भाजपचे मुस्लिम प्रेम मतलबी अन् हिंदुत्वही ढोंगीच ‘सामना’तून हल्लाबोल

0

भाजपने उत्तर प्रदेशात उर्दूतून मन की बात सुरू केली आहे. मुस्लिम मतदारांना आपल्याकडे आकर्षित करण्यासाठी भाजपने ही खेळी केली आहे. त्यावरून दैनिक ‘सामना’च्या अग्रलेखातून भाजपवर निशाणा साधण्यात आला आहे. भाजपचे हिंदुत्व तर ढोंगी आहेच. पण त्यांचे मुस्लिम प्रेमदेखील मतलबी आहे, असं सांगतानाच भाजपला इझम नावाचा प्रकारच नाही, असा हल्लाबोल दैनिक ‘सामना’च्या अग्रलेखातून करण्यात आला आहे. भाजपने शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचं बाबरी प्रकरणातील योगदान नाकारलं आहे. त्यावरूनही सामनातून हल्ला करण्यात आला आहे. तसेच वीर सावरकरांच्या मुद्द्यावरूनही भाजपला घेरण्यात आलं आहे.

भाजपचे हिंदुत्व हे ढोंगी आहे. मुस्लिमांचा कळवळाही बोगस आणि मतलबी आहे. उद्या यांचा स्वार्थ साधला गेला की हे लोक पुन्हा मुस्लिमांचे झुंडबळी घेतील. भाजपसारखा ढोंगी आणि नौटंकीबाज पक्ष हिंदुस्थानात दुसरा कोणता नसेल. राजकीय स्वार्थासाठी हे लोक कधी काय सोंगेढोंगे करतील याचा भरवसा नाही. भाजपचे नवे कव्वाल म्हणजे तात्पुरती व्यवस्था आहे. कारण भाजपला इझम असा नाही. असता तर वीर सावरकरांच्या नावाने यात्रांचे ढोंग करताना हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे अयोध्या आंदोलनातील योगदान नाकारण्याचे पाप त्यांनी केले नसते, असा हल्लाबोल दैनिक ‘सामना’च्या अग्रलेखातून करण्यात आला आहे.

अधिक वाचा  राज्य सरकारी कर्मचारी आज संप; सरकार थेट पोलिस मदत घेणार! ….रजा, वेतन अन् कारवाईचे हे मोठे आदेश

हा उमाळा मुस्लिम समाजाविषयी नाही, तर…

एका बाजूला हिंदुत्वाच्या नावावर मुस्लिम समुदायावर हल्ले करतात तर निवडणुका येताच त्याच मुस्लिमांशी चुंबाचुंबी करून सेक्युलरवादाचा बुरखा पांघरत असतात, असं सांगतानाच आताही भाजपकडून उत्तर प्रदेशात मुस्लिमांशी सुफी संवाद साधला जाणार आहे. सुफी संवाद महाअधिवेशनही भरवलं जाणार आहे. भाजपचे सर्व केंद्रीय मंत्री दर्ग्यांना भेटी देणार आहेत. उत्तर प्रदेशच नव्हे तर संपूर्ण देशात ही मोहीम राबवली जाणार आहे. भाजपचे हे मुस्लिम प्रेम खरे नसून पुतनामावशीचे आहे. हा उमाळा मुस्लिम समाजाविषयी नाही, तर मुस्लिम मतांसाठीचा आहे, अशी टीका अग्रलेखातून करण्यात आली आहे.

अधिक वाचा  राज्यावर दुहेरी संकट उष्ण लाटेचाही ‘येलो अलर्ट’ जारी अतिमहत्वाच्या कामाशिवाय घराबाहेर पडणे टाळा, या जिल्ह्यात शाळांना सुट्टी जाहीर

हाच भाजपचा ‘खरा चेहरा’

वर्षभरावर लोकसभा निवडणुका आहेत. त्यामुळेच भाजपला मुस्लिम प्रेमाची उचकी आली आहे. ही उचकी फक्त वर्षभर टिकेल. त्यानंतर थांबेल. निवडणुकीत हिंदू-मुस्लिम दंगा भडकावून आपल्या पोळ्या भाजून घेणे हाच त्यांचा हिंदुत्ववाद आहे. हिंदू-मुस्लिम ध्रुवीकरणाच्या राजकारणाचे भाजपचे हे परंपरागत तंत्र आहे. निवडणुकांच्या तोंडावर होणाऱ्या हिंदू-मुस्लिम दंगली आणि नंतर होणाऱ्या मतांच्या ध्रुवीकरणावर भाजलेल्या सत्तेच्या पोळ्या हा भाजपचा ‘खरा चेहरा’ आहे, असं सांगतानाच केवळ राजकीय अपरिहार्यता म्हणूनच ते मुस्लिम प्रेमाचा उमाळा निवडणुकीच्या तोंडावर आणत असतात, असंही अग्रलेखातून म्हटलं आहे.

साक्षात्कार अलीकडेच का व्हावेत?

अधिक वाचा  शिवडी परेल परिसरातील सार्वजनिक जयंती उत्सव मंडळाच्या वतीने डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची जयंती मोठ्या उत्साहात संपन्न

एकीकडे हिंदू-मुस्लिमांमध्ये तेढ निर्माण करायची. दुसरीकडे सुफी संवादाचे नाटक करायचे. नवीन मदरशांचं अनुदान नाकारायचं, अडीच हजार मदरशांची मान्यता रद्द करायची आणि सुफी संवादाच्या नाटकाचे प्रयोगही करायचे. मन की बातच्या उर्दूतील प्रतीही वाटल्या जात आहे. मुस्लिम प्रेमाचा हा पान्हा भाजपला आताच का फुटला? सरसंघचालकांनाही ‘मुसलमानांशिवाय हिंदुस्थान अपूर्ण’ किंवा ‘हिंदू-मुस्लिम यांचा डीएनए एकच’ हे साक्षात्कार अलीकडेच का व्हावेत? हैदराबाद येथे गेल्या सप्टेंबरमध्ये झालेल्या भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारिणीत ‘मुस्लिमांपर्यंत पोहोचा’असा पुकारा करण्याची गरज पंतप्रधान मोदी यांना का वाटली?, असे सवालही करण्यात आले आहेत.