भाजपाचं अजब नियोजन १५२ नव्हे, १७१ जागी लढताहेत उमेदवार! अशी केलीय खेळी की मित्रपक्षही झालं निशब्द!

0
1

विधानसभा निवडणुकीचे वारे वाहू लागल्यावर राज्यात सत्ताधारी असलेल्या महायुतीमधील घटक पक्षांसाठी जागावाटप ही डोकेदुखी ठरणार, अशी शक्यता वर्तवली जात होती. त्यात लोकसभा निवडणुकीत झालेल्या पिछेहाटीनंतर महाराष्ट्रातील जागावाटपामध्ये शिवसेना शिंदे गट आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट अधिकाधिक जागांवर अडून भाजपाच्या अडचणीत भर घालणार, असंही बोललं जात होते. मात्र प्रत्यक्षात भाजपानेमहायुतीमधील जागावाटपाचा तिढा मोठ्या चतुराईने सोडवत २८८ पैकी तब्बल १५२ जागा पदरात पाडून घेतल्या. एवढंच नाही तर, आपण महायुतीमधील मित्रपक्षांच्या यादीवर नजर टाकली तर भाजपाने आपल्या काही नेत्यांना शिंदे गट आणि अजित पवार गटामध्ये पाठवून तिथून त्यांना उमेदवारी दिल्याचंही दिसून येतंय. भाजपाने मित्रपक्षांमध्ये पाठवलेल्या उमेदवारांची संख्या थोडी थोडकी नाही तर १९ एवढी आहे. आता हा आकडा भाजपा लढवत असलेल्या १५२ जागांमध्ये जोडला तर विधानसभा निवडणुकीत भाजपाचे तब्बल १७१ उमेदवार रिंगणात असल्याचं दिसून येतंय.

भाजपाने शिवसेना शिंदे गटामधून आपल्या १३ नेत्यांना उमेदवारी मिळवून दिली आहे. त्यामध्ये निलेश राणे, शायना एनसी, संजना जाधव-दानवे, मुरजी पटेल, बळीराम शिरसकर यांचा समावेश आहे. तर राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटामधूनही भाजपाने आपल्या ५ नेत्यांना उमेदवारी मिळवून दिली आहे. त्यामध्ये माजी मंत्री राजकुमार बडोलेंसह प्रतापराव पाटील चिखलीकर, संजयकाका पाटील, निशिकांत पाटील आणि भरत गावित यांचा समावेश आहे. तर आरपीआय आठवले गटाच्या वाट्याला गेलेल्या कालिन्यामध्ये भाजपाने आपल्याच पक्षातील अमरजित सिंह यांना उमेदवारी दिली आहे. एकूणच मित्रपक्षांना अधिकाधिक जागा देऊन खूश करतानाच त्यांच्या जागांवरून आपल्या पक्षातील नेत्यांना उमेदवारी देत भाजपाने डबल गेम केला आहे.

अधिक वाचा  मराठा समाजानंतर OBC समाजासाठीही उपसमितीची स्थापना; राज्य मंत्रिमंडळाचा निर्णय

भाजपाने शिंदे गट आणि अजित पवार गटात पाठवून उमेदवारी मिळवून दिलेले उमेदवार पुढीलप्रमाणे आहेत.

मतदार संघ – शिंदे सेना उमेदवार (भाजपातून आयात) 14

कुडाळ : निलेश राणे

कन्नड : संजना जाधव-दानवे

पालघर : राजेंद्र यादव

बोईसर : विलास तारे

भिवंडी पूर्व : संतोष शेट्टी

अंधेरी पूर्व : मुरजी पटेल

मुंबादेवी : शायना एन सी

संगमनेर : अमोल खताळ

धाराशिव : अजित पिंगळे

करमाळा : दिग्विजय बागल

नेवासा : विठ्ठल लंघे

बाळापुर : बळीराम शिरसकर

परभणी : आनंद भरोसे

नवापूर – भरत गावित

मतदारसंघ : राष्ट्रवादी (भाजपातून आयात) 5

अर्जुनी मोरगाव : राजकुमार बडौले

लोहा-कंधार : प्रताप पाटील चिखलीकर

वाळवा-इस्लामपूर : निशिकांत पाटील

तासगाव-कवठे महांकाळ : संजयकाका पाटील

कालिना : अमरजित सिंग (रिपाई आठवले)

