कुटुंबातील सदस्यांचा उल्लेख करताच बावनकुळेचे अश्रू तरळले! नको ते बोलले, मिमिक्री केली; टीकेने बावनकुळे भावुक

0

सध्या कुणबी प्रमाणपत्राच्या मुद्द्यावरून मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी भाजप नेते आणि राज्याचे महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांना चांगलंच फैलावर घेतले आहे. नुकतेच जरांगे यांचा पश्चिम महाराष्ट्र दौरा पार पडला.या दौऱ्यातील सभांमध्ये मनोज जरांगे यांनी बावनकुळे यांचा कधी एकेरी उल्लेख करत टीका केली,तर कधी दिसण्यावरून व्यंगात्मक टीका केली. जरांगे यांच्याकडून होणाऱ्या सततच्या टीकेला आज अखेर चंद्रशेखर बावनकुळे यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. मात्र जरांगेंच्या टीकेला उत्तर देताना चंद्रशेखर बावनकुळे हे भावुक झाल्याचं पाहायला मिळालं.

मनोज जरांगे यांच्या टीकेवर चंद्रशेखर बावनकुळे यांना विचारले असता ते म्हणाले, “माझे व्यंग काढून किंवा माझ्यावर टीका करून जर त्यांना आनंद मिळत असेल, तर खुशाल मिळू द्या, मी त्यावर काहीही बोलणार नाही. पण माझ्या घरातही माझी पत्नी, नातू, वडील, मुले आणि बहीण असा परिवार आहे. या गोष्टींचा त्यांनाही खूप त्रास होतो. माझ्यावर टीका केल्याने जर न्याय मिळणार असेल, तर त्यांनी माझी खुशाल टिंगल करावी,” असं बोलताना बावनकुळे यांच्या डोळ्यांत अश्रू तरळले होते.

अधिक वाचा  मुंबई-ठाण्यात ED चे छापे 1 कोटी जप्त केंद्रीय अधिकारी असल्याचा भास 113 कोटींच्या क्रिप्टो फसवणुकीचा पर्दाफाश

तर, आपला कोणत्याही जातीवादाशी संबंध नसल्याचे बावनकुळे म्हणाले आहेत. “माझी पत्नी कुणबी समाजाची आहे, तर माझी सूनबाई मराठा आहे. आम्ही सर्वजण एकाच घरात गुण्यागोविंदाने राहतो. आम्ही कधीही कुणबी, तेली किंवा मराठा असा कोणताही वाद करत नाही,” अशा शब्दांत त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.

“मी कधीच जातीपातीचे राजकारण करत नाही. महसूल विभागाने आतापर्यंत तब्बल २२ लाख कुणबी जात प्रमाणपत्रे दिली आहेत. यापैकी एखाद्या प्रमाणपत्रात त्रुटी असल्याच्या संशयावरून चौकशी लावली होती आणि ती देखील आता पूर्ण झाली आहे. जात पडताळणी अहवाल देण्याचे काम माझ्या महसूल विभागाचे नसून ते समाजकल्याण विभागाचे आहे, त्यामुळे या एका प्रमाणपत्रामुळे जरांगे पाटील यांचा मोठा गैरसमज झाला आहे,” असा खुलासा बावनकुळे यांनी केला.

अधिक वाचा  राज्य सरकार मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत, उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थिनींना महिन्याला 2000 पॉकेटमनी मिळणार?

दरम्यान, राज्यातील वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर त्यांनी ओबीसी आंदोलकांनाही सबुरीचा सल्ला दिला. कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये तसेच सामाजिक सलोखा बिघडू नये, यासाठी कोणीही रस्त्यावर उतरून आंदोलने करू नयेत. त्याऐवजी कायदेशीर मार्गाने आपला लढा द्यावा, अशी विनंती त्यांनी सरकारतर्फे केली.