राष्ट्रीय लोकशाही आघाडीमधील घटक पक्षांनी बुधवारी नरेंद्र मोदींना एनडीएचे नेते म्हणून निवड केली आहे. संसदीय गटाचे नेते म्हणून मोदींची निवड केलेल्या बैठकीला जनता दल युनायटेडचे नेते तसेच बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार उपस्थित होते. त्याचप्रमाणे तेलगु देसम पार्टीचे नेते आणि आंध्र प्रदेशचे माजी मुख्यमंत्री चंद्रबाबू नायडूही बैठकीला उपस्थित होते. या दोन्ही पक्षांनी त्यांच्या समर्थनाची पत्र यावेळेस दिली.






दोन शब्दांचा सल्ला
नितीश कुमार यांच्याकडून थेट पंतप्रधानपदाची मागणी होईल वगैरे चर्चा असतानाच त्यांनी अशी कोणतीही मागणी न करता मोदींच्या नावाला पाठिंबा दिला. मात्र मोदींना पाठिंबा देताना नितीश कुमार यांनी अगदी दोन शब्दांमध्ये जेडीयूच्या प्रमुखांनी 2 शब्दांचा सल्ला नरेंद्र मोदींना दिला. पाठिंबा जाहीर केल्यानंतर मोदींना नितीश कुमार यांनी, ‘जल्दी कीजिए’ असा दोन शब्दांचा सल्ला दिला. म्हणजेच लवकरात लवकर सरकार स्थापन करा अशी इच्छा नितीश कुमार यांनी बोलून दाखवली. ‘जरा लवकर’ सत्ता स्थापनेसंदर्भात हलचाली करा असं नितीश यांनी मोदींकडे विनंती केली.
लवकरात लवकर सरकार स्थापन करा
‘इंडिया टुडे’ने दिलेल्या वृत्तानुसार, मोदींबरोबर झालेल्या बैठकीमध्ये बिहारच्या मुख्यमंत्र्यांनी लवकरात लवकर केंद्रात सरकार का स्थापन केलं पाहिजे आणि त्याची काय आवश्यकता आहे याबद्दल भाष्य केलं. “सरकार स्थापन करण्यात फार उशीर होता कामा नये. आपण लवकरात लवकर सरकार स्थापन केलं पाहिजे,” असं नितीश कुमार म्हणाल्याचं ‘इंडिया टुडे’ने सुत्रांच्या हवाल्याने सांगितलं आहे.
पुढील एक दोन दिवसात शपथ
पीटीआयने सुत्रांच्या हवाल्याने दिलेल्या माहितीनुसार, पुढील एक ते दोन दिवसांमध्ये दिल्लीत मोदींचा शपथविधी पार पडेल असं सांगितलं जात आहे. तातडीने कागदोपत्री पुर्तता केली जाईल. शेवटच्या क्षणी एनडीएच्या आघाडीमधील घटकपक्षांमध्ये मतभेद होऊन एकतेला फटका बसू नये म्हणून वेगाने सूत्र हलतील असं सांगितलं जात आहे.
16 पक्षाच्या 21 नेत्यांची बैठक
बुधवारी 16 वेगवेगळ्या पक्षांचे 21 नेते बुधवारी दिल्लीतील एनडीएच्या बैठकीला उपस्थित होते. यामध्ये नितीश कुमार आणि चंद्रबाबू नायडूंबरोबरच महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, एलजीपीचे चिराग पासवान, जेडीएसचे एच. डी. कुमारस्वामी, जन सेनेचे पवन कल्याण, एजीपीचे अतुल बोरा आणि अजित पवार गटाचे प्रफुल्ल पटेल उपस्थित होते. या बैठकीनंतर मोदींनी एनडीए आघाडी उत्तमरित्या काम करेल असा विश्वास व्यक्त केला. “140 कोटी लोकांची सेवा करताना विकसित भारत तयार करण्याचं काम आम्ही करु,” असं मोदी म्हणाले.