आता या नेत्यांना काही तडजोड करून आपल्याच पक्षाकडून निवडणूक लढवण्याची संधी न देता भाजपाने त्यांची मित्रपक्षांमध्ये पाठवणी का केली, या मागे नेमकी खेळी काय आहे, याबाबत माहिती देताना लोकमतच्या छत्रपती संभाजीनगर आवृत्तीचे संपादक नंदकिशोर पाटील यांनी सांगितले की, भाजप, शिंदे सेना आणि अजित पवार गट या तिघांचीही महायुती आहे. जागावाटपामध्ये या तिघांचाही काही जागांवर दावा होता. त्यामुळे ती जागा नेमकी कुणाला द्यायची हा प्रश्न होता. त्याबाबत उदाहरणच द्यायचं तर आपल्याला कन्नड विधानसभा मतदारसंघाचं उदाहरण देता येईल. येथे उदयसिंह राजपूत हे शिवसेनेचे विद्यमान आमदार होते. मात्र ते ठाकरे गटात आहेत. पण विद्यमान आमदार असल्याने त्या जागेवर शिंदे गटाने दावेदारी सांगितली. तर भाजपानेही या जागेवर दावेदारी केली होती. रावसाहेब दानवेंच्या कन्या संजना जाधव ह्या इथून दोन अडीच वर्षांपासून तयारी करत होत्या. त्यामधून भाजपच्या उमेदवाराला शिंदेसेनेने उमेदवारी द्यायची असा तोडगा काढला गेला. भाजपा आणि शिवसेना शिंदे गटाने अशी तडजोड एकूण १३ विधानसभा मतदारसंघांमध्ये केली. यामध्ये निलेश राणे, शायना, एनसी, मुरजी पटेल आदी प्रमुख नेत्यांचा समावेश आहे. आता त्यांना संधी दिली गेली नसती, तर त्या त्या मतदारसंघांमध्ये बंडखोरी झाली असती. त्यामुळे आपल्या कार्यकर्त्यांना संधी मिळावी आणि मित्रपक्षाला जागा मिळावी यासाठी भाजपाने अगदी नियोजनबद्धरीत्या ही खेळी केली आहे. असंच चित्र अजित पवार गटामध्येही दिसून येत आहे. तिथेही भाजपाने ९ नेत्यांना अजित पवार गटातून संधी दिली आहे. त्यामध्ये अर्जुनी मोरगावमधील राजकुमार बडोले, लोहा-कंधारमधील प्रतापराव पाटील चिखलीकर यांचा समावेश आहे.

अधिक वाचा  राज्य मंत्रीमंडळ बैठकीत 14 निर्णय; मुंबई- ठाणे नविन मेट्रो मार्गिका, पुणे-लोणावळा हा निर्णय, सर्व जाणून घ्या! 

महायुतीमध्ये काही ठिकाणी मैत्रिपूर्ण लढती होत आहेत. त्यामध्ये बीडमधील आष्टी मतदारसंघाचं उदाहरण देता येईल. त्याशिवाय गेवराईमध्येही भाजपामधील अपक्ष उमेदवार रिंगणात आहेत. त्यांनाही अगदी नियोजनबद्धरीत्या निवडणुकीच्या रिंगणात उतरवण्यात आलं आहे. हे लोक निवडून आले किंवा बंडखोर अपक्ष निवडून आले तरी त्यांची भाजपाशीच जवळीक असेल. महाराष्ट्रात सरकार स्थापन करायला १४५ जागा लागतात. त्यामुळे भाजपा लढवत असलेल्या १७१ जागांपैकी ७१ जागा आल्या तरी भाजपाचं सरकार स्थापन होऊ शकतं, असे नंदकुमार पाटील यांनी सांगितले.

मात्रा या आमदारांना पक्षांतरबंदी कायदा लागू असेल. त्यामुळे ते उघडपणे पक्षविरोधी भूमिका घेऊ शकणार नाहीत. तसेच त्यांना शिंदेंसारखा निर्णय घ्यायचा असेल तर पक्षातील दोन तृतियांश एवढे सदस्य फोडावे लागतील. मात्र भाजपामधून आलेले हे नेते निवडून आले तरीही ती एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांच्यासाठी पुढे चिंतेचीच बाब असणार आहेत. त्याचं कारण म्हणजे शिंदे, अजित पवार गटाकडून निवडून आले तरी या नेत्यांचा ओढा हा भाजपाकडेच असणार आहे. त्यातही महायुतीचं सरकार आलं तर फार मोठा प्रश्न निर्माण होणार नाही. मात्र सरकार आलं नाही तर मात्र या नेत्यांच्या निष्ठा डळमळीत होऊ शकतात. त्यातही राज्यसभा आणि विधानसभा निवडणुकीत त्यांचा फायदा भाजपाला होऊ शकतो, अशी माहितीही नंदकुमार पाटील यांनी दिली.

अधिक वाचा  कोथरूड सर्वपक्षीय गणेश विसर्जन नियोजन समिती; 17वा विसर्जन नियोजन महोत्सव…तोच उत्साह …तोच ध्यास!

एकूणच भाजपानं स्वपक्षाच्या अधिकाधिक जागा निवडून आणताना मित्रपक्षांमध्येही आपल्या पक्षाशी निष्ठावंत असलेल्या नेत्यांना पाठवून तिथेही आपला प्रभाव कायम ठेवण्याची खेळी केली आहे. आता भाजपाची ही खेळी कितपत यशस्वी ठरेल हे निवडणुकीचा निकाल लागल्यानंतरच स्पष्ट होणार आहे.