मुंबई : गेल्या आठवड्यात सुप्रीम कोर्टानं राज्याच्या सत्तासंघर्षावर निकाल दिला. विधान सभा अध्यक्षांनी आमदारांच्या अपात्रतेबाबत निर्णय घ्यावा असं निकालात न्यायालयानं म्हटलं आहे. त्यानंतर आता हालचालींना वेग आला आहे. या सर्व पार्श्वभूमीवर विधासभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी आज विधानभवनात अधिकाऱ्यांची बैठक घेतली आहे. या बैठकीनंतर त्यांनी पत्रकार परिषद देखील घेतली. काय म्हणाले नार्वेकर या पत्रकार परिषदेमध्ये बोलताना कोर्टाकडून संविधानिक शिस्त कायम ठेवत हा निर्णय विधिमंडळाकडे देण्यात आल्याचं राहुल नार्वेकर यांनी म्हटलं आहे.
पुढे बोलताना ते म्हणाले की, लवकरात लवकर याबाबत निर्णय घेतला जाईल, मात्र याबाबत कोणतीही घाई केली जाणार नाही, सर्व मुद्दे लक्षात घेऊन आमदारांच्या अपात्रतेसंदर्भात निर्णय घेतला जाईल. माझ्याकडे 54 आमदारांच्या पाच याचिका आहेत. जुलै 2022 मध्ये पक्ष कोणता होता हे आधी ठरवावे लागणार आहे. त्या आधारावर निर्णय घेतला जाईल.
हे करत असताना शिवसेनेच्या घटनेचा देखील अभ्यास केला जाणार आहे. पक्ष घटनेनुसार चालतो का? हे देखील पाहिलं जाईल असं नार्वेकर यांनी म्हटलं आहे. ठाकरे गटाकडून कोणतंही निवेदन नाही दरम्यान सोमवारी ठाकरे गटाने विधासभा उपाध्यक्षांची भेट घेतली होती. अध्यक्ष विदेश दौऱ्यावर असल्यानं आमदारांच्या अपात्रतेसंदर्भात आपण निर्णय घ्यावा अशी मागणी ठाकरे गटाने उपाध्यक्षांकडे केली होती. याबाबत बोलताना राहुल नार्वेकर यांनी म्हटलं की, अद्याप या संदर्भात ठाकरे गटाचं कोणतंही निवेदन माझ्याकडे आलेलं नाहीये.