पुणे शहरातील कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न आता ऐरणीवर आला आहे. पुण्यात गुन्हेगारीच्या वाढत्या घटनांमुळे दहशतीचं वातावरण आहे. गुन्हेगारी प्रवृत्तीच्या लोकांवर कायद्याचा धाक राहिला नसल्याची परिस्थिती सध्या पाहायला मिळत आहे. शहर आणि परिसरात एकीकडे कोयता गँगची दहशतीमुळे भीतीचं वातावरण असतानाच दुसरीकडे महिलांवरील अत्याचार, खून, चोरीच्या घटनाही वाढल्या आहेत.
अशातच आता पुणे शहरात ऐनदिवाळी सणाच्या धामधुमीत अभिरुची पोलिस स्टेशनच्या हद्दीत ही गोळीबाराची धक्कादायक घटना घडल्याचे समोर येत आहे. गजबजलेल्या परिसरात ही घटना घडल्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. पुणे शहरात ही गोळीबाराची घटना बुधवारी रात्री घडली आहे. हा गोळीबार तिघांनी केल्याचं पोलिसांच्या प्राथमिक तपासात समोर येत आहे. घटनास्थळी पोलिसांचं एक पथक दाखल झालं आहे. पोलिसांकडून गोळीबार का करण्यात आला, तो कुणी केला याचा कसून शोध घेणं सुरू आहे. याबाबतचे वृत्त ‘साम’ वृत्तवाहिनीने दिले आहे.
पुण्यातील वडगाव धायरी परिसरातील सृष्टी गार्डन हॉटेलसमोर गोळीबार करण्यात आला आहे. वेदांत भोसले नावाच्या तरुणावर गोळीबार करण्याचा प्रयत्न करण्यात आला. मात्र, गोळी वेदांतच्या बोटाला स्पर्श करुन गेल्याने त्याला इजा झाली नाही. हा गोळीबार कोणी केला याचा पोलिसांकडून सुरु करण्यात आला आहे.
शहरात गुन्हेगारीच्या घटना वाढल्या आहेत. ड्रग्जपासून ते मुली, महिलांच्या असुरक्षितेचा प्रश्नांमुळे पोलिसांसमोर आव्हान निर्माण होऊ लागलीत. गुंडांच्या टोळ्याच्या दहशत देखील वाढली आहे. गुन्हेगारीला कुठूनतरी बळ मिळत आहे आणि त्यातून पुण्यात असुरक्षिते वातावरण निर्माण होताना दिसते. पुण्यात एकापाठोपाठ गोळीबाराच्या घटना समोर येत आहे. गेल्या काही महिन्यांपासून अशा घटना घडत असल्यामुळे नागरिकांमध्ये संतापाचं वातावरण आहे. पण पोलिसांनाही गोळीबाराच्या घटना रोखण्यात अपयश येत असल्याची टीका पुणेकरांकडून केली जात आहे.