येणार आहे, याबाबतचा तपशील फडणवीस किंवा महायुतीच्या नेत्यांनी अधिकृतपणे अद्याप जाहीर केलेला नाही.

अधिक वाचा  ‘स्थानिक’चा मुहुर्त ठरला त्रिस्तरीय निवडणुका! या महिन्यात २९ महापालिका अन् ‘या’ दिवशी २४७ पालिका १४७ पंचायती

मंत्र्यांची संख्या, खातेवाटपावरून भाजप आणि मित्रपक्षांतील पेच मिटलेला नाही. त्यामुळे बावनकुळे यांनी नवी दिल्लीहून आल्यावर पुन्हा शिंदे यांची भेट घेतली. याआधीही बावनकुळे, गिरीश महाजन यांनी शिंदे यांच्याशी चर्चा केली होती.

भाजपची कसरत

शिंदे गृह, नगरविकास, सार्वजनिक बांधकाम, परिवहन आदी महत्वाच्या खात्यांसाठी अडून बसल्याने १३२ हून अधिक आमदार निवडून आलेल्या भाजपला त्यांची समजूत घालण्यासाठी बरेच प्रयत्न करावे लागत आहेत. महायुतीमध्ये मंत्रिमंडळावरून कोणताही पेच नसल्याचे फडणवीस व अन्य नेते सांगत असले तरी त्याबाबत ठोस निर्णय झाला नसल्यानेच शिंदे यांच्याशी भाजपला अनेकदा चर्चा करावी लागत आहे. शिंदे यांनी खातेवाटप आणि मंत्र्यांची संख्या व नावे याबाबत सहमती दर्शविल्यावरच शनिवारी मंत्रिमंडळाचा शपथविधी होणार असल्याचे सूत्रांनी नमूद केले.

अधिक वाचा  कोथरूडला ऐन दिवाळीत ‘तात्काळ’ कारवाई धडाका?; भाजपाची एक तक्रार अन् पालिका प्रशासन तडफदार