गुहागरमध्ये जंतर-मंतर घटनेच्या निषेधार्थ वंचित बहुजन आघाडीचे आंदोलन

0

गुहागर दि. २३ (रामदास धो. गमरे) NEET पेपर लिक विरोधात नवी दिल्लीतील जंतर-मंतर येथे २० जुलै रोजी विद्यार्थ्यांनी पुकारलेल्या आंदोलनाला दडपण्याच्या उद्देशाने बोगस पोलिस वापरून काठ्यांना खिळे, कुंपणाची तार लावून विद्यार्थ्यांवर झालेल्या कथित लाठीचार्ज तसेच महिला विद्यार्थिनींशी गैरवर्तन झाल्याच्या निषेधार्थ अॅड. प्रकाश तथा बाळासाहेब आंबेडकर यांच्या महाराष्ट्र बंदच्या आवाहनाला प्रतिसाद देत वंचित बहुजन आघाडीच्या गुहागर तालुका शाखेच्या वतीने सिद्धार्थ जाधव सर यांच्या अध्यक्षतेखाली गुरुवारी सरकारचा निषेध करण्यासाठी जोरदार आंदोलन करण्यात आले व यावेळी गुहागरचे तहसीलदार यांना विविध मागण्यांचे निवेदन सादर करण्यात आले.

अधिक वाचा  राहुल गांधींच्या आंदोलनाला यश, दिल्ली पोलिसांत पेलेट गनप्रकरणी अखेर गुन्हा दाखल, FIR मध्ये मात्र अजब नोंद

आंदोलनानंतर झालेल्या सभेत वंचित बहुजन आघाडीचे तालुकाध्यक्ष सिद्धार्थ जाधव यांनी उपस्थितांना संबोधित करत, लोकशाही मार्गाने आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांवर झालेल्या कथित पोलिस कारवाईचा तीव्र शब्दात निषेध व्यक्त केला. विद्यार्थ्यांच्या लोकशाही हक्कांचे संरक्षण व्हावे आणि संबंधित घटनेची निष्पक्ष चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्यात यावी अशी मागणी त्यांनी जोर लावून धरली.

सदर आंदोलनात गुहागर तालुका मुस्लिम समाजाचे अध्यक्ष शाबीरजी साल्हे, शृंगारतळी येथील उद्योजक शोहेब मालाणी, तसेच बहुजन समाज पक्ष (बीएसपी), रिपब्लिकन सेना, दलित पॅंथर आणि वंचित बहुजन आघाडीच्या तालुका व जिल्हा कार्यकारिणीचे पदाधिकारी, महिला आघाडी, विद्यार्थी आघाडीचे प्रतिनिधी व कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदविला.

अधिक वाचा  समाविष्ट २३ गावांतील ६२६ कर्मचाऱ्यांचे भवितव्य अधांतरी! नगरविकास विभागाकडून महापालिकेला पत्र प्राप्त प्रकरण काय?

सदर प्रसंगी महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून आंदोलनाला सुरवात झाली सदर आंदोलन शांततापूर्ण वातावरणात पार पडले असून, विद्यार्थ्यांवरील कथित अत्याचाराच्या निषेधार्थ शासनाने तातडीने योग्य ती कारवाई करावी अशी मागणी आंदोलनकर्त्यांनी केली. सरतेशेवटी तालुका चिटणीस माजी सैनिक सुनील जाधव यांनी सदर बंद यशस्वीपणे पार पाडण्यासाठी सहकार्य सर्व उपस्थितांचे व तहसीलदार साहेब यांचे आभार मानून सर्वांना सरकारी नियमांचे उल्लंघन न करता तसेच कोणत्याही शासकीय, गैरशासकीय, खाजगी अशा स्थावर जंगम मालमत्ते नुकसान न करता शांततेच्या मार्गाने आपापल्या गंतव्य स्थानी प्रस्थान करण्याचे असे आवाहन करून आंदोलनाची सांगता केली.

अधिक वाचा  पीएमआरडीएसमोर ७३५ हेक्टर भूसंपादनाचा मोठा पेच! ४४ कोटींचा निधी वर्ग संमती न देणाऱ्यांचे सक्तीने भूसंपादन