महाराष्ट्रातील अजित पवार यांच्या बंडामुळे राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षातच नव्हे तर संपूर्ण भारताच्या राजकारणात खळबळजनक वातावरण निर्माण झाले. राष्ट्रवादीच्या अजित पवारांनी शिंदे सरकारच्या मंत्रिमंडळात उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर पक्षात फूट बघायला मिळाली.अगदी अशीच परिस्थीती राजस्थानमध्ये देखील होती. कॉंग्रेसचे आमदार सचिन पायलट देखील अजित पवारांच्या मार्गावर जाऊन बंड करतील असे भाकित वर्तवले जात होते. मात्र, गुरुवारी झालेल्या कॉंग्रेसच्या बैठकीत या चर्चांना पूर्ण विराम मिळाला.






राजधानी दिल्लीमध्ये गुरुवारी (दि. ६ जुलै) कॉंग्रेस पक्षाची मोठी आणि महत्वाची बैठक पार पडली. या बैठकीत राजस्थानमधील एकूण २९ कॉंग्रेस नेते सामील झाले. राजस्थानच्या राजकारणात रस असलेले या बैठकीकडे लक्ष देऊन होते. नोव्हेंबर-डिसेंबरमध्ये राजस्थानमध्ये विधानसभेच्या निवडणूका पार पडणार आहेत.कर्नाटकमध्ये सत्तास्थापनेनंतर कॉंग्रेस पक्ष उत्साही आहे. कॉंग्रेस आता राजस्थानमध्ये पुन्हा सत्तेची पुनरावृत्ती करण्याची तयारी करत आहे. मात्र, पक्षातील हाय कमांडसाठी मोठे आव्हान उभे होते, ते म्हणजे सचिन पायलट आणि मुख्यमंत्री अशोक गहलोत यांच्यातील वाद. कॉग्रेसच्या बैठकीनंतर यो दोन बड्या नेत्यांमधील वाद मिटेल, असे मानले जात आहे. या बैठकीनंतर राज्याचे माजी उपमुख्यमंत्री सचिन पायलट यांचे वक्तव्य समोर आले आहे. या वक्तव्यावरुन हाय कमांडने पायलट यांची मनधरणी केल्याचे दिसून येते.
सचिन पायलट म्हणाले की, “जवळपास चार तास आमच्यात चर्चा झाली. राजस्थान विधानसभा निवडणूकीची रणनीती बनवण्यात आली. पंचवीस वर्षांपासून राजस्थानमध्ये कॉंग्रेस आणि भाजपची आलटून पालटून सत्ता येण्याचं जे प्रकरण सुरु आहे, ते संपवून कॉंग्रेस पुन्हा सत्तेत कसं येईल या मुद्यावर खुप सार्थक आणि व्यापक चर्चा झाली.”(Latest Marathi News)
नाव न घेता गहलोत यांची प्रशंसा
सचिन पायलट पुढे म्हणाले की, “आम्ही सर्व मुद्यांवर खुल्या विचारांनी चर्चा केली. येणाऱ्या महिन्यांमध्ये अजून मेहनत करुन आपली सरकार पुन्हा आणू शकतो असा विश्वास सर्वांनी दर्शवला.”
मुख्यमंत्री अशोक गहलोत यांचे नाव न घेता त्यांची प्रशंसा करताना पायलट म्हणाले की, “राजस्थानमध्ये ज्या मुद्द्यांवर आपल्या सरकारने काम केलयं, त्याबद्दल आमचे कार्यकर्ते सर्व लोकांना सांगतिल. आमची संघटना, नेते, आमदार, मंत्री सर्वजन मिळून काम करु. आमच्या सर्वांच ध्येय आहे की आम्ही कशा पद्धतीने पुन्हा कॉंग्रेसचे सरकार बनवू.”(Latest Marathi News)
पायलट यांची निवडणूकीबाबत भविष्यवाणी
निवडणूकीबाबत भाकित करताना पायलट म्हणाले की, “मध्यप्रदेश, छत्तीसगड, राजस्थान..२०१८मध्ये या तीन राज्यांमध्ये कॉंग्रेस पक्षाचा विजय झाला. यावेळी पुन्हा असेच होणार आहे. पूर्ण बहुमताने आम्ही सरकार बनवू आणि याचा प्रभाव २०२४च्या लोकसभेच्या निवडणूकांवरही पडेल.”
सचिन पायलट आणि मुख्यमंत्री अशोक गहलोत यांच्यातील नाराजी जगजाहीर आहे. दोन्ही नेत्यांनी एकमेकांवर शाब्दिब बाण चालवलेले आहे. मागील महिन्यात पायलट गहलोतांना प्रश्न विचारत उपोषणावर बसले होते. नाराज सचिन पायलट यांनी राजस्थान सरकार विरोधात एक यात्रा देखील काढली होती. हाय कमांडने या दोघांमधील वाद सोडवण्याची जबाबदारी कमलनाथ यांच्यावर सोपवली होती. मात्र, कमलनाथ यांच्या भेटीनंतरही पायलट नाराज होते.













