तथागत गौतम बुद्ध म्हणतात की सजीव आणि निर्जीव दोन्ही अनित्य आहेत – संदीप गमरे 

0

मुंबई दि. २३ (रामदास धो. गमरे) “नदीचे दगड पाण्याच्या प्रवाहाच्या घर्षणाने क्षणोक्षणी घासले जातात परंतु ही क्रिया आपल्याला दिसत नाही, खडक-दगड हे घासले जाऊन त्यापासून रेती तयार होते, खडक दगड यांच्या अनित्यतेमुळे रेतीचे अस्तित्व निर्माण होते असेच निसर्गातील सर्वच सजीव व निर्जीव गोष्टी या अनित्य आहेत त्यात काळानुसार काही न काही बदल होत जाणार आहेत, हे शरीर देखील आपले नाही सर्व काही परिवर्तनशील आहे, शरीर हे निसर्गाची देण आहे जन्मतःच घेतलेला आणि शेवटच्या क्षणी घेतलेला श्वास हा निसर्गाला प्रत्येक जीवाला द्यावाच लागतो, तथागत बुद्ध म्हणतात अनेक तत्वांनी बनलेली वस्तू अनित्य आहे, सर्व प्राणीमात्र अनित्य आहेत, परिवर्तनाच्या प्रक्रियेनंतरची अवस्था प्राप्त झाली की पहिली अवस्था नष्ट होते म्हणजेच ती शून्यात जाते त्याला शून्यवाद म्हणतात म्हणून बुद्धाने त्यांच्या सिद्धांताची मांडणी अनित्यवाद आणि शून्यवाद यांच्या आधारे केली सोबतच बुद्धाने अनात्मवाद ही सांगितला आहे.

अधिक वाचा  पाकिस्‍तानची मस्‍ती कायम ‘जैश’ला २५ कोटी रोख आणि ११ कोटी ‘ऑपरेशन सिंदूर’मध्ये उद्ध्वस्त अड्डा पाकने पुन्हा उभारला

आत्मा नावाचा कोणताच घटक नसून त्यांनी आत्म्याचे अस्तित्वच नाकारले आहे म्हणून स्वर्ग, नरक, देवलोक, परलोक या कल्पना ही नाकारल्या आहेत, भिक्खुणी संघात येण्याआधी पटाचारा ही तरुणी तिचा पती, दोन्ही मुले आणि आई-वडील यांच्या मृत्यूच्या आघाताने मानसिक अवस्थ झाली होती तेव्हा ओढवलेल्या प्रसंगातून तिला बाहेर काढण्यासाठी बुद्धाने तिला धम्म दिला आणि दुःख हे अटळ आहे असा उपदेश दिला त्यामुळे आपल्या दुःखातून बाहेर येऊन पुढे तिने भिक्खुणी संघात प्रवेश केला. नित्य असे काहीच नसल्याने सजीव व निर्जीव हे सर्वच अनित्य आहे असे तथागत गौतम बुद्ध यांनी म्हटले आहे” असे प्रतिपादन वर्षावास प्रवचन मालिकेचे चौथे पुष्प गुंफत असताना आदर्श बौद्धाचार्य संदीप गमरे यांनी केले.

अधिक वाचा  समाविष्ट २३ गावांतील ६२६ कर्मचाऱ्यांचे भवितव्य अधांतरी! नगरविकास विभागाकडून महापालिकेला पत्र प्राप्त प्रकरण काय?

बौद्धजन सहकारी संघ ता. गुहागर जिल्हा रत्नागिरी गाव आणि मुंबई शाखा यांच्या संयुक्त वतीने आषाढ पौर्णिमा ते आश्विन पौर्णिमा या कालावधीत वर्षावास धम्म प्रवचन मालिकेचे ऑनलाइन आयोजन करण्यात आले आहे. सदर प्रवचन मालिकेचे चौथे पुष्प बौद्धजन सहकारी संघ मुंबई शाखेचे तालुका संघाचे चेअरमन दीपक मोहिते यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आले सदर मालिकेचे चौथे पुष्प संस्कार समितीचे सचिव सचिन मोहिते यांच्या शुभहस्ते मोठ्या उत्साहात संपन्न झाले, सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आणि प्रास्ताविक संस्कार समितीचे सरचिटणीस सचिन मोहिते यांनी आपल्या भारदस्त आणि पहाडी आवाजात लाघवी भाषाशैलीत केले.

अध्यक्षीय भाषणात बोलत असताना दीपक मोहिते यांनी “गेली दहा वर्षे बौद्धजन सहकारी संघाच्या वतीने वर्षावास मालिकेचे आयोजन करून आपण धम्माचा प्रचार आणि प्रसार करीत आहोत सोबतच इतरही अनेक उपक्रम आपण करणार आहोत त्या उपक्रमास ही आपण असेच सहकार्य कराल अशी मी आशा बाळगतो” असे नमूद केले.

अधिक वाचा  ‘छात्रों की गूंज’मध्ये राहुल गांधींनी मांडली महिलांच्या स्वातंत्र्याची नवी भूमिका आत्ता महिलांची ओळख वडील, पती किंवा मुलांमुळे नाही

सदर प्रसंगी बौद्धजन सहकारी संघाचे माजी विश्वस्त आणि पतपेढीचे चेअरमन के. सी. जाधव, संजय पवार, शैलेंद्र जाधव, राजाभाऊ तथा रामदास धो. गमरे, माजी खजिनदार रामदास कळंबे, अरुण जाधव, संदेश गमरे, संतोष पवार, सचिन पवार, दिपक सावंत, अशोक कदम, बबन गमरे, रुपेश गमरे, प्रशांत गमरे आदी मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते सरतेशेवटी सदर कार्यक्रम यशस्वीपणे पार पाडण्यासाठी अथक परिश्रम घेणाऱ्या सर्वांचे आणि उपस्थितांचे आभार मानून दीपक मोहिते यांनी कार्यक्रमाची सांगता केली.