अमरावती येथील अतिदुर्गम मेळघाटात भीषण अपघात झाला आहे. अमरावती जिल्ह्यातील परतवाडा धारणी मार्गावर सेमाडोह जवळ खाजगी बस पुलावरुन खाली कोसळली आहे. अपघात इतका भीषण होता की पुल थेट पाण्यात कोसळली असून या अपघातात 50 प्रवासी गंभीर जखमी झाले आहेत. तर, तिघांची प्रकृती चिंताजनक आहे.
अमरावतीतील मेळघाट हा अतिदुर्गम भाग आहे. घाटातील वळणाच्या मार्गावरच हा अपघात झाला आहे. प्राथमिक माहितीनुसार, मेळघाट मधील वळण रस्त्यावर चालकाचे नियंत्रण सुटल्याने पुलाखाली बस कोसळली आहे. अमरावती जिल्ह्यातील परतवाडा धारणी मार्गावर सेमाडोह जवळ हा अपघात घडला आहे. सर्व जखमी प्रवाशांवर सेमोडो प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचार सुरू आहेत.
पुलावरुन वळण घेत असताना चालकाने बसवरील नियंत्रण गमावल्याने बस पुलावरुन खाली कोसळली. अपघात इतका भीषण होता की, पुलाचा कठडा तोडून बस थेट दरीत कोसळली. या बसमध्ये 50 प्रवासी होते. यातील काही प्रवासी किरकोळ जखमी झाले असून तीन जणांची प्रकृती चिंताजनक आहे. तसंच, दरी खोल असल्याने या प्रवाशांना बाहेर काढणेही कठिण ठरतंय. प्रवाशांना बसच्या खिडकीतून बाहेर काढण्याचा प्रयत्न केला जात आहे. तसंच. दरीत पाणी असल्याने बचावकार्य करण्यासही अडथळा येत आहे.