अक्षय शिंदे एन्काऊंटरनंतर पुढे काय? हायकोर्टात ‘त्या’ ट्रस्टींविरुध्द मानवी तस्करी, चाईल्ड पॉर्नोग्राफीची याचिका

0

बदलापूरातील एका शाळेतील दोन चिमुकल्या मुलींवर लैंगिक अत्याचार करणाऱ्या अक्षय शिंदेचा एन्काऊंटर केल्यानंतर आरोप-प्रत्यारोप सुरू झाले आहेत. संबंधित शाळा व्यवस्थापनाला वाचवण्यासाठी अक्षयची हत्या केल्याचा आरोप विरोधकांनी केला आहे. त्यातच आता शाळेच्या ट्रस्टींवर गंभीर आरोप करण्यात आले आहेत. माहिती अधिकार कार्यकर्ते केतन तिरोडकर यांनी शाळेच्या ट्रस्टींचा मानवी तस्करी, चाईल्ड पॉर्नोग्राफीत सहभाग असल्याचा आरोप केला आहे. तशी याचिका त्यांनी मुंबई हायकोर्टात दाखल केली असून त्यावर लवकरच सुनावणी होण्याची शक्यता आहे.

बदलापूर घटनेचा गुन्हा नोंद झाल्यानंतर दुस-याच दिवशी संबंधित शाळेतून अन्य एक मुलगी बेपत्ता झाली होती. त्याच पोलिस ठाण्यात तक्रार झाल्याची माहिती असल्याचे तिरोडकर यांनी याचिकेत म्हटले आहे. त्यामुळे आता या प्रकरणाला वेगळे वळण लागण्याची शक्यता आहे. हे आरोप अत्यंत धक्कादायक असल्याने कोर्ट याचिकेची दखल घेणार का, याबाबत उत्सुकता वाढली आहे.

अधिक वाचा  या ज्येष्ठ नेत्यांनी गाठलं मंत्रालय, पश्चिम महाराष्ट्राच गणित बदललं? पुन्हा आमदारकी मिळणार? की जिल्ह्यात सत्ता संघर्ष सुरूच राहणार

बड्या आरोपींना वाचवण्याचा प्रयत्न सुरू असल्यानं संपूर्ण तपास तातडीनं सीबीआयकडे वर्ग करण्याची मागणीही केतन तिरोडकर जनहित याचिकेतून केली आहे. निवृत्त आयपीएस अधिकारी मीरा बोरवणकर यांना भेटण्याची अक्षय शिंदेची इच्छा होती. त्याने पोलिसांना तसे सांगितल्याचा मोठा दावाही याचिकेत करण्यात आला आहे.

हायकोर्टाने स्थापन केलेल्या विशेष समितीसमोर अक्षय शिंदे गेल्यास या प्रकरणाला वेगळे वळण मिळू शकते, या भीतीने एन्काऊंटर झाल्याचा गंभीर आरोपही तिरोडकर यांनी केला आहे. शाळेतून घटनेच्या दिवसाचे सीसीटीव्ही फुटेज गायब करणारा कर्मचारी तसेच ट्रस्टीही अजून फरार असल्याचे नमूद करत तिरोडकरांनी ठाणे पोलीस आणि एसआयटीच्या कारभारावर प्रश्न उपस्थित केले आहेत.

अधिक वाचा  काँग्रेससाठी दिलासादायक वृत्त! प्रवक्ते होण्यासाठी प्रथमच तब्बल 5000 प्रज्ञावंतांचे अर्ज; २५० इच्छुकांच्या मुलाखती लवकरच घोषणा

दरम्यान, अक्षय शिंदेला सोमवारी सायंकाळी तळोजा कारागृहातून नेत असताना पोलिस व्हॅनमध्ये चकमक उडाली. अक्षय पोलिसांकडून पिस्तूल हिसकावून घेत त्यांच्या दिशेने गोळीबार केला. त्यानंतर पोलिसांनी स्वसंरक्षणासाठी केलेल्या गोळीबारात अक्षयचा मृत्यू झाला. यावरून आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडत आहेत.