राज्यसभा खासदार कपिल सिब्बल यांनी 2024 च्या लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर विरोधकांना एक महत्वाचा सल्ला दिला आहे. तसेच 2024 मध्ये भाजपला सत्तेपासून थांबविण्यासाठी कपिल सिब्बल यांनी थेट फॉर्म्युलाच सांगितला आहे. ”आगामी निवडणुकीमध्ये भाजपचा सामना करण्यासाठी काँग्रेसने इतर राजकीय पक्षांबरोबर आघाडी केली पाहिजे”, असं मत एका वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीत कपिल सिब्बल यांनी व्यक्त केलं.






सिब्बल म्हणाले, ”2024 च्या निवडणुकीत भाजपचा सामना करण्यासाठी मजबूत आघाडी असायला पाहिजे. जी आघाडी भाजपचा सामना करु शकेल. मजबूत आघाडीसाठी सर्व विरोधी पक्षांनी एकमेकांविरूद्ध टीका करताना काळजी घ्यावी. भाजपच्या नेतृत्वाखाली असणाऱ्या केंद्र सरकारला विरोध करणाऱ्या सर्व राजकीय पक्षांना पहिल्यांदा एक सर्वसमावेशक व्यासपीठ शोधण्याची गरज आहे”, असं ते म्हणाले.
”विरोधकांनी आपले मत मांडण्यासाठी व्यासपीठ शोधावं. हे व्यासपीठ ‘इन्साफ के सिपाही’ वेबसाइटही असू शकते, असंही ते यावेळी म्हणाले. ”तसेच 2024 साठी विरोधी आघाडीच्या नेतृत्वाच्या प्रश्नाचे आत्ता उत्तर देण्याची गरज नाही. कारण 2004 च्या निवडणुकीत देखील विरोधकांचा पंतप्रधान पदाचा चेहरा ठरला नव्हता. तरी देखील निवडणुकीनंतर अटल बिहारी वाजपेयी यांचे सरकार सत्तेतून बाहेर पडले होते”, असं उदाहरणही यावेळी त्यांनी दिलं.
शरद पवार यांनी उद्योगपती गौतम अदानी यांच्याविषयी केलेल्या भाष्यावरही त्यांनी आपलं मत व्यक्त केलं. सिब्बल म्हणाले, ”जर मुद्दे कमी केले तरी राजकीय पक्षांमध्ये होणारे मतभेद हे कमी होतील. शरद पवार यांना त्यांचे मत मांडण्याचा अधिकार आहे. तसं राहुल गांधी यांना देखील एखाद्या व्यक्तीबद्दल त्यांचे मत मांडण्याचा अधिकार आहे. त्यामुळे विसंवादाचे उदाहरण म्हणून याकडे पाहिले जाऊ नये”, असं आवाहनही यावेळी त्यांनी केलं.













