लोकसभेच्या निकालानंतर महायुतीत सारं काही आलबेल नसल्याचं चित्र आहे. अजित पवारांवर भापजच्या नेत्यांकडून सतत टीका केली जात आहे. या टीकेवर अजित पवारांच्या राष्ट्रवादीकडून प्रत्युत्तर देण्यात येत आहे. या सर्वात आता ”अजित पवार सत्तेत असतील तर आम्हाला विधानसभेची सत्ता नको. अजित दादांना महायुतीतून बाहेर काढा”, अशी खदखद भाजपमधून व्यक्त होतं आहे.
दौंडमध्ये भाजप कार्यकर्त्यांची बैठक पार पडली. या बैठकीत अजित पवारांविरोधी सुर दिसून आला होता. बैठकीला भाजप आमदार राहुल कुल आणि इतर नेते मंडळी उपस्थित होते. या बैठकीत भाजपच्या कार्यकर्त्यांनी अजित पवारांविरूद्ध नाराजी व्यक्त केली होती.
गेल्या 10 वर्षापासून आम्ही ज्यांना विरोध केला, त्या राष्ट्रवादीच्या अजित दादांनी तुम्ही आमच्या बोकांडी बसवलं आहे. त्यामुळे अक्षरश कार्यकर्त्यांमध्ये भितीचे वातावरण आहे. भाजपच्या बुथ लेव्हलच्या कार्यकर्त्यापासून ते तालुक्याच्या कार्यकर्त्यांपर्यंत प्रत्येकाची इच्छा आहे. महायुतीत अजित दादा असतील आणि विधानसभेला जर सत्ता आणायची असेल, ती सत्ता कार्यकर्त्यांना नको आहे. काय गरज आहे अजित दादांसाठी सत्ता आणायची. तिकडे त्यांनी पालकमंत्री असताना आदेश द्यायचे आणि भाजपच्या कार्यकर्त्यांना चिरडण्याचं काम करायचं.अशी सत्ता आम्हाला नको, असा निर्धार या बैठकीत कार्यकर्त्यांनी केला होता.
अजित पवारांनी भाजपच्या कार्यकर्त्यांवर अन्याय केलाय.पालकमंत्री म्हणून दादा आमच्या बोकांडी आहेत. त्यामुळे अजित पवार सत्तेत असतील तर आम्हाला विधानसभेची सत्ता नकोय, अशी खदखद भाजप कार्यकर्त्यांनी राहुल कुल यांच्यासमोर बोलून दाखवली.
तुम्हाला कार्यकर्त्यांचा सल्ला आणि मन जाणून घ्यायचं असेल तर अजित दादांना महायुतीतून बाहेर काढा. सुभाष बापू, राहुल दादा आणि योगेश दादांवर त्यांनी अन्याय केला.हे तिघे मंत्री झाले असते. त्यामुळे महायुतीत अजित दादा असतील आणि विधानसभेला जर सत्ता आणायची असेल, ती सत्ता कार्यकर्त्यांना नको आहे. अजित पवारांना महायुतीतून बाहेर काढा, असा कार्यकर्त्यांचा सूरू होता.