ज्या मैत्रीसाठी शेतजमिनीवर शैक्षणिक कर्ज काढले त्यानेच व्याज न भरल्याने जमीन विकण्याची वेळ फसवणुकीची गुन्हा दाखल

0

यवत : ऑस्ट्रेलियातील शिक्षणासाठी आर्थिक मदत करण्याचे सांगून शेतजमिनीवर शैक्षणिक कर्ज काढण्यास भाग पाडले. मात्र, कर्जाचे हप्ते व व्याज न भरल्याने अखेर कर्ज फेडण्यासाठी शेतजमीन विकावी लागल्याचा आरोप करीत यवत येथील ६० वर्षीय शेतकऱ्याने दोघांविरुद्ध पोलिसांत तक्रार दिली आहे.

याप्रकरणी रमेश कुंतीलाल मांडोत आणि कल्पेश रमेश मांडोत यांच्याविरुद्ध यवत पोलिस ठाण्यात गुन्हा क्रमांक ७५५/२०२६ अन्वये भारतीय दंड विधानातील कलम ४०६, ४२०, ३४ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार युसुफ अब्दुल रेहमान पठाण यांचा यवत येथे पूर्वी मोटार वायडिंगचा व्यवसाय होता. रमेश मांडोत यांच्याशी त्यांचे अनेक वर्षांपासून कौटुंबिक व मैत्रीचे संबंध असल्याचे तक्रारीत नमूद आहे. मांडोत यांच्या मुलाला ऑस्ट्रेलियात शिक्षणासाठी पाठवायचे असल्याने आर्थिक अडचण असल्याचे सांगून त्यांनी पठाण यांच्याकडे मदत मागितली.

अधिक वाचा  बिल न भरल्यास मृतदेह अडवण्यावरचा चाप उठणार? रुग्णांच्या हक्कांवर गदा आणणाऱ्या नव्या विधेयकावर टीका

तक्रारीनुसार, मांडोत यांनी पठाण यांचे सोसायटीचे थकीत सुमारे २ लाख ५१ हजार रुपये भरून, त्यांच्या शेतजमिनीवर शैक्षणिक कर्ज काढण्यास प्रवृत्त केले. त्यानंतर पठाण व कल्पेश मांडोत यांच्या संयुक्त खात्यावर शैक्षणिक कर्जाची रक्कम जमा झाली. पहिल्या वर्षी ९ लाख ९९ हजार रुपये, तर दुसऱ्या वर्षी १४ लाख ४५ हजार रुपये, अशी एकूण २४ लाख ४४ हजार रुपयांहून अधिक रक्कम कर्जाच्या स्वरूपात जमा झाल्याचे तक्रारीत म्हटले आहे.

कर्जाच्या रकमेचा वापर केल्यानंतर त्याचे व्याज नियमित भरण्याचे आश्वासन देण्यात आले. मात्र, व्याज थकीत राहिल्याने बँकेकडून पठाण यांना वारंवार सूचना मिळू लागल्या. कर्जाची परतफेड न झाल्यास शेतजमीन जप्त होण्याची भीती निर्माण झाल्याने पठाण यांनी फेब्रुवारी २०२४ मध्ये आपली जमीन विक्रीचा व्यवहार केला. त्यातून मिळालेल्या रकमेतून २६ लाख २८ हजार ७१८ रुपये बँकेत भरून कर्जाची परतफेड करून ना-हरकत प्रमाणपत्र घेतल्याचे तक्रारीत नमूद आहे.

अधिक वाचा  महाराष्ट्रात खळबळ माजी महामंत्र्यांची भाजपमधून हकालपट्टी, आगामी निवडणुकांवर परिणाम होणार मुंबईत डॅमेज कंट्रोल सुरू

त्यानंतर संबंधितांकडे पैसे परत मागितले असता, आज देतो, उद्या देतो, महिन्याने देतो असे सांगून टाळाटाळ करण्यात आल्याचा आरोप पठाण यांनी केला आहे. याप्रकरणी त्यांनी एप्रिल २०२६ मध्ये वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांकडे तक्रार अर्ज दिला होता. चौकशीनंतर त्यांनी यवत पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. याप्रकरणाचा पुढील तपास हेड कॉन्स्टेबल गणेश झुंबर सोनवणे करीत आहेत.