एअर इंडियाच्या विमानाकडून पुन्हा एकदा प्रताप घडला आहे. एअर इंडियाचे विमान प्रवासी बसल्यानंतर आठ तास लेट झाले. त्यानंतर विमानातील वातानुकुलीत यंत्रणा (एसी) बंद होते. यामुळे विमानात प्रवासी बेशुद्ध पडले. दिल्लीवरून सॅन फ्रान्सिस्को जाणाऱ्या विमानात घडलेल्या या घटनेबाबत सोशल मीडियावर तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. या प्रकारबद्दल कंपनीकडून माफी मागण्यात आली आहे. आता 20 तासांच्या उशिरानंतर हे विमान आज सॅन फ्रन्सिस्कोला रवाना होणार आहे.






कंपनीने दिले तांत्रिक कारण
दिल्ली विमानतळावरून एअर इंडिया कंपनीच्या विमानाचे ( फ्लाईट AI 183) उड्डाण गुरुवारी दुपारी 3:20 वाजता होणार होते. परंतु आठ तास एअर इंडियाच्या विमानाचे उड्डाण झाले नाही. तांत्रिक कारणामुळे उड्डाण झाले नाही, असे स्पष्टीकरण कंपनीकडून देण्यात आले. त्याचवेळी विमानातील एसी बंद असल्याने अनेक प्रवासी बेशुद्ध झाले. यासंदर्भात अनेकांनी ट्विट करत नाराजी व्यक्त केली.
सोशल मीडियावर नाराजी
स्वेता पुंज नाम नावाच्या प्रवासाने केलेल्या ट्विटमध्ये म्हटले आहे की, रात्री उशिरा आम्हाला एका हॉटेलमध्ये शिफ्ट करण्यात आले. त्यानंतर आज सकाळी 8 वाजता विमानतळावर जाण्याची सूचना देण्यात आली. अभिषेक शर्मा नावाच्या युजरने X वर लिहिले आहे की, रात्री 2 वाजता आम्हाला हॉटेलमध्ये शिफ्ट केले. त्यानंतर सकाळी फ्लाइट जाणार असल्याचे म्हटले.
एअर इंडियाने मागितली माफी
एअर इंडियाने X वर म्हटले आहे की, एअर इंडियाच्या प्रवाश्यांना झालेल्या असुविधेमुळे आम्ही माफी मागतो. आमची टीम काम करत आहे. लवकरच विमानाचे उड्डाण होणार आहे. प्रवाश्यांची मदत करण्यासाठी आम्ही टीमला सतर्क केले आहे.
जानेवारी महिन्यात नागरी विमान वाहतूक महासंचालनालयाने (DGCA) मार्गदर्शक तत्त्वे जारी केली होती. DGCA ने बोर्डिंग नाकारणे, उड्डाणे रद्द करणे आणि उड्डाणांना होणारा विलंब यामुळे एअरलाइन्सद्वारे प्रवाशांना सुविधा पुरविल्या जाव्यात” असे म्हटले होते. सर्व विमान कंपन्यांनी त्वरित SOP चे पालन केले पाहिजे, असे म्हटले होते.












